Wednesday 4 April 2012

पंचाला हात..!

ब्लॉगची सलग दुसरी पोस्ट लष्कराबाबत येतेय, हा निव्वळ योगायोग आहे... झालं असं, की 'लिहावं' असं वाटण्याजोग्या घटना नेमक्या लष्कराशीच संबंधित आहेत, त्यामुळे इलाज नाही...
-------------------------

आजच्या पहिल्या पानभर बातमीत इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं थेट केंद्र सरकारच्या पंचाला हात घातला आहे. ही बातमी अर्थातच सर्वांनी वाचली असणार. दिवसभर सगळ्या चॅनल्सवर सुरू असलेल्या चर्चा काही जणांनी ऐकल्या असणार.. या चर्चांत प्रश्न समोर येतात ते, घडलेली घटना खरंच घडली का? घडलीच असेल, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो?
इंडियन एक्सप्रेसनं केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी दिली, ही एक बाजू तर लष्कराच्या दोन तुकड्यांची मुव्हमेंट झाली होती आणि त्यामुळे केंद्र सरकारची झोप उडाली होती ही दुसरी बाजू... यामध्ये सुवर्णमध्य मांडणारेही काही जण आहेत. मुव्हमेंट झाली, मात्र तो रुटीनचा भाग होता असं ते म्हणतायत. यातलं सत्य-असत्य काय, यापेक्षा खरोखर हा बंडाचा प्रयत्न असेल, तर तो गैर आहे का असा प्रश्न माझ्या मनात येतो...
लष्कराला होली काऊ मानणारे हा उठावाचा प्रयत्न नव्हता, असं ठामपणे सांगत आहेत. अर्थात लष्कराची प्रतिमा जपण्यासाठी ते असं म्हणत असतील... पण माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की खरंच असं एखादं बंड झालं असतं आणि आपल्या लष्करानं सध्याचं निष्क्रीय आणि भ्रष्ट सरकार उलथून टाकलं असतं, तर ते चांगलं झालं असतं की वाईट? कोणी म्हणेल की असलं निकम्मं सरकार लष्करानं उठाव करून बडतर्फ केलं असतं, तरी चाललं असतं... माझंही मत तसंच आहे. पण सध्याच्या स्थितीत नाही. कारण एकतर हे सरकार लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं आहे आणि अजूनतरी त्यांनी लोकशाहीला धक्का लागेल असं काहीही केलेलं नाही. दुसरी गोष्ट आहे ती सध्याच्या लष्करप्रमुखांच्या विश्वासार्हतेची... लष्करातली सगळी कारकीर्द एका जन्मतारखेवर काढल्यानंतर (कदाचित लष्करप्रमुखपदी बढतीही याच तारखेमुळे मिळालेली असताना)  अचानक निवृत्त होताना त्यांना तारीख बदलावीशी वाटते... पूर्वी कधीतरी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचं ते आता निवृत्त होताना सांगतात... यामागे लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांची महत्त्वाकांक्षा आणि सरकारवर असलेली उघड नाराजीच ध्वनित होते. बंड करून अशा माणसाच्या हातात सत्ता जाण्यापेक्षा ती सध्याच्या सरकारकडे काय वाईट आहे... किमान आणखी दोन वर्षांनी त्यांना फेकून देण्याचा अधिकार तरी आपल्याकडे आहे. व्ही.के. सिंगसारख्या महत्त्वाकांक्षी लष्करी अधिका-यानं लोकशाहीच्या भल्यासाठी हे घडवलं असं मानणं खुळचटपणाचं ठरेल...
आपले काही लष्करी अधिकारी कितीही भ्रष्ट असले, तरी आपली सेना ही जनसामान्यांना अतिशय प्रिय आहे. असेच पॉप्युलर आर्म फोर्सेस असलेल्या इजिप्तचं उदाहरण आपल्याकडे ताजं आहे. तिथंही लष्करानं सत्ता हाती घेतल्यानंतर लोकांनी जल्लोष केला होता. आता त्यांचा भ्रमनिरास झाला आहे आणि त्यांनी लष्करी शासनाविरुद्धही आंदोलनं करायला सुरूवात केली आहे. आपल्याकडे याचीच पुनरावृत्ती झाली नसती कशावरून?
लष्कराच्या केवळ दोन तुकड्यांनी बंड करून भागलं नसतं, हेदेखील तितकंच खरं आहे... लष्कराव्यतिरिक्त आपल्या देशात वायुदल, नौदल, निमलष्करी दल अशी अनेक सैन्यदलं आहेत... त्यांना एकत्र केल्याशिवाय किंवा किमान शांत बसण्यासाठी प्रवृत्त केल्याशिवाय असं बंड होऊ शकत नाही. दिल्लीकडे कथितरित्या निघालेल्या दोन तुकड्यांच्या कमांडरना हे माहिती नसेल, असं भाभडेपणानं मानण्याचं काहीच कारण नाही...त्यामुळे या घटनेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघायची गरज आहे...
कदाचित हा रुटीनचा भाग असेलही... पण तो नसेल, तर ही सिंग यांची आणखी एक खेळी असू शकते. निवृ्त्त होण्यापूर्वी त्यांनी सरकारला जेरीस आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतल्या एक-दोन अधिका-यांना हातीशी धरून सरकारवर केवळ दबाव आणायचा आणि 'असंही होऊ शकतं' याची जाणीव करून द्यायची, असा त्यांचा हेतू असू शकतो... अर्थात हा जर-तरचा विषय झाला. पण अशा पद्धतीनं बातमी आल्यामुळे जगात आपली प्रतिमा डागाळली गेली आहे, हे मात्र निश्चित...
प्रतिमा लष्कराची डागाळली गेली तर आहेच, पण सरकारची, लोकशाहीची आणि भारतीय नागरिकांचीही...लष्कर आणि सरकार यांच्यात आलबेल असावं, असं कोणीच म्हणत नाही. पण किमान ही पेल्यातली वादळं पेल्यातच राहिलेली चांगली... या वादळाचा साद जगभर पसरणं देशासाठी हितावह नाही... प्रसारमाध्यमं, लष्करप्रमुख, सरकारी अधिकारी आणि मुख्य म्हणजे ही बातमी फोडणा-यांनी  याचं भान ठेवणं आवश्यक आहे...