Friday 14 August 2009

स्वाइन फ्लू आणि पुणे

माझ्या मागच्या पोस्टमध्ये 'स्वाइन फ्लू'चा विषय थोडा सटायरिकल किंवा सरकॅस्टिक म्हणा हवंतर, पद्धतीनं लिहिलाय. म्हणजे जेम्स बॉण्ड खरंच असता तर त्यानं स्वाइन फ्लूशी लढण्याकरता काय-काय केलं असतं, असा एक कल्पनाविलास केलाय. पण त्यामुळे पुणेकर दुखावले गेलेत, असं दिसतंय.
तशी एक कॉमेंट पडली आहेच, पण माझ्या अनेक 'पुणेकर' मित्रांनी फोन करून किंवा एसएमएस पाठवून मला झापलंय.... कारण एकच... हा इतका 'सिरियस' विषय आहे आणि मी त्याची चेष्टा करतो, म्हणजे काय!!
एक तर मी मुंबईत राहतो... इथं कुठल्या क्षणी काय होईल आणि तुम्हाला घेऊन जायला दूत येतील, याचा भरवसा नसतो... त्यामुळे एकूणच मुंबईकरांची मानसिकता ही 'रेडी फॉर एनिथींग' अशी असते. "स्वाइन फ्लू आलाय का? बरं... बरं... चला कामाला लागा..." असा मुंबईकरांचा ऍटिट्यूड... पुण्यात मात्र परिस्थिती नेमकी या उलट... "पळा... पळा... स्वाइन फ्लू आला... स्वाइन फ्लू आला..." असं म्हणत तमाम पुणेकरांनी रिदा शेखच्या मृत्यूनंतर नायडू रुग्णालयाबाहेर गर्दी केली...
आता माझा जन्मच मुंबईच्या उपनगरातला... दिल्लीचे ४ महिने आणि हैदराबादची ३ वर्ष वगळता उरलेली ३० वर्षं मुंबईत गेली. त्यामुळे मी ठरवलं तरी स्वाइन फ्लूकडे पुणेकरांइतका 'सिरियसली' नाही पाहू शकत... सॉरी बॉस! पण मला या विषयाचं गांभिर्य नाही, असा याचा अर्थ काढायचं कारण नाही... मी मिडियात काम करत असल्यामुळे हा विषय कायमच गांभिर्यानं हाताळतो. त्यात थोडासा बदल म्हणून थोडा कल्पनाविलास केला, तर बिघडलं कुठं?
पुण्यात स्वाइन फ्लू सगळ्यात जास्त पसरलाय हे मान्य... त्याची कारणं काय, हे समजणं कठीण आहे. एक कारण म्हणजे रिदाच्या मृत्यूनंतर नायडू हॉस्पिटलबाहेर लोकांनी केलेली गर्दी आणि त्यातून विषाणूंचा झालेला प्रसार हे असू शकेल (माझ्या एका 'ओरिजनली पुणेकर आता मुंबईकर' मित्राला हा मुद्दा मान्य नाही... तो मित्र प्रतिक्रीया टाकेलच तशी) किंवा पुण्यातलं प्रदुषण हा असू शकेल... किंवा तिथली धड ना थंड-धड ना ऊष्ण अशी हवा हे कारणही असू शकेल. पण पॅनिक होऊन स्वाईन फ्लू कमी होईल असं नाही.... आणि मी किंवा माझ्यासारख्या कोणा सामान्य माणसानं कायम या विषयाकडे गांभिर्यानं पाहिल्यानं तो अटोक्यात येईल, असंही नाही... इतकंच ही पोस्ट टाकण्याचा उद्देश....

2 comments:

vbb said...

तुमचा लेख आवड्ला.
पुणेकरांच्या टीकेकडे आजिबात लक्ष्य देऊ नका.
काम न करता गर्दी करणे आणि फालतू बडबड करणे
ही या लोकांचि सवयच आहे.
याच पुणेकरांनि मे महिन्यात सांगितले होते कि
भारतातल्या हवामानात हे जंतू टिकणे शक्य नाहीं आणि आमची पूर्ण तयारी आहे .

HAREKRISHNAJI said...

you are absoultly right