Monday 10 August 2009

स्वाईन व्हेकेशन...!

आपल्याला गणपती-दिवाळी-नाताळ आणि मे महिना, असे चार व्हेकेशन पिरियड माहिती आहेत. पण सध्या राज्यात, विशेषतः पुण्यात 'स्वाईन व्हेकेशन' सुरू आहे. जगभरात स्वाईन फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेपासून सगळे तज्ज्ञ आपल्याला सावध करत होते. पण आपलं सरकारच ज्या गोष्टी सिरियसली घेत नाही, तिथं सामान्यांची काय कथा... आपल्याला जाग येण्यासाठी कुंभकर्णाप्रमाणे रणवाद्द्यांचा गजर करावा लागतो... असंच रणवाद्य वाजलं रिदा शेख या मुलीच्या मृत्यूमुळे... मग आपलं शासन-प्रशासन आणि लोक थोडे जागे झाले... त्यानंतर स्वाईन फ्लूनं मुंबईतही आपला पहिला बळी घेतला... पाचगणीत स्वाईन फ्लूग्रस्त झालेल्यांची संख्या पाव शतकावर पोचली होती. मग नागपूर, नाशिक, नांदेड, रत्नागिरी अशा सगळीकडून रुग्ण सापडल्याच्या बातम्या यायला लागल्या... हा मात्र सगळ्या राज्यासाठीच 'गजर' (इंग्रजित ALARM) ठरला... आणि आताचं चित्रं काय आहे...
पुण्यातल्या नायडू रुग्णालयाबाहेर लांबच लांब रांगा... प्रत्येक पुणेकराच्या तोंडाला मास्क... मुंबईतही लोकल गाड्यांमध्ये रुमाल तोंडाला बांधलेले लोक... (मुंबईत ही संख्या कमी आहे... कारणं दोन. एक तर मुंबईत पुण्याइतक्या वेगानं कोणतंच 'फॅड' पसरत नाही... आणि मुंबईकरांना स्वाईन फ्लू-बीबाबत विचार करायला वेळच नसतो... गाडी-बसमध्ये बसायला मिळेल का, हे महत्त्वाचं...!) शाळांना सुट्टी... हो... दिवाळी-गणपती-नाताळ-मे महिना यातलं काहीही नसताना शाळांना आठ दिवस सुट्टी...
पण ही सुट्टी किती आवश्यक आहे, हे रिदा शेखच्या आईवडिलांना विचारा... केवळ दुर्लक्ष्य झाल्यामुळे त्यांना आपली पोटची पोर गमवावी लागली आहे... विशेषतः लहान मुलं ही h1n1 या विषाणूची जास्त आवडती असल्यानं अशी सुट्टी आवश्यक आहेच... पण शाळेतला अभ्यास बुडू नये, यासाठी गणपती-दिवाळीच्या सुट्टीला कात्री लागणार, हे ही ओघानंच आलं. बरं... आत्ता ही व्हेकेशन एन्जॉय करता येणार का? शक्यच नाही... आत्ता मुळातच पुण्यातलं वातावरण अनेक वर्षांनी इतकं टेन्स आहे... (प्लेगची साथ किंवा खडकवासला यानंतर बहुदा आत्ताच...) अशा स्थितीत पालक आपल्या मुलांना गर्दीच्या ठिकाणी पाठवण्याची शक्यताच नाही. म्हणजे मॉल, थिएटर, पार्क, स्पोर्ट्स क्लब अशा कुठेच या मुलांना जाता येणार नाहीये. सक्तीनं घरात बसावंच लागणार... स्वाईन फ्लूनं पुण्यातल्या एका शाळकरी मुलीचा बळी तर घेतलाच... पण लाखो पुणेकर विद्यार्थ्यांच्या आठ दिवसांचाही बळी घेतलाय... पण त्याला इलाजच नाही! हा बळी घेतलाय अखेरच्या क्षणापर्यंत घोरत पडणारं आपलं प्रशासन आणि या झोपाळू प्रशासनाची झोपमोड न करणारे आपण सगळे यांनी... त्याला इलाजच नाही!!

2 comments:

Zen Joshi said...

A senryu for you


Disaster Management Committee
Sharad Pawar heads
Disaster in itself...!


Kuthe gele baramatikar?? I hope he remembers that he heads that committee...?? Mahagai tar vadhavlich ahe, ata anhin kay kay disaster karnar ahet?? Lokan ni jeevant kase rahaiche?? Dal, tandul, sakhar mahag karun tyan na hai lagnar ahe..!! :x

Ya nivadnukit ghari basavle pahijet..ya rashtravadi ani tya MBA mukhyamantrila..MBA asun neet nirnay gheta yate nahit..donation deun MBA jhala distoy!!

Buddhiheen..!!

BTW, me tumcha rashtravadi cha mukhpatra channel ajibat pahila nahi, ek tar to popular nahiyw, shivay amchya satellite tv var toh disat nahi..

mala-watala-te said...

श्री. जोशी... परखड प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे आमचा चॅनल कोणत्याही पक्षाचं मुखपत्र नाही. ही वाहिनी पाहिलीत तर ते सहज तुमच्या लक्षात येईल. पण न पाहिलेल्या वाहिनीबद्दल भाष्य करणं तितकंसं चांगलं नाही... आधी चॅनल पहा... किंवा ज्यांच्याकडे दिसतो त्यांना विचारा आणि मगच कॉमेंट करा चॅनलवर...
बाकी पोस्टवरची कॉमेंट आवडली. १०० टक्के नसलो तरी ब-यापैकी सहमत...