Tuesday 29 November 2011

R2020... क्रांती!

चेतन भगत हा माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक... किंबहुना भारतीय इंग्रजी लेखकांमध्ये सर्वात आवडता. काल दुपारी चेतनचं रिव्हॉल्यूशन २०२० हे नवं पुस्तक पोष्टानं हाती पडलं आणि आजची दुपार येईस्तोवर त्याचा फडशा पाडला. चेतनच्या पुस्तकांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रोलॉग वाचल्यावर एपिलॉग वाचेस्तोवर ते खाली ठेवावंसंच वाटत नाही. २४ तासांत पुस्तक संपवलं खरं, पण डोक्यात त्याचं कथानक रेंगाळतचं आहे. पण बाकीची कामंही आहेत, त्यामुळे विचारांना वाट मोकळी करून देणं खूपच आवश्यक आहे. म्हणून तातडीनं ब्लॉग लिहायला घेतला. त्या निमित्तानं गेल्या अनेक महिन्यांचा ब्लॉगसन्यास संपला, तर सोने पे सुहागा...

*****************************************************

रिव्हॉल्यूशन २०२०... खरंतर ही एक त्रिकोणी प्रेमकथा आहे. पण त्याला अनेक सामाजिक-आर्थिक-मानसशास्त्रीय  पैलू आहेत. चेतनच्या आधीच्या चारही कादंब-यांमध्ये ते थोडेफार आहेतच, पण आर२०२० (आरतीनं केलेला शॉर्टफॉर्म) या पुस्तकाइतकं कधीच नाहीत.
गोपाळ हा चेनतच्या अन्य हिरोंसारखाच 'लूजर..' त्याचा शाळेपासूनचा मित्र, राघव हुश्शार आणि मैत्रीण  आरती दिसायला सुंदर... स्टोरी तशी टिपिकल. गोपाळचं आरतीवर जीवापाड प्रेम... आरती त्याला आपला सगळ्यात जवळचा मित्र मानते (ते शाळेत असतानापासून सोबत असतात.) पण इंजिनियरिंग एन्टरन्समध्ये नापास झाल्यानंतर गोपाळ दुस-या गावी पुन्हा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातो आणि नेमके त्याच वेळी राघव आणि आरती जवळ येतात. ती तसं गोपाळला सांगतेही... गोपाळ परत आल्यानंतर त्याच्या मनात सुरू झालेलं द्वंद्व... तो आणि आरती पुन्हा आणि जास्त जवळ येणं.... राघवपासून वाढत असलेलं अंतर आणि असं बरंच काही...
पण या सगळ्या गोष्टीचा कणा आहे, राघवला हवी असलेली क्रांती... क्रांतीसाठी झपाटलेला राघव. त्याचा राजकारण्यांशी संघर्ष... त्याच वेळी त्याच राजकारण्यांच्या मदतीनं मोठा होत असलेला गोपाळ... त्यामुळे त्या दोघांमध्ये असलेला संघर्ष... अर्थात रावघच्या दृष्टीनं हा संघर्ष व्यावसायिक असला, तरी गोपाळसाठी तो आरतीचा प्रश्न असतो. त्याला कोणत्याही स्थितीत आरती हवी असते. तशी ती त्याच्याजवळ येतेदेखील... पण!
कादंबरीच्या शेवटची प्रकरणं चेतननं जबरदस्त घेतली आहेत. एका लहानशा प्रसंगामुळे सगळंच चित्र बदलतं आणि आपल्याला लूजर-पैशांच्या मागे लागलेला-लाचखोरी करणारा गोपाळ आपलंसं करून घेतो... अर्थात इथं शेवट सांगून कादंबरी वाचण्यातली मजा हिरावून घ्यायची नाही, त्यामुळे हे वर्णन इथंच थांबवतो.

*****************************************************

कादंबरीला चेतन भगतनं दिलेला सामाजिक आशय मात्र जबरदस्त आहे. त्याची थ्री मिस्टेक्स वगळता अन्य कादंब-यांमध्ये तसा तो तितका दिसत नाही. शिक्षणाचं बाजारीकरण, भ्रष्टाचार, हे प्रकार संपवण्याची गरज, त्यासाठी झपाटलेला राघव हे सामाजिक तसंच राघव आणि गोपाळच्या द्वंद्वात अडकलेली आरती, आपल्या झपाटलेपणामुळे तिच्यापासून दूर गेलेला राघव, वाराणसीच्या आमदाराची मनस्थिती आणि मुख्य म्हणजे गोपाळ... अशा अनेक मानसिक बाबी या कादंबरीत अतिशय योग्य पद्धतीनं हाताळल्या आहेत. एकूण काय, तर ही कादंबरी (नेहमीप्रमाणे) अतिशय वाचनीय आणि चिंतनीयही झाली आहे. इंग्रजी पुस्तक वाचण्याची आवड असलेल्यांनी ती वाचली पाहिजेच.. पण तशी सवय नसलेल्यांनीही वाचायला हरकत नाही. (अन्य भारतीय लेखकांप्रमाणे) कोणतीही क्लिष्ट भाषा न वापरताही कादंबरी रंजक होऊ शकते, हे वाचल्यावर लक्षात येईलच... So... Read R2020 for sure... Happy Reading....