Thursday 30 July 2009

काईच्या काई...!!!!

ए... छगन... अजित... तूम्ही कशाला भांडताय आत्तापासून... आपलं काय ठरलं होतं? थरात ज्या मंडळाचे गोविंदा जास्त असतील, त्यांचाच गोविंदा हंडी फोडायला जाणार... मग... भांडण कशाला करताय आत्तापासूनच?
जास्त शाणपणा नको करू अशोक, समजलं ना... यावेळी आमच्याच मंडळाचे गोविंदा जास्त असणार... म्हणून आम्ही ठरवतोय आमच्यापैकी कोण हंडी फोडायला जाणार ते... भांडत नाय काय...!

ह्यॅं... ठरवायचंय काय त्यात... त्या अजितचे काकाच आहेत ना मंडळाचे अध्यक्ष. ते त्यालाच वर पाठवतील हंडी फोडायला...

असं काय नाय... हे तुला कोणी सांगितलं साल्या... तुमच्यासारखं नाई आमचं. तुमच्यात त्या राहूलची आई सांगेल, तसंच करायला लागतं... मागच्या वेळी नाई हंडी फोडायला निघालेल्या विलासला काकूंनी परत बोलावलं आणि तुला सांगितलं की हंडी फोड म्हणून... असं नाय आमच्यात...

हो पण आता विलासला मोठी हंडी फोडायला पाठवलंय ना काकूंनी... म!!

आहाहाहाहा.. म्हणे हंडी फोडायला...!! खालच्या थरावर उभं केलंय विलासला... आणि पाहशीलच तू... शेवटी हंडी फोडायला राहूल जाईल विलास, सुशील यांच्या खांद्यांवर पाय ठेवत...

अजितच्या काकांचं काय झालं रे आबा... त्यांना म्हणे मोठी हंडी फोडायला जायचं होतं... तुम्ही सगळे लै गोंगाट करत होतात ते हंडी फोडणार यंदा म्हणून... हॉ... हॉ... हॉ...

दात काय दाखवतो... आमचं मंडळ छोटं म्हणून... नायतर त्यांनी कधीच हंडी फोडलीपण असती...

मंडळ छोटं असणारच... आमच्याच मंडळातून फुटून गेलात ना तुम्ही...

आयला... हा नारायण जोकच करतो... याचं कुठलं मंडळ... हा दुस-याच मंडळातून तुमच्यात आला आणि आता म्हणे आमचं मंडळ... दे टाळी...

अशोक, तू काय त्याला टाळी देतो... आता आपण एका मंडळातले ना? असं नाई करायचं... आणि आता विलासचं आणि माझं भांडण पण मिटलंय ना... हो की नाई रे कृपा...

अरे नारायण... तू पण कमालच करते... तुमचा आणि विलासचा भांडण मिटला, ते मायतेय अशोकला... म्हणूनच तर त्याला फिकर लागलीय की तू तेच्याशी तंटा करेल आता अशी... विलासला खाली उतरवला ते वक्ताला नाय का तुजा आणि अशोकचा भांडण झालेला हंडी फोडायला कोण जायचा त्यावरून... विसरला काय एवड्यात?

तो कसा विसरेल... राहूलच्या आईनं तर पत्ता कापला त्याचा... किती वेळा गेलेला त्यांच्या घरी मस्का मारायला... पण शेवटी अशोकलाच दिला ना चान्स हंडी फोडायचा...

काय रे पोरान्नो... कसली वादावादी करताय... माझ्याबद्दल काय चाललेलं...

काई नाई हो काकू... हे अजित आणि छगन आहेत ना, ते यंदा मुंबईची हंडी फोडायला कोण जाणार सगळ्यात वर त्यावरून भांडतायत... मी त्यांना सांगितलं आमचं काय ठरलंय ते... पण ऐकतच नाहीत...

भांडू दे रे अशोक त्यांना... शेवटी अजितचे काका आणि मीच ठरवणार ना तुम्हा पोरांपैकी कोणाला खालच्या थरात ठेवायचं... कोणाला मधे आणि हंडी फोडायला कोणाला पाठवायचं ते... तू कशाला लक्ष देतो त्यांच्याकडे... लांब उभा राहून गम्मत बघ ना!! ते बघ... अजितचे काका आलेच इकडे... ते बघून घेतील आता.

काय राहूलच्या आई काय झालं...

अं... काही नाही... अशोक सांगतोय की अजित आणि छगन भांडतायत म्हणून, हंडी फोडायला यावेळी कोण जाणार त्यावरून... म्हणून त्याला सांगत होते, की तुम्ही आलाच आहात, तर बघून घ्याल असं...!

हा.... या कारट्यांना सवयच आहे भांडायची... त्यांना हजारदा सांगितलंय की दुस-याकडे आल्यावर भांडत जाऊ नका आपापसात. पण ऐकत नाहीत... चला रे मुलांनो... दहा-दहा झालेत आता... चला आता आपापल्या घरी... अजून खूप वेळ आहे दहीकाला यायला... नंतर ठरवता येईल की ते... चल बाळा अजित... घरी जाऊ! सुप्रियाताई वाट बघत असेल आपली...

Monday 27 July 2009

इस 'सच'से मुझे बचाओ...!!

सध्या दोन रिऍलिटी शो गाजतायत... एक म्हणजे 'इस जंगल से मुझे बचोओ...' आणि दुसरा 'सच का सामना...' एक थोडासा फियर फॅक्टरच्या जवळ जाणारा आहे आणि 'सच का सामना' ही भारतात तरी संपू्र्ण नवी कंसेप्ट आहे. या दोन्हीबद्दल लोकांमध्ये बरी-वाईट मतं आहेत.
***************
इस जंगल से मुझे बचाओ....
काही जण जंगला गेलेत... त्या जंगलात असलेले एक महिला आणि एक पुरूष असे दोन अँकर जंगलात गेलेल्या या लोकांना अजब-गजब गोष्टी करायला लावतात... म्हणजे साप-विंचू-कोळी यांनी भरलेल्या भांड्यात डोकं घालणं... चिखलात चिंब-चिंब होऊन जाणं... इत्यादी. या गोष्टी केल्यानंतर त्यांना काही स्टार्स मिळतात आणि या स्टार्सच्या संख्येवर म्हणे त्यांना रात्री काय आणि किती खायला मिळणार, ते ठरतं.... हे म्हणजे अतीच झालं... चांगल्या खात्यापित्या घरातून ऊठून जंगलात जायचं आणि तिथं जाऊन साप-विंचवांना अंगाखांद्यावर खेळवायचं... का तर दोन वेळच्या जेवणासाठी... याला 'भिकेचे डोहाळे' असं म्हणतात मराठीत....
बरं, त्या तिथं जंगलात गेलेल्या लोकांचं ठीक आहे. पण टीव्हीवर हा तमाशा पाहणारेही अजबच म्हणायला हवेत... जे पाहिल्यावर फक्त भिती वाटू शकते किंवा किळस येऊ शकते अशा गोष्टी आपल्या घरात बसून स्वतःची वीज जाळून आणि चांगलं काही बघायचं सोडून पहात बसणारा 'विम्झिकल'च म्हणायला हवा... साप-विंचवांवर असलेले डिस्कव्हरी-ऍनिमल प्लॅनेटचे कार्यक्रम बघणं वेगळं आणि सापांनी भरलेल्या भांड्यात तोंड बुडवून बसलेला माणूस-माणसी पाहणं वेगळं... जे हा कार्यक्रम गोडीगुलाबीनं पाहतात, त्यांनी लवकरात लवकर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची भेट घ्यावी, असा एक प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतो...
(एक प्रेमाची सूचना... या कार्यक्रमात साप-विंचू यांच्याबरोबर जंगलात गेलेल्या ललनांनी धबधब्यात केलेली आंघोळही दाखवतात... इच्छुकांसाठी एकवार आवश्य भेट द्यावी आणि खात्री करून घ्यावी - पण स्वतःच्या जबाबदारीवर!!!!!)
***************
सच का सामना...
तुमच्या घरात खूप सुख-समाधान असेल... तुमच्या बायको/नव-यासोबत अजिबात भांडण होत नसेल... तुमचे आई-वडील तुमच्याबद्दल अभिमान बाळगून असतील किंवा तुमच्यावर त्यांचा खूप जीव असेल... आणि हे सगळं तुम्हाला नकोसं झालं असेल तर 'सच का सामना' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तातडीनं एसएमएस करा...
या कार्यक्रमात इतके पर्सनल प्रश्न विचारतात की आपण एकटे असतानाही त्याबद्दल स्वतःच स्वतःला विचारायला घाबरू... म्हणजे सुरूवातीला एखादा एपिसोड पाहिला आणि 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' असं झालं... काहीही विचारतात... 'दुस-या एखाद्या बाईबरोबर शारिरीक संबंध ठेवावेत असं वाटतं का?' किंवा 'तुमच्या पत्नीनं तुमच्यापेक्षा तुमच्या पैशांकडे बघून लग्न केलंय, असं वाटतं का?' यासारखे अतीअतीअतीअतीअती खासगी प्रश्न विचारतात... (आमच्या सचीन-विनोदची शाळेपासूनची मैत्री तोडली या कार्यक्रमानं...!!!) त्यामुळे संसारात सुखी असाल आणि ते सुख बोचत असेल, तर त्वरित या कार्यक्रमात सहभागी व्हा...
आता पुन्हा हा कार्यक्रम बघणारेही वरच्यासारखे 'विम्झिकल' असावेत... इंटेसिटी थोडी कमी, इतकंच... कारण दुस-याच्या इतक्या खासगी गोष्टींमध्ये डोकावून बघायला आवडणं आणि त्याचा आस्वाद घेणं, हे ही थोडंसं मानसशास्त्रीय आजार या कॅटेगरीतच मोडतं...
आपल्या आजूबाजूलाही असे अनेक जण असतात... म्हणजे कोणाकडे काय भांडणं चालल्येत... कोणाचं कोणाशी लफडं आहे... कोणाचं कोणाशी अजिबात पटत नाही... कोण कोणासोबत रहात नाही... अशा नाना चौकश्या करणारे असंख्य जण आसापास फिरत असतात. अशा लोकांनी हा कार्यक्रम आवर्जून बघावा, असा प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतोय... म्हणजे या लोकांचं आसपास लुडबूड करणं थांबेल आणि बाकीचे सुटतील... अन्यथा हा 'सो कॉल्ड रिऍलिटी शो'देखील 'न बघणे' याच कॅटेगरीतला आहे.
***************
तळटीप : सलग दोन पोस्ट 'टीव्ही' याच विषयावर येणं हा योगायोग आहे. हा ब्लॉग बातमीदार किंवा भंकसच्या वाटेवर न्यायचा आजिबात हेतू नाही, याची इच्छुकांनी ('सच का सामना'वाल्या...) जरूर नोंद घ्यावी, ही विनंती...

Saturday 25 July 2009

वेल डन... 'TV9'

शुक्रवारी रात्री 'टी.व्ही.९' या वाहिनीनं थोडासा गोंधळ केला... खरंतर हा गोंधळ कोणा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय वाहिनीनं केला असता तर तो मोठा ठरला असता. पण टीव्ही९ ही तूलनेनं नवी आणि स्थानिक स्वरुप असलेली वाहिनी असल्यानं फारसा गाजावाजा झाला नसावा... पण या वाहिनीनं खरोखर एक ब्रेकिंग न्यूज दिली ती म्हणजे मोहम्मद अजमल कसाबची सगळ्यात पहिली उलटतपासणी टीव्हीवर दाखवली...
आजवर झालेल्या सगळ्यात मोठ्या हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव अतिरेकी... कदाचित अशा फिदायीन हल्ल्यात जिवंत पकडला जाण्याची जगातली बहुदा पहिलीच केस... अशा या कसाबची पकडला गेल्या-गेल्या पोलिसांनी घेतलेली उलटतपासणी या वाहिनीनं दाखवली... इथं पुन्हा पुरातन वाद उत्पन्न होऊ शकतो, की पत्रकारितेच्या सुचितेत हे बसतं का? एका जागतिक आरोपीची उलटतपासणी अशी चव्हाट्यावर(?) मांडणं कितपत योग्य आहे... इत्यादी... (तहल्काच्या वेळी असाच वाद झाला होता...) पोलिसांनी ही टेप मिडियाकडे देणं बरोबर आहे का...?
माझ्या मते यात असलीच तर पोलिसांमधल्या कोणाचीतरी चुक आहे. एकदा टेप हातात पडली की ती एखाद्या चॅनलनं दाखवली म्हणून आरडोओरडा करण्यात काही अर्थ नाही. कारण स्पर्धेच्या काळात अशा गोष्टी हातात लागल्या तर त्या सोडून देणं मूर्खपणाचंच ठरेल... टीव्ही९ची चुक एकच झाली... ती म्हणजे इतकी मोठी स्फोटक गोष्ट हाती लागल्यानंतर त्याची पुरेशी जाहिरात न करता त्यांनी ही बातमी एअर केली... त्यांनी कदाचित जाहिरात केलीही असेल, पण ती पुरेशी पडली नाही. कारण ब-याच जणांना दुस-या-तिस-या दिवशी याबद्दल विचारल्यावर समजलं, की त्यांना हा विषयच माहित नव्हता... याचा अर्थ टीव्ही९ योग्य जाहिरात करण्यात कमी पडली, असं म्हणायला हवं.
आता थोडंसं या फुटेजविषयी... यात कसाब हा किती मुरलेला गुन्हेगार आहे, हे स्पष्ट दिसत होतं. चौकशीला सामोरं जाण्याचं व्यवस्थित ट्रेनिंग त्याला देण्यात आलं होतं. जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात असतानाही तो अतीशय शांतपणे उत्तरं देत होता. यात त्यानं आपण पाकिस्तानातून आल्याचंच स्पष्ट म्हंटलंय. आपल्याला ट्रेनिंग कसं दिलं गेलं... एक कोणीतरी 'आका' त्याला कसा भेटत होता. तो कसा रहात होता... कसा वागत होता... आपण भारतात कसे आलो... बोट कशी बदलली... सगळं-सगळं त्यानं सांगितलंय.
आता प्रश्न हा येतो, की जी टेप मिडियाला मिळू शकते, ती टेप भारत सरकारनं पुरावा म्हणून पाकिस्तानला दिली नाही, हे कसं मानता येईल. ती दिली नसेल, तर यात दिल्लीतल्या कोणीतरी 'बाबूगिरी' केली असावी आणि दिली असेल तर हा पुरावा नाकारण्यासारखा आजिबात नाही. भारतानं दिलेले पुरावे मराठीत असल्यानं भाषा कळत नसल्याची बोंब पाकिस्ताननं मारली होती. या टेपमधली कसाबची उत्तरं 'इन्शाल्ला' ऊर्दूत आहेत. मग यात भाषा कळायचा प्रश्न कुठे येतो?
एकतर विरोधी पक्षांचा मिडिया सेल झोपलेला असावा किंवा त्यांना टीव्ही९नं दिलेल्या या बातमीचा अर्थ कळला नसावा. 'ही टेप पाकिस्तानला दिली गेली नाहिये का?' असं देशप्रेमाची जाहिरात करणा-या या विरोधी पक्षांनी सरकारला खडसावून विचारायला हवं... पण गेल्या दोन दिवसांत तशी काही हाचचाल झालेली नाही... झाली असेलच तर दिसलेली नाही...
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून 'टीव्ही९'नं त्यांचं काम चोख बजावलंय... एक पत्रकार या नात्यानं त्यांचं अभिनंदन करायला हवं... आता यातून उपस्थित होणा-या प्रश्नांची उत्तरं सरकारकडे मागणं विरोधी पक्षांचं काम आहे. ते हे काम कधी करणार हा प्रश्न आहे.

Thursday 23 July 2009

अमेरिकेची मग्रुरी आणि बोटचेपं सरकार....

अमेरिकेच्या कॉण्टिनेन्टल एअरलाईन्सच्या कर्मचा-यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या खास 'अमेरिकन मग्रुरी'चं प्रदर्शन घडवलं... भारतातलं सगळ्या आदरणीय व्यक्तिमत्व असं ज्यांना आपण म्हणू शकतो अशा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची एखाद्या सर्वसामान्य प्रवाशासारखी तपासणी केली. हे करताना कंपनीनं भारतीयांचा अपमान तर केलाच पण सगळे प्रोटोकॉल्स खुंटीला टांगून एका माजी राष्ट्रपतींना आमच्या लेखी किंमत नाही, हे दाखवून दिलंय. हा प्रकार जितका लाजीरवाणा तितकाच आपल्या सरकारच्या 'म्याऊं....'पणाचं प्रदर्शन घडवणारा आहे. (माफ करा... पण 'म्याऊं'पणाला पर्यायी शब्द सुचत नाहीये....! म्हणजे दिल्लीच्या गल्लीत शेर... पण बाहेरच्यांसमोर मांजर... असं आहे.)
कॉण्टिनेन्टल एअरवेज ही अमेरिकन कंपनी... 9/11चा हल्ला झाल्यानंतर या देशाला अतिरेक्यांचा धोका आणि सुरक्षेचं महत्त्व समजलं. त्याआधी कितीतरी वर्ष भारतात पाक-पुरस्कृत अतिरेकी तांडव घालतायत... पण पाकिस्तानला सतत पाठीशी घालणा-या अंकल सॅमला ते कधी दिसलं नाही. 9/11नंतर मात्र त्यांच्यातला 'ग्लोबल पोलिस' अचानक जागा झाला आणि जगात सगळीकडे त्यांनी आपला 'पोलिसी खाक्या' दाखवायला सुरूवात केली... इराक, अफगाणिस्तानावर युद्ध लादलं... पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात सैन्य घुसवलं...
याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की अमेरिका आणि अमेरिकन नागरिक स्वतःला सगळ्यात असुक्षित समजतात... ही एक प्रकारची विकृती आहे. सगळं जग आपल्याला नेस्तनाबूत करायला टपलेलं आहे, असंच कायम त्यांना वाटत असतं. या विकृतीला 9/11च्या हल्ल्यांनी प्रचंड खतपाणी घातलं आणि त्यातूनच ताकदीच्या जोरावर जगाला नाचवायला अमेरिकेनं सुरुवात केली. डॉ. कलाम यांची तपासणी करणारे कॉण्टिनेन्टल अधिकारीही याच विकृतीचे बळी आहेत. अन्यथा एक माजी राष्ट्रपती... जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असलेले कलाम 'अतिरेकी'ही असू शकतात... त्यांची नखशिखांत तपासणी केलीच पाहिजे... असं या अधिका-यांना वाटायचा संभव नाही... ही विकृती इतकी विकोपाला गेल्ये की, याची बोंबाबोंब झाल्यानंतर कंपनीनं 'हा रुटीन चेकअप आहे... त्यात वाईट वाण्यासारखं काही नाही...' असा शहाजोगपणा दाखवला. शेवटी प्रकरण फारच पेटणार असं लक्षात आल्यावर डॉ. कलाम यांना माफीपत्र पाठवल्याचं सांगून वेळ मारून नेली. पण डॉ. कलाम यांनी आपल्याला असं कुठलंही पत्र मिळालं नसल्याचं स्पष्ट करून कंपनीची लक्तरं काढली... आता चेंडू पुन्हा कंपनीच्या कोर्टात आहे...
पण माझ्या मते खरंतर हे प्रकरण फार वाढवू नये... मुळात अमेरिकन सरकार आणि अमेरिकन कंपन्या यांची मानसिकताच बदलण्याची गरज आहे. 'ईस्ट इंडिया कंपनी'ची वागणूक आणि या अमेरिकन कंपन्यांच्या वागणूकीत कमालीचं साम्य आहे. "डॉग्ज अँड इंडियन्स नॉट अलाऊड...." अशा पाट्या स्वातंत्र्यापूर्वी लावल्या जायच्या... हे थोडं सौम्य झालं असलं तरी एकूण भावना तीच आहे... मानसिकता तिच आहे...
जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असताना अधिकृत दौ-यावर अमेरिकेत गेले होते. तिथंही त्यांची अशीच (किंबहुना अधिक मानहानीकारक) तपासणी अमेरिकेच्या अधिका-यांनी केली होती. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन नुकत्याच भारतात येऊन गेल्या. जर त्यांना इथल्या यंत्रणांनी अशीच वागणूक दिली असती, तर अमेरिकेनं ते प्रकरण इतकंच लाईटली घेतलं असतं का? पाचवीतला मुलगाही सांगेल की, अमेरिकेनं असं काही झालं असतं तर आंतरराष्ट्रीय बोंबाबोंब केली असती. भारत सरकारनं मात्र कॉण्टिनेन्टलला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यापलिकडे काहीच केलेलं नाही. त्यामुळेच 'अमेरिकेनं डॉ. कलाम आणि भारतीयांची जाहीर माफी मागावी,' ही फर्नांडिस यांनी केलेली मागणी अतिशय रास्त आहे. अमेरिकेच्या मग्रुरीला कोणीतरी चाप लावायलाच हवाय... आणि ते काम सध्या भारत आणि चीन सोडून कोणीच करू शकत नाही, याचीही मला वैयक्तिकरित्या खात्री आहे.... पण त्यासाठी बोटचेपं धोरण सोडून सरकारनं आपला कणा ताठ करण्याची गरज आहे....

Tuesday 21 July 2009

एक पत्र मनातलं...

अप्रिय आणि घृणास्पद असलेल्या,
मोहम्मद अजमल आमीर कसाब....
ब-याच दिवसांपासून तुला पत्र लिहावं, असं मनात होतं. पण मुहूर्त मिळत नव्हता... (तुला मुहूर्त समजणार नाही... 'अच्छा वक्त' आला नव्हता असं समज...!) पण काल तू चक्क अचानक तुझा गुन्हा कबुल केलास आणि मग ठरवलं की ही चांगली संधी आहे, पत्र लिहायची.... मग आळस झटकून पत्र लिहायला बसलोय...
कसाब, अरे तू पहिल्यांदा आमच्या देशात आणि त्यापेक्षाही आमच्या मुंबईत आलास, तो चोरून. म्हणजे पासपोर्ट-बिसपोर्ट काही न घेता... मुळात तू आलास तेव्हा शुद्धीत होतास की नाही, अशी शंका येते. कारण जरी तू शस्त्रसज्ज होऊन आला असशील आणि तथाकथित 'जिहादी' असशील आणि इथून जिवंत परत जाणं शक्य नाही हे तुला माहित असेल, तरी तू मूर्खपणा केलास. याचा अर्थ तू आमचं सैन्यदल, आमचे पोलिस आणि आम्ही सगळे.... 'किस झाड की पत्ती...' आहेत, असं मानत असला पाहिजेस. किंवा पाकिस्तानात ताठ मानेनं फिरणा-या तुझ्या गुरूंनी तुझ्या मनात तसं भरवलं असेल... तुला म्हणे त्यांनी सांगितलेलं की हल्ला करा... माणसं मारा... मग परत या! तू ते खरं मानलं असशील तर तू खरोखर मूर्खांच्या नंदनवनातून आला असला पाहिजेस... एका अर्थी ते खरंही आहे. कारण तुला असं सांगणारे गुरूही मुर्खांच्या नंदनवनाचे केअरटेकर म्हणायला पाहिजेत... म्हणजे एक तर त्यांना खरंच वाटत असेल की तुला आणि तुझ्या ९ मित्रांना परत बोलावता येईल किंवा तुम्ही सगळे मारले जाल आणि मग आपली सगळी काळी कृत्य कायमची झाकली जातील, असं वाटत असेल! तुम्ही हल्ला केल्यानंतर दोन तासात तुला बेड्या ठोकून मुंबई पोलिसांनी हा मूर्खपणा असल्याचं सिद्ध केलंच आहे...
ते असो... तर तू पकडला गेलास आणि तुझ्यावर रितसर खटला सुरू झाला... पहिल्या दिवशी तू 'नॉट गिल्टी' किंवा 'कबुल नही...' असं सांगून आम्हाला बुचकळ्यात टाकलंस... म्हणजे आम्हाला हे समजेना की ज्या माणसाचा मशीनगन चालवतानाचा स्पष्ट फोटो जगभरातल्या मिडियानं छापला, तो माणूस म्हणतो की मी काहीच केलेलं नाही... 'असं कसं होऊ शकतं' असा प्रश्न आमच्या भोळ्या मनाला पडला होता. त्यानंतर ही केस सुरू झाली. मिडियातून उज्ज्वल निकम यांनी एका सूरात दिलेली रोजच्या खटल्याची माहिती पुन्हा एकदा ऐकायला येऊ लागली. (यापूर्वी तुझ्याच पूर्वजांनी १२ मार्च १९९२ला घडवलेल्या स्फोटांच्या केसवेळी निकम रोज झळकायचे...) रोज तुझ्याबद्दल नवनव्या गोष्टी कळत होत्या. तू म्हणे तुला जिवंत पकडताना शहीद झालेल्या तुकाराम ओंबाळेंचं नाव ऐकलं की हासतोस कोर्टात... (तुला सांगतो हे वाचलं त्या क्षणी तुझ्या तोंडावर थुंकण्याची तीव्र इच्छा झाली होती.) मधेच काहीतरी कुराण वाचायचं फॅड काढलेलंस... किंवा मध्येच आपल्याला मराठी येऊ लागल्याचं सांगून कोर्टाला बुचकळ्यात पाडलेलंस.... हे असले बालिश चाळे करताना अचानक गुन्हा कबुल करायची बुद्धी तुला अल्लाहनं कशी दिली...?
खरं सांगू का कसाब... तु गुन्हा कबुल कर किंवा करू नको... आम्हाला काही फरक पडत नाही. तु तो कबुल केला नसतास तर आम्ही तो सिद्ध करत आणलाच होता. त्यामुळे तु कबुली देऊन फार महान काम केलयंस, असं मानू नकोस! तुझ्या कबुलीजबाबाशी आम्हाला काही देणंघेणं नाही... तुला फासावर लटकलेला पहायची इच्छा आम्ही कधीपासून बाळगून आहोत. आता तू गुन्हा कबुल केलास म्हंटल्यावर तथाकथित मानवाधिकार आंदोलनवाले गळा काढतील की, आता कबुल केल्यावर फाशी कशाला... किंवा तिकडे पाकिस्तानातले तुझे भाऊबंद हा धागा पकडून आंतरराष्ट्रीय गोंगाट करतील.... पण आता हे मानवाधिकारवाले आणि तुझे देशवासी यांच्या म्हणण्याला आमच्या लेखी काही किम्मत नसेल... तुला फासावर लटकलेला बघावं किंवा किमान तशी बातमी ऐकवी-वाचावी अशी आमची तीव्र इच्छा आहे आणि ती पूर्ण होणार आहे.

तुमचा हा हल्ला पूर्णपणे फसलाय... भले तुम्ही आमची बरीच माणसं मारली असाल... आमच्या मुंबईतल्या तीन इमारतींचा ताबा भले तीन दिवस स्वतःकडे ठेवला असाल... असं करून तुम्हाला वाटलं असेल की 'लढाई जिंकलो' तर तो बावळटपणाच म्हणायला हवा... कारण शेवटी 'युद्ध' आम्हीच जिंकलोय... तुझ्या ९ साथीदारांना 'जहन्नुम'मध्ये आणि तुला गजाआड पाठवून... (तुम्हाला वाटलं असेल की अशा हल्ल्यात मेलो तर 'जन्नत'मध्ये जाल म्हणून... पण निरपराध आणि निःशस्त्र बेसावध लोकांना ठार करण्याचा 'पुरूषार्थ' केल्यावर अल्लाह स्वर्गात पाठवणं शक्य नाही तुम्हाला... तुझे साथीदार नक्की नरकात गेले असतील...) आणि असे हल्ले करून आमचा देश तुटेल, हे तुमचं स्वप्नही नेहमीप्रमाणे मातीमोल ठरलंय... उलट या तुमच्या हल्ल्यानं आमचा देश कधी नव्हे इतका जवळ आलाय... देशातले सगळे... हिंदू-मुस्लिम-शिख-ख्रिश्चन-ज्यू-बौद्ध सगळे, सगळे एक झालेत.... तुझ्यासारख्या नराधमाला फासावरच लटकवायला हवं, याबद्दल कोणाचही दुमत असायचं कारण नाही...! असणारच नाही....!! नाहीच आहे!!!

त्यामुळे आता गुन्हा कबुल केलाच आहेस, तर लवकरात लवकर 'जहन्नुम'मध्ये जायला सिद्ध हो... (आता तुझ्या भाईबंदांनी आमची विमानं पळवली, तरी तुला सोडणार नाही...!) आणि जमलं तर केलेल्या पापांबद्दल अल्लाहची माफी माग... पण तुझा अपराध इतका मोठा आहे, की अल्लादेखील तुला क्षमा करणार नाही... बाकी आता इथंच थांबतो...
जय हिंद...
कधीच तुझे नसलेले...,
भारतीय नागरिक

Sunday 19 July 2009

एक (काल्पनिक) संवाद....!

(स्थळ : ओव्हल ऑफिस, व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
वेळ : आजपासून पाच-सहा दिवसांनी...
दृष्य : खाली दिलेल्या फोटोत दिसतंय... अगदी तस्सच...)

  • हिलरी : (घाम पुसत) दमले बाबा... पाच दिवसांनी घरी परत आल्यावर कसं बरं वाटतंय...
  • ओबामा : का? इतकं दमायला काय झालं? मी नाही का सगळीकडे जात वेगवेगळ्या समिट-बिमिटसाठी.
  • हिलरी : हं... तू तरूण आहेस लेका. माझं वय झालंय आता आणि आधीही मी बिलबरोबर अशीच फिरलीय जगभर. आता कंटाळा येतो परत परत तिथंच जायचा.
  • ओबामा : बरं... बरं... पण भारतभेट कशी झाली तुझी? मजा आली की नाही?
  • हिलरी : छ्छे... मजा कसली? नुसती माणसं... माणसं... माणसं... कंटाळा आला इतकी माणसं पाहून. जिकडे जावं तिकडे नुसती गर्दी... वैताग... तुला आता सांगते, मी पुढला महिनाभर तरी आजिबात गर्दीत जाणार नाही...
  • ओबामा : अरे... फारच वैतागलेली दिसतेस. ते जाऊ दे. तुझ्या भेटी-गाठी कशा झाल्या ते बोल...
  • हिलरी : हाँ... त्या ठिकठाक झाल्या. मुळात आपल्या देशातला कोणीही भुक्कड नेता भारतात गेला तर ते लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचायचंच बाकी ठेवतात. मी तर साक्षात परराष्ट्रमंत्री... आपण कुठे बाहेरचा कोणी नेता आला तर त्याचा इतका उदो-उदो करतो... त्यांची गुलामगिरीतली सवय जात नाहीये अजून. गोरा माणूस दिसला, की हे लागलेच नाचायला. आता तू गेलास तरी नाचतील म्हणा, काळा असलास तरी... (हसते)
  • ओबामा : अरेच्च्या... माझ्या रंगावर कशाला घसरतेस. मनमोहनसिंग भेटले की नाही? काय बोलले?
    हिलरी : भेटले रे... मी गेले आणि ते नाही भेटले, असं कसं होईल. पण ते तेव्हा काय बोलले समजलं नाही नीटसं. नंतर टीव्हीवर बघितल्यावर समजलं ते काय म्हणाले ते! फार हळू आवाजात बोलतात बाबा ते...
  • ओबामा : अरे व्वा...! पण मग बोललात कसे काय तुम्ही?
    हिलरी : म्हणजे काय? मी ठरवूनच गेले नव्हते का जाताना तुझ्यासोबत बसून. बिलनंही काही टिप्स दिल्या होत्या निघताना विमानतळावर... ते नेहमीचंच तुणतुणं वाजवलं... भारत-पाकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नात आम्हाला पडायचं नाही... काश्मीर प्रश्नावर लवकर तोडगा काढा... आम्ही दहशतवादाचा नायनाट करू... कोणत्याही परिस्थितीत जगातले सगळेच्या सगळे अतिरेकी संपवणार... अणूकरार कसा चांगला आहे... वगैरे... वगैरे... दुसरं काय बोलणार मी?
  • ओबामा : आणि मुंबईची ट्रीप कशी झाली? ताजमध्येच उतरलेलीस ना?
  • हिलरी : हो ना... पहिल्यांदा मला बाई टेंशनच आलेलं तिथं गेल्यावर. पण नंतर सावरले. तिथं सगळ्यात जास्त गर्दी होती बाबा बराक... जाम वैतागलेय गर्दीला...
  • ओबामा : पुन्हा गर्दी-पुराण नको सुरू करूस... एकूण काय, तुझा हा दौरा भलताच यशस्वी झाला म्हणायचा?
    हिलरी : हो... असं म्हणायला हरकत नाही... म्हणजे किमान मिडियासमोर बोलताना तरी तसंच म्हणायला हवं. पण खरं सांगू का मिस्टर प्रेसिडेंट... असला कुठलाच दौरा यशस्वी होत नसतो. आपल्याला काय हवं ते आपण करणार, त्यांना काय हवं ते ते करतात... थोडाफार व्यापार-बिपार वाढतो. आपल्या आणखी काही कंपन्यांना धंदा मिळतो... त्यांना थोडीफार विमानं-शस्त्रबिस्त्र द्यायला लागतात... इतकंच... बाकी १० वर्ष फर्स्ट लेडी म्हणून मिरवलं तरी दौरा यशस्वी झाला म्हणजे नेमकं काय झालं, हे मला अजूनही समजलेलं नाहिये बाबा... तुला पण समजेल ते हळूहळू... लहान आहेस अजून...
  • ओबामा : हं... असो... तुझ्या प्रेस कॉन्फरन्सची वेळ झालीय ना? चल पळ... हे अमेरिकेतले पत्रकार आहेत. तुझ्यासाठी तासन्तास थांबणार नाहीत... भारतातून आलीस तर तिथल्या नेत्यांसारखी वागू नको आपलं महत्त्व वाढवण्यासाठी मुद्दाम उशीर करून... निघ पटकन....
    हिलरी : हो रे बाबा... पळते. चल भेटू परत कॅबिनेटच्या वेळी नाहीतर काँग्रेसमध्ये.... अच्छा... (घाईघाईनं ओव्हल ऑफिसबाहेर पडते.)
(हा संवाद संपूर्ण काल्पनिक आहे. भारतीय किंवा भारतीय नेते यांची मनं दुःखवायचा लेखकाचा कोणताही हेतू नाही....)

Thursday 16 July 2009

मुंबई हल्ल्यातल्या मृतांना 'श्रद्धांजली!'

इजिप्तमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना भेटल्यावर नेहमीचाच कडकपणा दाखवणंही पंतप्रधान मनमोहन सिंगांना आवश्यक वाटलं नसावं... म्हणूनच अतिरेक्यांवरची कारवाई दोन्ही देशांच्या चर्चेआड येऊ द्यायची नाही, यावर गिलानी यांच्या सुरात सूर मिळवत सिंग यांनी 'भारत-पाक भाई भाई'चा राग आळवलाय. 'अतिरेक्यांवर कारवाई दोन्ही देशांच्या चर्चेआड येऊ द्यायची नाही...' याचा अर्थ 'पाकिस्ताननं मुंबई हल्ल्यांतल्या दोषींवर कारवाई नाही केली तरी चालेल.... पुढल्या काळात पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेले (त्यांच्याच लष्कराकडून) अतिरेकी भारतात शिरले आणि इथली निरपराध माणसं मारली तरी चालेल.... काश्मीरमध्ये दहशतवाद रोज थैमान घालत असेल तरी चालेल.... भारत आणि पाकिस्तानची चर्चा सुरूच राहील...' असा घ्यायचा का?
विकास आणि गरीबी निर्मुलन हे मुद्दे दहशतवादापेक्षा महत्त्वाचे आहेत की नाही, हा वादाचा विषय असू शकतो. पण पाकिस्तानचा विकास आणि तिथलं गरीबी निर्मुलन हे भारतातल्या दहशतवादापेक्षा महत्त्वाचे विषय नाहीत, हे मान्य करायलाच हवं, नाही का? आता विकास आणि गरीबी हटवण्यासाठी कोणाला कोणाची गरज आहे, याचा थोडा जरी विचार केला, तरी भारतानं या मुद्द्यावर पाऊलच काय, बोटभरही मागे यायची गरज नाही, हे स्पष्ट आहे. उलट पाकिस्तानला विकासासाठी भारताची मदत हवी असेल तर आधी दाऊद, हाफीज सईद यांच्यासह यादीतल्या सगळ्या अतिरेक्यांना भारताच्या हवाली करायला हवं, असं ठणकाऊन सांगितलं पाहिजे. ते राहिलं दूरच... पण 'अरे... हो... हो... हो... तुम्ही नाही केलात अतिरेक्यांचा बंदोबस्त तरी चालेल हं पाकिस्तान.... आपण की नाही विकासाच्या मुद्द्यावर बोलतच करतच राहू हं...' असं लाडिकपणे सांगण्याचा हा प्रकार झाला. मनमोहन सिंगांना याची काय गरज होती?
चर्चा थांबवून अतिरेकी पकडले जात नाहीत, हे देखील खरं... पण उभयपक्षी संपर्क थांबवला की त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होते आणि मग अमेरिकेसह सगळेच 'दादा'लोक पाकिस्तानवर दबाव आणू शकतात... ते आणत नाहीत तो भाग निराळा पण किमान तशी शक्यता तरी असते. आता काही झालं तरी चर्चेची गु-हाळं चालूच ठेवायची, असं ठरवल्यावर या देशांवर दबाव टाकण्याचा एकमेव मार्ग आपण बं करून टाकतोय, याचा विचार मनमोहन सिंगांनी केलाच नसेल काय? की आपण कसे सहिष्णू आहोत, हे जगाला दाखवण्याचा हा आणखी एक प्रयत्न समजायचा...
खरंतर ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याच्याशी बोलायला हवं... पाकिस्तानला ही सामोपचाराची भाषा म्हणजे भारताचा कमकुवतपणा नाही, तर मोठेपणा आहे, हे समजणार का? का तरीही पाकिस्तानात राजसोस फिरणारे पुन्हा एकदा मुंबईत अतिरेकी पाठवून थैमान घालायला मोकळे आणि आपण मात्र चर्चा करत राहणार विकासाची... पंतप्रधानांनी उचललेलं हे पाऊल म्हणजे मुंबई हल्ल्यातल्या मृतांना वाहिलेली 'आगळी श्रद्धांजली' ठरू नये, इतकंच वाटतंय. मुंबईतल्या निरपराध १६० जणांच्या रक्तात हात माखलेल्या हाफीज सईदसह सगळ्यांना भारतात आणून शिक्षा दिली गेली, तरच ती श्रद्धांजली खरी मानता येईल. पाकिस्तानात नुसतं शिक्षेचं नाटक करून काय उपयोग?

Monday 13 July 2009

घरच्या मैदानात करूण लढत...

ऍशेस... ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन सगळ्यात जुन्या 'मैदान-शत्रुं'ची लढत! १८८२ साली इंग्लंड ऑस्ट्रेलियासोबत घरच्या मैदानात पहिल्यांदाच कसोटी मालिका हारली आणि त्यानंतर 'स्पोर्टींग टाईम्स' या वृत्तपत्रानं बातमी चालवली की, "काल ओव्हलला इंग्लंडच्या क्रिकेटवर अंत्यसंस्कार झाले आणि त्याची राख ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलीय..." या खेळाचं माहेरघर असलेल्या इंग्लंडमधल्या क्रिकेटची राख अशा पद्धतीनं कांगारूंना 'अर्पण' केल्यानंतर या दोन संघांमधल्या कसोटी मालिकेच्या चषकाचं नावच या राखेवरून पडलं... ऍशेस...
***************
सध्या पुन्हा एकदा इंग्लंडच्या मातीत हीच ऍशेस मालिका खेळवली जातेय. काल ऑस्ट्रेलियाच्या हातून घास निसटला. पाचव्या दिवसात शेवटच्या ११.३ ओव्हर्स शिल्लक असताना इंग्लंडचे ९ फलंदाज तंबूत परतले होते आणि त्यावेळी इंग्लंडची दोन्ही डावांमधली बेरीज ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डाव्यातल्या रन्सपेक्षा सहानं कमी होती. इंग्लंडच्या शेपटाकडचे फलंदाज जेम्स अँडरसन आणि मॉंटी पनेसर हे दोघं क्रिझवर होते. त्यांनी तब्बल साडेअकरा ओव्हर्स कांगारूंचा मारा सहन केला आणि ऑस्ट्रेलियाच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. अँडरसननं २१ आणि पनेसरनं ७ धावा केल्या असल्या तरी त्यांच्या धावांपेक्षा त्यांनी खेळून काढलेल्या चेंडूंचा आकडाच अधिक महत्त्वाचा ठरला आणि सामना अनिर्णित राहिला.
***************
आजच्या सगळ्या ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रांनी ब्रिटिश कॅप्टन अँड्रू स्ट्रॉस यानं 'रडीचा डाव' खेळल्याची बोंबाबोंब केली. एका अर्थी ते खरंही आहे. प्रत्येक ओव्हरनंतर इंग्लंडचा १२वा खेळाडू काही ना काही निमित्तानं मैदानात येत होता... एकदा त्यांचा फिजियोथेरपिस्ट (कोणाला काही झालेलं नसताना) मैदानात ला आणि परत गेला... यामागे ६.५० वाजेपर्यंत कमीत कमी षटकं टाकली जावीत, असा स्ट्रॉसचा प्रयत्न होता, हे उघड नाही काय? कारण जास्तीत जास्त षटकं टाकता यावीत, यासाठी रिकी पाँटींगनं सगळी षटकं स्पिनर्सकडे सोपवली होती. पाँटिंगनं स्ट्रॉसच्या या प्रयत्नांची खिल्ली उडवली असली तरी त्यात हातून सामना निसटल्याचा कडवटपणा काठोकाठ भरलेला होताच आणि तो असणारच....
***************
एकेकाळी क्रिकेट जगतावर राज्य करणा-या 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'नं आपला मुकूट उतरवून ठेवण्याची वेळ आली आहे, हे या निमित्तानं सिद्ध झालं. भले स्ट्रॉसनं वेळकाढूपणा केला असेल, पण सामन्याच्या शेवटच्या साडेअकरा ओव्हर्समध्ये दहावा फलंदाज बाद करता आला नाही, हे कांगारू गोलंदाजांचं अपयश नाही का? भरवश्याच्या ऑस्ट्रेलियन फास्टर्सवर अविश्वास दाखवत जास्तीत जास्त ओव्हर्स पदरात पाडून घेण्याच्या मिशानं पाँटिंगनं अगदी नॉर्थलाही बॉलिंग दिली. हा देखील एका अर्थी रडीचा डावच नाही काय?
***************
भले सामना वाचवल्याच्या आनंदात ब्रिटिश खेळाडू, मिडिया आणि लोक असतील, पण त्यांनी फार हुरळून जाण्यासारखं काय घडलंय, ते समजत नाही. एक तर घरच्या मैदानात सामना वाचवण्यासाठी (जिंकण्यासाठी नव्हे... अनिर्णित ठेवण्यासाठी) इतकी जिवापाड मेहनत करावी लागणं काही चांगलं नाही! अँडरसन आणि पनेसर हे दोघे सोडले तर इंग्लंड संघातलं कोणीही कौतुकाला पात्र नाही. गर्दीनंही शेवटचा प्रत्येक डॉट-बॉलही चिअर केलाच की.... (या दोघांचं कौतुकही शेवटच्या ११.३ षटकांसाठी.... आधी गोलंदाजी करताना त्यांनी लावलेले दिवेच ऑस्ट्रेलियाला साडेसातशेवर घेऊन गेले होते. ) स्ट्रॉसनं खेळलेला तथाकथित 'रडीचा डाव' हा सामना वाचवण्याचा शेवटचा (यशस्वी) प्रयत्न होता. तो त्याच्या जागी कोणीही केला असता. [इतिहास - १९८१ साली झालेला न्युझिलंड-ऑस्ट्रेलिया वन-डे मालिकेतला निर्णयाक सामना आणि न्युझिलंडला सामना टाय करण्यासाठी शेवटच्या चेंडूवर एक सिक्स हवी होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ग्रॅग चॅपलनं गोलंदाजी करत असलेला आपला भाऊ ट्रिव्हर याला चक्क अंडरआर्म बॉल टाकायला सांगितला आणि त्यानं तो टाकलाही... हा रडीचा डाव नाही का मिस्टर ऑस्ट्रेलियन मिडिया?] तरीही सामना वाचवल्याबद्दल इंग्लंडचं कौतुक कशाला करायचं. हेच जर ऑस्ट्रेलियाच्या मातीत घडलं असतं तर ठिक होतं... पण होम ग्राऊंडवर इतक्या करूणपणे सामना वाचवणं म्हणजे इंग्लंड 'ऍशेस'मधून अद्याप बाहेर पडलेला नाही, हे खरं...! आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटनंही त्याच ऍशेसमध्ये जाण्याची वेळ जवळ आलीय, हे ही खरं...!! या निमित्तानं कार्डिफच्या स्टेडियममध्ये बसलेल्या १६,००० ब्रिटिश प्रेक्षकांना 'एका करूण सामन्याचा करूण शेवट' बघायला मिळाला...

Thursday 9 July 2009

कोण म्हणतं 'नावात काय आहे?'

शेक्सपियर म्हणालेला म्हणे... की "नावात काय आहे?" पण गोष्ट ऐकली आणि पुन्हा हा प्रश्न विचारायची त्याची हिम्मतच झाली नाही... कारण प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं "नावात राजकारण आहे....!" तुम्हीही ऐका ही गोष्ट, म्हणजे तुम्हाला पटेल की शेक्सपियरनं केवढी मोठी चूक केलेली ते....
***************************
एक नगर होतं किंवा असं म्हणा की महानगर होतं. राष्ट्राच्या अर्थव्यवहारांची राजधानी आणि त्या राज्याची खर्रीखुर्री राजधानी. अर्थात राज्य म्हंटलं की महाराज हवेतच... पण इथं महाराज हे लोकशाही पद्धतीनं निवडून आले होते. म्हणजे ज्या गटाला जास्त मतं मिळतील, त्या गटाचा सम्राट (सध्या सम्राज्ञी) महाराज कोण होणार ते ठरवतो, कधीही महाराज बदलतो, आधीच्या महाराजांना प्रधान करतो... अशी निखळ लोकशाही या राज्यात होती. तर सांगायची मुद्दा असा की, महाराजांनी समूद्रावर मोठ्ठाच्या मोठ्ठा सेतू बांधला एकदा. त्याच्या उद्घाटनाचा एक जंगी कार्यक्रम महाराजांनी घडवून आणला. महाराजांनी या कार्यक्रमात आपल्या आणि मित्रांच्या गटांमधल्या मोठमोठ्या नेत्यांना बोलावलं होतं. अशाच एका मित्रपक्षाच्या सगळ्यात मोठ्ठ्या प्रधानानं (ज्याची सम्राट व्हायची इच्छा होती...) खुद्द महाराजांच्या गटाच्या एका कैलासवासी सम्राटांचं नाव सेतूला द्यावं, असं सुचवलं... एक तर महाराजांच्याच गटाचा कै. सम्राट आणि त्यात त्या सम्राटांची बेगम आणि आत्ताची सम्राज्ञी स्वतः त्या कार्यक्रमात हजर... मग महाराजांची काय टाप आहे 'नाही' म्हणायची... झालं. या कार्यक्रमाला बोलावलं नाही, म्हणून विरोधी गटातले सगळेच गाल फुगवून बसले होते. त्यात हे 'नाव-रामायण' झाल्यामुळे त्यांना ऐतीच संधी मिळाली महाराजांवर आगपाखड करायला. या गटानं थोडी बोंबाबोंब केली. काही ठिकाणी निदर्शनं-बिदर्शनं केली. पण म्हणावी तितकी आरडाओरड झाली नाही आणि महाराज खट्टू झाले. त्यांना हवी होती तशी (कु)प्रसिद्धी मिळाली नाही आणि त्यांनी आपल्या सगळ्या प्रधानमंडळाला धारेवर धरलं.
त्यासाठी महाराजांनी प्रधान मंडळाची तातडीनं सभा बोलावली... विरोधी गटानं केलेली बोंबाबोंब पुरेशी नाही, हे महाराजांचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं. त्यांना आरडाओरड करायला नवा मुद्दा मिळवून दिला म्हणजे दिलाच पाहिजे, यावर एकमत झालं. पण करावं काय ते कोणाच्याच लक्षात येईना. राज्यातल्या गुरूकूलांमध्ये कोणाला घ्यायचं की नाही घ्यायचं हा प्रश्न प्रलंबित होता. राज्यात पाऊस नव्हता आणि या महानगरात तर एकाच वेळी पूर आणि पाणीटंचाई होती. पण हे सगळं विरोधी गटांच्या पचनी पडत नाही, असं काही प्रधानांचं मत पडलं. तेवढ्यात नव्या सेतूला नाव सुचवणा-या सम्राटाच्या प्रधानाचा महाराजांच्या प्रधानमंडळात असलेल्या पुतण्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो प्रधान म्हणाला की, सेतूला जसं माजी सम्राटांचं नाव दिलंय काकांनी, तसं आपण आपल्या सांस्कृतिक शहर आणि राजधानीला जोडणा-या राजमार्गाला एका कै. महाराजांचं नाव देऊन टाकावं. त्याला काही प्रधानांनी हळूच विरोध केला म्हणे. नावाचा घोळ विरोधी गटांना पुरेसा होत नाही, याचं ताजं उदाहरण असल्यानं पुन्हा त्याच मार्गानं जाऊ नये, असं या प्रधानांना वाटत होतं. पण मग खूप विचार केल्यावर आणखी एक प्रयत्न करून बघावा, असं ठरलं आणि प्रधान मंडळाची सभा झाल्यावर महाराजांनी तशी दवंडीही पिटवली महानगरात...
झालं... कारण आधीच्या महाराजांनी (आत्ता विरोधात असलेल्या गटाच्या) एका मोठ्ठ्या-ज्ञानी-विचारवंत ऋषींचं नाव या राजमार्गाला देण्याचं ठरवलं होतं म्हणे. मग काय... पुन्हा गोंधळ सुरू. पुन्हा वादावादी... धमक्या... आंदोलनं... खुद्द महामार्गावर जाऊन (क्षणभरही थांबण्याची परवानगी नसताना) स्वतःच्या हातानं ऋषींच्या नावाचे फलक लावणं.... असे सगळे सोपस्कार पार पडले.
या सगळ्या प्रकाराकडे राज्यातली प्रजा मात्र डोळे विस्फारून आणि 'आ'-वासून बघत होती. म्हणजे पाऊस नाही, पिकं वाया चाललीत, प्यायला पाणी नाही, पोरांना गुरूकूलात जागा मिळेल की नाही माहित नाही, गुरूकूलात नीट ज्ञानप्राप्ती होईल की नाही माहित नाही अशा सगळ्या गराड्यात अडकलेली गरीब बिच्चारी प्रजा... कै. महाराज, कै. सम्राट, कै. ऋषी या सगळ्यांबद्दल प्रजेला नितांत प्रेम, आदर सगळं आहे. पण प्रजेला समजत नाहिये की एखाद्या सेतूला किंवा राजमार्गाला यांची नावं दिल्यानं त्यांचा आदर-प्रेम द्विगूणित कसं होईल. तसंही या सेतूवरून किंवा राजमार्गावरून केवळ मोठमोठ्या व्यापा-याचे रथच जातात-येतात. सामान्य प्रजा विचारी कुठे तिकडं फिरकणार. पण महाराज आणि 'महाराज व्हायचं स्वप्न बाळगून बसलेले' या सगळ्यांनाच याचा विसर पडलाय. प्रजेच्या प्रश्नांशी कोणालाच काही घेणंदेणं उरलेलं नाही.
साता समूद्रापार फ्रान्स नावाच्या एका राज्यात म्हणे एक सम्राट होता... निरो नावाचा... त्याचं राजधानीचं नगर जळत असताना तो वाद्य वाजवत बसलेला म्हणे. आत्ताचे हे महाराज आणि 'महाराज व्हायचं स्वप्न बाळगून बसलेले'-सम्राट-सम्राज्ञी-'सम्राट व्हायचं स्वप्न बाळगून बसलेले' असे सगळे त्या निरोचेच वंशज आहेत. प्रजा विचारी रोज दिवसभर होणारे तमाशे 'आ'-वासून बघते, उद्याचा विचार करत अंगाचं मुटकुळं करून झोपी जाते. साठा उत्तराची ही कहाणी कधीच संपूर्ण होणार नाही... आणि "सुफळ" तर नाहीच नाही....!
******************************
कुठेतरी ऐकल्यासारखी वाटत्ये का ही कहाणी? तसं असेल तर तो केवळ योगायोग समजू नये. तसं असूही शकतं. शेवटी कथा या वास्तवातून आलेल्या असतात ना....

Tuesday 7 July 2009

भारलेले दिवस...

आपल्याला कोणीतरी भारून टाकतं आणि मग आपण त्या कोणालातरी हवं तसं वागतो... असे दिवस होते विद्यार्थी परिषदेतले... पण या भारून टाकण्याला कुठेही "नकारात्मक"तेचा स्पर्शही नव्हता. केवळ देशासाठी काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करणारं हे 'भारणं' होतं... या कसोटीवर किती उतरलो माहित नाही... खरंतर नाहीच उतरलेलो! पण मी देशाला जाऊ दे, विद्यार्थी परिषदेला काय दिलं, हे सांगण्याची माझी योग्यता नाही, हे मला माहित्ये. म्हणूनच विद्यार्थी परिषदेनं मला काय दिलं, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त.... अखिल भारतीय विद्यार्थी परिषद... कॉलेजमध्ये असताना भारून टाकलेलं एक नाव. खरंतर मी परिषदेच्या संपर्कात आलो शाळेत असल्यापासून. बदलापूरात माझ्या आजीच्या घरासमोरच परिषदेचं कार्यालय. मी पाचवीपासून आजीकडेच शिकायला असल्यानं तेव्हापासूनच कार्यालयात जाणं-येणं... कॉलेजमध्ये गेल्यावर प्रत्यक्षात परिषदेच्या "कामा"त कधी आलो, मलाही समजलं नाही. पण सहली, शिबिरं हे म्हणजेच विद्यार्थी परिषदेचं काम असं वाटायचं. त्यानंतर परिषदेच्या कामाचे एक-एक पैलू हळूहळू समजत गेले. कॉलेजात असताना गोव्याचे कुमार वझे बदलापूर भागात पूर्णवेळ आले होते. ही संकल्पना तेव्हाच समजली आणि पहिलंच 'कडक' उदाहरण डोळ्यासमोर दिसलं ते कुमार वासूदेव वझे, नागेशी, बांदिवडे, फोंडा, गोवा... त्यानंतर घरातून शिव्या पडत असतानाही वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम-आंदोलनं-मोर्चे इत्यादी सुरू झालं. दहावीनंतर सायन्सला गेल्यानं आभ्यास करण्याचा घरचा आणि स्वतःचा मानसिक दबाव होताच. पण परिषदेनं "भारलं" होतं ना? मग काय... १२वीत असतानाही 'फी वाढ विरोधी' निदर्शनं करण्यासाठी मंत्रालयावर गेलो होतो. (घरी माहित नव्हतं अर्थातच... आल्यावर कळलं मी कुठे होतो ते. त्या वेळी २ तास पोलिस स्टेशनला बसवलं होतं, हे अजून सांगितलेलं नाही... आत्ता कळेल कदाचित!) थर्ड इयरला असताना बदलापूर शाखेची जबाबदारी होती. (खरंतर कागदोपत्री नव्हती, कारण पुन्हा थर्ड इयर... पण सक्रीय होतोच...) त्यानंतर जर्मालिझमच्या डिप्लोमाला गेलो, ते परिषदेला वेळ मिळावा म्हणून. (थॅक्स टू एबीव्हीपी... नाहीतर आत्ता कुठेतरी कारकुनी करत असतो... नाहीतर परिक्षानळ्या फिरवत बसलो असतो... नाहीतर औषधं विकत असतो....) त्या वेळी बदलापूर भागाची जबाबदारी होती. (बदलापूर ते कर्जत) त्याच्या पुढलं वर्ष माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं होतं.
विद्यार्थी परिषदेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष... त्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर विस्तारक काढायचे, असं ठरलं होतं. त्यात माझाही नंबर लागला. (म्हणजे माझी इच्छा होतीच...) मी जव्हारला गेलो आणि तीन तालुक्यांची जबाबदारी माझ्याकडे होती. जव्हार, वाडा आणि मोखाडा.... तीन्ही वनवासी तालुके. खरंतर आता मागे वळून बघताना वाटतंय की, तेव्हा आपण तिथं खूप चांगलं काम करू शकलो असतो. पण काहीच केलं नाही... असो!
या काळात मनानं खूप जवळ आलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे नितीन (त्याच्या स्टाईलमध्ये नि३) नागनाथअप्पा तोंडारे... लातूरहून आलेला. आधी बदलापूर भाग संघटनमंत्री... त्यानंतर कल्याण आणि बदलापूर भाग संघटनमंत्री... त्यानंतर ठाणे जिल्हा संघटनमंत्री... त्यानंतर ठाणे विभाग संघटनमंत्री असा कायम चढणीचा प्रवास... आदर्श संघटनमंत्री कसा असावा, त्याचं उदाहरण. सगळ्यांशी कायम गोड बोलणं... आणि अक्षर त्याहून गोड... वर्षभर काम(?) केल्यावर पुन्हा घरी आलो... नोकरीला लागलो... आता स्थिरावलोही आहे. पण या पाच-सहा वर्षांमध्ये परिषदेनं पाठीला बांधलेली शिदोरी अजूनही पुरते...
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे माणसं जोडण्याची कला... त्याही आधी माणसं वाचण्याची कला... माणसं वाचता आली की जोडायची की टॅण्जंट मारून सोडून द्यायची, हे मुद्दाम न करता आपोआप ठरतं, विद्यार्थी परिषदेच्या "माणसांचं काम" असलेल्या संस्कारांची देणगी. दुसरी आणखी एक तितकीच महत्त्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे "ADJUSTMENT." अर्थात ती देखील पॉझिटीव्ह अर्थानंच. चार प्रकारचे चार लोकं एकत्र आले की प्रत्येकालाच थोडंफार सांभाळून घ्यावं लागतं, याचा प्रॅक्टिकल धडा विद्यार्थी परिषदेनं दिला... परिषदेनं दिलेली आणखी एक गोष्ट म्हणजे व्हिजन... तिचा दृष्य उपयोग होतं नाही, हे मान्य. पण कोणतंही काम करताना ती मनाच्या एका कोप-यात बसून लक्ष ठेऊन असते, किंवा एका अर्थानं सुपरवायझिंग करते, हे देखील तितकंच खरं...
खरंतर ही यादी न संपणारी आहे. परिषदेनं इतक्या गोष्टी अजाणतेपणी दिल्यात की आपलं आपल्यालाही लक्षात येत नाही, की आपण एखादी गोष्ट करतोय ती परिषदेची देणगी आहे असं... इतकी परिषद रक्तात आहे.
आता परिषदेपासून थोडा लांब गेलोय. सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचं जे झालं, तेच माझंही झालंय. कधीकधी काही गोष्टी पटत नाहीत... काहीतरी चुकतंय असं वाटतं... पण लक्षात येतं की ही चूक परिषदेची नाही, तर परिषदेकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीकोनाची आहे. परिषदेची धोरणं आपल्याला एकेकाळी पटली होतीच ना... त्यासाठी आपण ७ सप्टेंबरच्या सव्वा लाखांच्या मोर्चात हातात "ज्ञान, शील, एकते"ची पताका घेऊन गेलो होतोच ना? मग आता काय झालंय... नक्कीच दृष्टीकोन बदलला किंवा आपल्याला शिंगं फुटली... पण त्याला इलाज नाही... शेवटी आता मी ही "जुना कार्यकर्ता"च झालोय... पण जुना असलो तरी आयुष्यभर "परिषदेचा कार्यकर्ता" राहीन आणि मला त्याचा अभिमान असेल याची खात्री आहे. शेवटी एकदा ब-याच वर्षांनी...
"झिंदाबाद... झिंदाबाद... विद्यार्थी परिषद झिंदाबाद!"
"long live... long live... ABVP long live..."

Monday 6 July 2009

थ्री चिअर्स फॉर फेडी-रॉडी...

विम्बल्डनचं सेंटरकोर्ट... विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात आजवर सगळ्यात जास्त लांबलेली आणि सगळ्यात जास्त अटीतटीची झालेली मेन्स सिंगल्स फायनल.... आणि "आयसिंग ऑन दि केक" म्हणून रॉजर फेडररनं केलेला विश्वविक्रम... सगळंच मस्त.... ख-या अर्थानं रविवारची सुट्टी सत्कारणी लावणारी ही मॅच.
पहिला सेट गमावल्यावरही फेडरर हरेल असं चुकूनपण वाटणं शक्य नसतं. तसंच ते यावेळीही वाटलं नाही. (तो हरावा असं वाटतही नाही म्हणा...) दुसरा आणि तिसरा सेट टायब्रेकरवर का होईना, त्यानं जिंकल्यामुळे तर असं वाटायला लागलेलं की चौथ्या सेटमध्ये बहुदा तो रॉडिकचा फडशा पाडणार आणि एखाद्या बादशहाच्या थाटात विश्वविक्रमी विजय साजरा करणार... पण चौथा सेट तो ६-३ असा हरला. तेव्हा थोडी रुखरुख आणि बरीचशी उत्सुकता लागली. रॉडिकचा गेम भन्नाट होता, यात वादच नाही...
पाचवा सेट मात्र डोळ्यांचं पारणं फेडून गेला... दोन तुल्यबळ हत्तींची लढत व्हावी आणि कोणीच हार मानू नये असं वाटत होतं... मॅच बघताना खूपदा असंही वाटत होतं की हा सामना संपूच नये... असाच तो चालू रहावा... इतकी मजा येत होती! पाचव्या सेटमध्ये ६-६, ७-७, ८-८... इथपर्यंत स्कोअरबोर्ड बघायची सवय असते... पण बोर्ड ११-११ दाखवायला लागल्यावर... हुश्श... आता इतकी फाईट दिल्यानंतर रॉडिक जिंकायला हवा, असं वाटायला लागलेलं मनाच्या कुठल्यातरी कोप-यात! दोघंही हटत नव्हते. एकमेकांवर भरपूर ACE (बिनतोड) सर्व्हिसेसचा पाऊस पाडणं सुरू होतं. स्कोअर १४-१४ झाला तेव्हा "ज्याचा स्टॅमिना जास्त टिकेल तो जिंकणार किंवा जो पहिली चूक करेल तो हारणार", हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ झालं... पहिली चूक रॉडिकनं ३०व्या सेटमध्ये केली आणि तो सामना हरला... पण रॉडिकनं फेडररला जी फाईट दिली ती पाहिल्यावर "थ्री चिअर्स फॉर फेडी-रॉडी...." असंही म्हणायलाच हवं...
अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा सामना जिंकून फेडरर वर्ल्ड रेकॉर्ड करणार होता.... तो ज्याचा रेकॉर्ड मोडायला निघालेला तो पीट सॅम्प्रस कोट-बिट घालून सेंटर कोर्टवर हजर होता आणि सगळ्यावर कळस म्हणजे तब्बल ३० गेम्स खेळाले गेलेला पाचवा सेट... सगळंच आनंद देणारं... सुनील गावस्कर म्हणाला होता की, "आपला रेकॉर्ड मोडणारा सचिनसारखा टॅलेंटेड खेळाडू असेल, तर रेकॉर्ड मोडला गेल्याचं दुःख आसपासही फिरकत नाही..." सॅम्प्रसची भावना नेमकी हिच झाली असेल...
शेवटी या खेळात कोण जिंकतंय, याला फारसं महत्त्व नव्हतंच... फेडरर जिंकला असता तरी त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचा आनंद आणि रॉडिक जिंकला असता तरी त्यानं जगातल्या अव्वल खेळाडूला दिलेली फाईट सार्थकी लागल्याचा आनंद... एकूणच ५ जुलैचा विम्बल्डनमधला सगळा सामनाच अवर्णनीय आनंद देऊन गेला, हेच खरं... बाकी सगळं झूट....!

Friday 3 July 2009

मुंबईकरांना 'तृणमूल'ही नाही...!

ममता बॅनर्जींचा रेल्वे अर्थसंकल्प...! आणि महा'राष्ट्रीय' नेत्यांचा (अन्)अर्थसंकल्प...!!
संसदेत आज मांडलेल्या अर्थसंकल्पाचं वर्णन "नवा भिडू... जुनाच राज..." असंच करावं लागेल. गेली अनेक वर्ष बिहारी रेल्वेमत्र्यांनी जिकतं मुंबईला दिलंय त्यापेक्षा कितीतरी पटींनी कमी बंगाली ममतांनी देऊ केलंय... ज्या मुंबईच्या लोकलचे प्रवासी रेल्वेला सगळ्यात जास्त गल्ला जमा करून देतात त्यांना काही दिलं तर नाहीच... पण मुंबई लोकलचा उल्लेखही ममतांनी आभावानंच केला. म्हणजे मुंबईत जशा लेडीज स्पेशल लोकल आहेत, तशाच त्या अन्यत्र सुरू करणार आहे... इत्यादी... त्याखेरीज लोकल-प्रवाशांच्या हाल-अपेष्टा कमी करेल, असं या (अन्)अर्थसंकल्पात काहीच नाही. खरंतर हीच आश्चर्याची गोष्ट आहे.
खरंतर येत्या ३-४ महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. (विचारार्थ - पश्चिम बंगालच्या निवडणुकांना अजून २ वर्ष बाकी आहेत.) त्यामुळे सत्ताधारी आघाडीला (दोन्हीकडच्या) ऍडव्हान्टेज मिळावा, यासाठी खरंतर मुंबईकरांवर योजनांची खैरात होईल, असा अंदाज होता. या निवडणुकांवर एक डोळा ठेऊनच राज्याच्या इतिहासात विक्रमी राज्यातले ९ मंत्री केंद्रात आहेत. पण मग रेल्वेचा अर्थसंकल्प इतका निरस कसा? त्याची काही कारणं अशी असू शकतात....
१) ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना राज्यातल्या विधानसभा निवडणुकांशी काहीच घेणंदेणं असायचं कारण नाही... हेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा रेल्वेमंत्री असता तर कदाचित मुंबई-महाराष्ट्राला भरभरून मिळू शकलं असतं?
२) महाराष्ट्राचे ९ मंत्री केंद्रात मिरवत असले तरी यापैकी कोणीच ममतांवर 'प्रेशर' आणलेलं दिसत नाहिये. खरंच आपले काँटॅक्ट्स वापरून किंवा प्रसंगी दबाव आणून आपल्याला हवं त्यातलं किमान ५० टक्के पदरात पाडून घेणं, विशेषतः निवडणुक तोंडावर आली असताना..., या दिग्गजांना अशक्य होतं का? (विचारार्थ - शरद पवार... विलासराव देशमुख... सुशीलकुमार शिंदे...मुरली देवरा... आदी.)
३) बरं... या लोकांनी काम नाही केलं समजा... देशाची चिंता करताना त्यांना मुंबईकरांचे हाल दिसत नसतील, असं क्षणभर गृहित धरूयात... मग मुंबईतले सहा आणि ठाणे जिल्ह्याच्या 'लोकल एरियात' मोडणारे ३ खासदार (फक्त लोकसभा गृहित धरून... राज्यसभेचे वेगळे!) काय करत होते? त्यांनी ममता बॅनर्जींनी मुंबईला काहीतरी द्यावं, यासाठी काहीच हालचाल केली नाही का? बरं, इथं पक्षभेद असण्याचाही प्रश्न नाहिये. कल्याणचे खासदार आनंद परांजपे वगळता सगळेच्या सगळे खासदार आघाडीचे आहेत. मग तरीही आपल्या आघाडीतल्या रेल्वेमंत्र्यांना गळ घालणं यांना अशक्य झालं होतं काय?
४) शेवटची शक्यता अशी की सगळे मंत्री-संत्री-तंत्री यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले असतीलही... पण त्यांना 'डॅशिंग' ममतांच्या तोफखान्यापुढे हार मानली असेल. (पण असं कोणीही जाहीरपणे सांगण्याचं धाडस करणार नाही... चिंता नसावी!)
एकूण काय... तर निवडणुकांच्या निमित्तानं का होईना... काहीतरी पदरात पडेल, ही मुंबईकरांची आशा व्यर्थ ठरलीय. सहा अधिक तीन खासदार... चार अधिक पाच मंत्री... यांना मुंबईसाठी काहीही आणणं जमलेलं नाही. चला तर मग... पुन्हा तयार व्हा चालती गाडी पकडायला... खिडक्यांवर लटकायला... टपावर बसायला... किंवा गाडीतून पडून मरायला...

Wednesday 1 July 2009

पाऊस आलाच नाही तर?

जुलै महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. हवामान खात्यापासून शरद पवारांपर्यंत... सगळेच तज्ज्ञ सांगतायत की पाऊस नक्की येणार... घाबरू नका? (खरंतर पवारांपासून सगळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते घाबरलेत... का काय? पाऊस नाही पडला तर विधानसभा निवडणुकीत काय होईल, याची त्यांना कल्पना आहे, म्हणून... त्यामुळे ते खरंतर स्वतःलाच सांगतायत की "घाबरू नका, पाऊस पडेल!") पण पाऊस आलाच नाही ... ही भितीही आता अनेकांना वाटू लागल्ये. त्यातूनच मुंबई महापालिकेनं "पाणी जपून वापरा... " असा सल्ला दिलाय.
खरं म्हणजे हे सांगण्याची वेळ यायलाच नको... पाणी हे जपूनच वापरलं पाहिजे. पुण्याच्या महापौर म्हणाल्या, "पाऊस लांबला तर प्यायचं पाणी बांधकामांसाठी वापरण्यावर निर्बंध आणावा लागेल..." अरेच्च्या... म्हणजे पुण्यातल्या बांधकामाला अजून पिण्याचं पाणी वापरलं जातं? का? आणि महत्त्वाचं म्हणजे कसं काय? खेड्यापाड्यांमध्ये घरातली बाई पाच-पाच दहा-दहा किलोमीटरवरून दोन हंडे पाणी आणते आणि काटकसर करून ते दिवसभर पुरवते, त्याचं काहीच नाही. आता मुंबईकरांना सल्ला मिळतोय की पाणी जपून वापरा... खरं म्हणजे हे सांगायची वेळच यायला नको. अनेक पर्यावरणवाले गेली अनेक वर्ष घसा कोरडा करून सांगतायत की "गोड्या पाण्याचा साठा संपतोय. पृथ्वीच्या पोटातलं गोडं पाणी संपून जाण्यापूर्वी सावध व्हा... पाणी जपून वापरा..." पण आपल्याकडच्या गाड्यांनाही आंघोळीसाठी नळाचं कार्बनयुक्त पाणीच लागतं... त्याला कोण काय करणार? म्हणजे गावांमध्ये पाणी नाही म्हणून लोकं दोनाच्या जागी १ ग्लासच पाणी पितात आणि इथं मात्र गाड्या धुवायला 'फोर्स'मध्ये स्वच्छ-गोड-नितळ पाणी पाहिजे. 'आत्ममग्न' असण्याचं आणि 'सामाजिक जाणिवा बोथट झाल्याचं' इतकं वाईट उदाहरण जगाच्या पाठीवर कुठे असूच शकत नाही....
पावसानं थोडी हुलकावणी दिल्यावर सगळ्यांनाच जाग येते, पाणी जपून वापरायला पाहिजे... बांधकामाला गोडं पाणी वापरून उपयोग नाही... इत्यादी. मग इतके दिवस ही अक्कल का सुचली नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, ते असं. पण याचा खरंच उपयोग किती होणार आहे... पाणी जपून वापरलं आणि पाऊस आलाच नाही तर? साठवलेलं पाणी थोडीच वर्षभर पुरणार आहे... (महिनाभरही पुरणार नाही!) मग काय होईल ते देवच जाणे... ते असो... पण पाऊस आलाच, म्हणजे धो... धो... आलाच तर? मग पुन्हा तानसा, अप्पर-लोअर-मिडल असली सगळी वैतरणा, भातसा अशी ठाणे जिल्ह्यातली मुंबईची तहान भागवणारी सगळी धरणं भरणार... मग? मग काय... पाणीच पाणी चहुकडे... असं म्हणत आपण पुन्हा आपल्या गाड्या-बाईक-स्कुटर्स-सायकली नळाच्या पाण्याखाली धरणार... बांधकामांवर सिमेंट पक्कं करण्यासाठी आपण गोडं पाणी वापरणार... फुल्ल नळ सोडून ठेऊन भांडी घासणार... वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना चार-चार वेळा पाणी बदलणार... नळ अर्धा सुरू ठेऊन सिनेमाला जाणार... सोसायटीतली पाण्याची टाकी धों-धों वाहात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणार......
मग पुढल्या वर्षी पुन्हा पाऊस नाही आला की "पाणी जपून वापरा...," पुन्हा आला की "पाणीच पाणी चहूकडे...!"
जाऊ दे, लहानपणी ऐकलेल्या "कापुस कोंड्याच्या गोष्टी"ची ही आधुनिक आवृत्ती आहे. हम नहीं सुधरेंगे, हे आपलं ब्रिदवाक्य झालंय.