Sunday 28 March 2010

वड्डा शाणा छे नरेनभाई...!

काल दिवसभर नरेंद्र मोदींची चौकशी सुरू होती... गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींमध्ये गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत काँग्रेसच्या खासदाराची हत्या झाली होती... या प्रकरणी सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने, अर्थात एसआयटीने ही चौकशी केली... इत्यादी... इत्यादी... दिवसभर हेच सगळ्या चॅनलवर सुरू होतं... आज रविवार असल्याने बहुदा हेच दिवसभर चालणार... पेपरमध्ये सकाळी उठल्यावर हेच वाचणार आहोत आपण सगळे, त्यामुळे खोलात जात नाही...
आत्ता रात्रीचे २ वाजतायत. मोदींची चौकशी संपून तासभरच झालाय. पण त्याबद्दल प्रकार्षानं काही गोष्टी वाटल्या, म्हणून लगेच लिहायला बसलो...
नरेंद्र मोदींची चौकशी होणार... दंगल प्रकरणी चौकशी होणार... ही बोंबाबोंब गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खरंतर या एसआयटीनं मोदींना २१ तारखेला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यावेळी ते तिथे गेलेच नाहीत. उलट त्यांनी जाहीर पत्र लिहिण्याचा घाट घातला... त्यामुळे मोदी चौकशीला घाबरतात, अशी आरोळी दिली गेली. बरं त्यांनी लिहिलेलं पत्रही खास होतं, वैगरे नाही. साधंच... म्हणजे कायदा सगळ्यांना सारखा आहे... कायद्याचा मी मान राखतो इत्यादी...
काल मात्र त्यांनी तब्बल नऊ-साडेनऊ तास चौकशीत विचारलेल्या ६०-७० प्रश्नांची उत्तरं अधिका-यांना दिलीच. याचा अर्थ ते चौकशीला घाबरतात ही भिती अनाठायी होती, असा घ्यायचा का? पण या कृतीने त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत...
पहिला पक्षी : २१ तारखेची चौकशी टाळून त्यांनी आपणहूनच घाबरत असल्याचा देखावा उभा केला. जेणेकरून जेव्हा चौकशी होईल, त्यावेळी तिला वलय प्राप्त व्हावं आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं.
दुसरा पक्षी : एका मुख्यमंत्र्याला तुम्हाला हवं त्यावेळी चौकशीला बोलावू शकत नाही, हे त्यांनी एसआयटीला दाखवून दिलं. एसआयटी जरी सुप्रिम कोर्टानं नेमली असली तरी तिने दिलेली तारीख पाळायला ते कोर्ट नाही, हे त्यांनी जाताजाता अधोरेखित करून टाकलं.
पक्षी तिसरा : त्यांना व्हिलन बनवण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांना त्यांनी तशी पार्श्वभूमी तयार करू दिली. कारण त्यांना त्या काळ्या रंगावर स्वतःचा (म्हणजे त्यांच्या मते.... ते स्वच्छ आहेत, असं मला म्हणायचं नाही.) पांढरा रंग लख्ख उठून दिसावा...
पक्षी चौथा : इतकी मिडीया-हाईप झाल्यावर आजच चौकशी संपवायची आहे, असं सांगून तमाम हिंदी-इंग्रजी चॅनलवाल्यांना रात्री १ वाजताचं बुलेटीन लाईव्ह करायला लावलं...
स्वतःबद्दल कुतूहल निर्माण केल्यानंतर काल दोन्ही वेळा उत्तरे देऊन बाहेर पडताना ते हसतमुखाने मिडियाला सामोरे गेले... पुन्हा त्यांनी मिडियाला काही माहिती पुरवली का.... तर नाहीच! हे सुप्रिम कोर्टाचं पथक असल्यामुळे ते त्यांची माहिती कोर्टाला देतील, मला ती देण्याचा अधिकार नाही, असं सांगत त्यांनी अन्यच मुद्द्यांवर भाषणबाजी केली.
गुजरात दंगली सरकार पुरस्कृत आहेत किंवा नाही, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल पुरस्कृत (किंवा गोघ्राकांडामुळे ते भडकून उठले, असं म्हणा हवं तर) होत्या, हे मानायला जागा आहेच. संघाच्या मुशित तयार झालेले नरेंद्र मोदी प्रत्यक्षात जरी दंगलीत दगड मारत नसतील, तरी त्यांना या काळात काय घडतंय, ते माहितीच नव्हतं, असं म्हणणं भोळसटपणाचंच ठरेल. कारण एकतर मुख्यमंत्री आणि जे दंगली करत होते, त्यांना अधिक जवळ... त्यामुळे माहितीचे स्त्रोत अधिक असणारच! पण या चौकशीतून काय निष्पन्न होणार? मोदींइतका मुरलेला राजकारणी स्वतःलाच अडचणीत आणणा-या गोष्टी एसआयटीला सांगेलच, याची शाश्वती कोणी द्यायची? त्यामुळे मोदींनी स्वतःहून स्वतःभोवती वलय निर्माण करून कालच्या चौकशीचा आणखी मोठा फार्स घडवून आणला (कर्टसी - मिडिया) हेच यातील सत्य असावं, असं वाटतंय...
स्वतःविरुद्ध पडलेला एखादा फासा डाव जिंकण्यासाठी कसा वापरावा, याचं उत्तम उदाहरण मोदींनी या निमित्तानं देशातील मी-मी म्हणणा-या तमाम नेत्यांना घालून दिलं आहे, हे मात्र खरं... स्वतःच्या विरोधात मोठ्ठी हवा निर्माण करायची आणि हवा एकदा पुरेशी वाहू लागली की त्यात पतंग उडवून मौज लुटायची... ही मोदींची खेळी 'चोक्कस'च म्हणाली लागेल...
'तमे वड्डा शाणा छे.... नरेनभाई!'

Saturday 20 March 2010

माया मेमसाब...!

मायावतींचं एक बरं आहे... स्वतःचे मोठ्ठेच्या मोठ्ठे पुतळे स्वतःच उभारायचे... स्वतःला नोटांचे हार घालून घ्यायचे... आणि त्यावर कोण बोललं की 'दलित की बेटी' मोठी झालेली यांना चालत नाही, असं म्हणत गळा काढायचा...

हे म्हणजे मुंबईत राहणा-या झोपडपट्टीतल्या लोकांसारखंच आहे. रहायचं झोपडीत. आत टीव्ही, डिश टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, फ्रीज, एअर कुलर असं सगळं असतं. मग ती झोपडी पाडायला कोणी गेलं की 'बेघर केलं' असं म्हणत बोंब ठोकायची...
मायावती यापेक्षाही एक पाऊल पुढे गेल्यात. फक्त बेघर केलं असं म्हणून त्यांचं भागत नाही. बाबासाहेबांचं नाव घेत दलितला बेघर केलं, असं म्हणून सहानुभूती मिळवायची, असला हा त्यांचा उद्योग... त्या दलित घरातल्या आहेत, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आल्या असू शकतात वैगरे... सगळं मान्य.... पण जर तसं असेल तर त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी काय केलं, ते जगासमोर यायला नको का? दलित घरातून येऊन देशातल्या सगळ्यात मोठ्ठ्या राज्याचा मुख्यमंत्री झालेली ही बाई... तिनं स्वतःचे पुतळे उभे करण्यापेक्षा उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात खेडोपाडी शाळा काढल्या असत्या तर त्या गावातल्या दलित जनतेनेच त्यांचे पुतळे उभारले असते. त्यासाठी राज्य सरकारच्या किंवा गेलाबाजार पक्षाच्या तिजोरीत हात घालायची गरजच पडली नसती. पण काशिराम (सॉरी... मा. कांशिराम) यांच्या पुतळ्याजवळ स्वतःचा फूल साईज पुतळे त्यांनी स्वखर्चाने (?) उभारले.... यात जनतेचं त्यांनी काय आणि कसं भलं केलं, हे त्याही सांगू शकणार नाहीत.
पुतळ्यांचा प्रश्व अजून मिटलेला नाही. केंद्र सरकारने त्याच्या खर्चाचा तपशील शोधण्याचे आदे दिलेत. न्यायसंस्थेनंही या उधळपट्टीवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. हे संपत नाही तोच मायावतींनी बसपाच्या मेळाव्यात १००० रुपयांच्या नोटांचा हार स्वतःच्या गळ्यात घालून घेतला. कहर म्हणजे त्यावर चहूबाजूनी झोड उठल्यावरही दुस-या दिवशी आणखी एक हार घालून घेतला. आणि या कहराचा कहर म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जाहीरच करून टाकलं, 'बहेनजी जिथे जिथे जेव्हा केव्हा जातील, तिथे त्यांना नोटांचाच हार घालू...!' आता झोपडीत राहणा-या (म्हणजे खरोखरच्या... टीव्ही-फ्रीजवाल्या झोपडीत नव्हे) रंजल्या-गांजलेल्या दलिताचं मायावतींनी नोटांचे हारच हार घालून कसं भलं होणार? येता जाता बाबासाहेब-महात्मा फुल्यांचं नाव घ्यायचं आणि त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्याऐवजी विमानातून शॉर्टकट मारायचा... हे कसलं नेतृत्व.... हे कुठले नेते... यांना कोण निवडून देतं... का निवडून देतं... निवडून दिल्यानंतर 'तुम्ही असं का केलंत' हे विचारण्याचा अधिकार जनतेला नाही का... की तिने मुकाटपणे पुढली पाच वर्षं असली थेरं बघत बसायची...
मायावतींचं हार प्रकरण म्हणजे आपल्या देशाचं राजकारण किती हीन दर्जाला जाऊन पोहोचलंय, त्याचं जातिवंत आणि ताजं उदाहरण आहे.
मायावतींच्या पक्षाचे नेते सांगतात की हारासाठी लागलेला पैसा जनतेकडून गोळा केलाय... उत्तर प्रदेशातल्या जनतेकडे जर इतका पैसा असेल तर मग महागाईच्या नावाने गळा काढायचा अधिकार कोणाला उरतो... ना जनतेला, ना नेत्यांना...
यापेक्षा १० पट मोठी पोस्ट लिहिली तरी कमीच पडेल आणि इतकं लिहून मनातला संताप कमी होईल याची शक्यता नाहीच... किती लिहिणार आणि का लिहायचं, असा विचार करून इथेच थांबावं, हे बरं...

Thursday 4 March 2010

एका सस्पेन्सची अखेर...!


प्रमोद महाजन यांचा मारेकरी प्रवीण याचा अखेर अंत झाला... काही जण म्हणतात 'पापाचं प्रायश्चित्त मिळालं...,' काही जण म्हणतात 'बरं झालं गेला एकदाचा...,' पण प्रवीणच्या अकाली मृत्यूमुळे एका सस्पेन्सची अखेर झालीय, हे मात्र खरं...
प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडणारा... त्यानंतर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होणारा... आणि त्यानंतर कोर्टात 'नॉट गिल्टी' असं सांगणारा... खालच्या कोर्टानं जन्मठेप ठोठावल्यावर वरच्या कोर्टात अपिल करणारा... प्रमोद महाजन यांच्यासोबतचे प्रसंग 'माझी डायरी'च्या रुपानं शब्दांत मांडणारा... अशी प्रवीणची अनेक रुपं. त्यानं आपल्या 'डायरी'त प्रमोदला हिरो-टर्न-व्हिलन असं रंगवलंय. प्रमोद महाजनांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि संघटन कौशल्याबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही 'प्रवीणनं जे लिहिलंय ते धादांत खोटं आहे...' असं म्हणवत नाही. कारण प्रमोद महाजनांचं आयुष्यही तितकंच गूढ होतं. प्रवीणनं प्रमोदजींमध्ये बदल होण्याचं खापर विवेक मैत्रा याच्या माथी फोडलंय... राहूलबद्दल प्रवीणनं प्रमानं लिहिलंय... राहूललाही विवेकनंच बहकवलं, असा काहीसा प्रवीणच्या लेखनाचा सूर आहे. स्वयंसेवक प्रमोद आणि राजकारणी प्रमोद यांच्यातला फरक प्रवीणनं मांडलाय. त्यांची घरात चालणारी दादागिरी काहीशी भडक असली तरी त्यातला १० टक्के अंश खरा मानायला हरकत नाही.
प्रमोदजींची हत्या झाल्यापासून 'प्रवीणनं हे कृत्य का केलं...?' याची चर्चा होत राहिली. कोर्टात आणि बाहेरही प्रवीण सतत म्हणत आलाय की, त्याचं कारण तुम्हाला कधीही समजणार नाही... म्हणजे दिसतं तितकं साधं कारण नाही, हे प्रवीणनं अप्रत्यक्षपणे सुचित केलंय. या हत्येमागे घरगुती कारण असेल का? की प्रवीण प्रमोदजींचा करत असलेला अत्यंतिक द्वेष, हे कारण असेल...? की यात काही राजकीय धागे गुंतले आहेत? याचं उत्तर दोनच व्यक्ती देऊ शकत होत्या. एकतर स्वतः प्रमोदजी किंवा प्रवीण... आता हे दोघंही नाहीत.
प्रमोदजींच्या अल्प पण दैदिप्यमान आयुष्याची अखेर कशामुळे झाली, या सस्पेन्सचा शेवट झालाय... 'हा सस्पेन्स तुम्हाला कधीच कळणार नाही,' असं म्हणत सस्पेन्स वाढवणारा प्रवीणच आता इतिहासजमा झालाय...