Wednesday 24 February 2010

जहॉंपना... तुसी ग्रेट हो..!

एकदिवसीय सामन्यात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच २०० धावा ठोकण्याचा पराक्रम दुसरं कोण करू शकणार होतं...
'मला वाटलं ते...!'कडून आणि या ब्लॉगच्या वाचकांकडून सचिन रमेश तेंडूलकरला शतशः मनःपूर्वक धन्यवाद...
(attn. ऍनॉनिमस : मला धन्यवादच म्हणायचं आहे... उगाच चुक काढू नये. अभिनंदन करण्याची आपली कोणाचीच योग्यता नाही. आपली एक संध्याकाळ धन्य केल्याबद्दल सचिनचे आभारच मानायला हवेत...)

Monday 22 February 2010

ए.सी. संस्कृतीचा बुरूज सर...?

किल्ला राखायचा कुणी... किल्ल्याच्या मालकाला प्रश्न. ज्या कष्टानं 'कमळगड' उभारला, जोपासला, तब्बल ६ वर्षं राजधानी म्हणून जो किल्ला देशभर मिरवला... त्याचे बुरूज बेढब झाले होते... त्यांची डागडुजी आवश्यक होती. इतकी वर्षं किल्लेदार असलेल्यांना ते काही जमलं नाही... करायचं काय? मालकाला चिंता... शेवटी पांढ-या मिशीत हसून मालकानं काही निर्णय घेतला आणि तो अमलात आणला...
किल्ल्यात अनेक वर्षं काढलेल्या एका भरभक्कम मानक-याची नेमणूक 'किल्लेदार' म्हणून केली आणि किल्ल्याची डागडुजी करण्याची, त्याला चांगलं रूप देण्याची अशक्यप्राय जबाबदारी सोपवली... या किल्लेदाराला यापुढे आपण सोयीसाठी 'गडकरी' म्हणूयात...
तर... या 'गडकरीं'पुढचं आव्हान कठीण... किल्ल्याची डागडुजी करायची, रंगरंगोटी करायची हे काम वाचून वाटतं तितकं सोपं नाहीये... कारण या 'गडकरीं'च्या बरोबरचे जे लढवय्ये आहेत, त्यांना ए.सी. छावण्यांमध्ये झोपायची सवय लागलीये... प्रत्येक जण आपला आपापला बुरूज सांभाळण्यात व्यस्त... एकानं आपल्या बुरूजाला भगवा रंग दिलेला... दुस-यानं निळा... तिस-यानं लाल.... त्यामुळे एकूण किल्ल्याचं रुप विदुषकासारखं झालेलं... 'गडकरी'चं पहिलं काम होतं या सगळ्यांची तोंड एकमेकांकडे फिरवण्याचं... मालकांनी दिलेली असाईनमेंटच होती ती... झालं 'गडकरी' कामाला लागले...
किल्ल्यावरचे सगळे मानकरी-कामगार-सैनिक वर्षातून एकदा किल्ल्यावरच्या जत्रेसाठी एकत्र येत... 'गडकरी'नं ही संधी साधायचं ठरवलं... जत्रेच्या ठिकाणी त्यांनी सगळे एकाच रंगात रंगवलेले, एकसारखे दिसणारे तंबू उभारले... दरबारातले सगळे मानकरी एकाच पातळीचे आहेत, हे दाखवण्यासाठी... हा पहिला प्रयत्न... पण तो फसला! कारण दिवसभर दुस-या किल्ल्यावर आणि किल्लेदारांवर तोंडसूख घेऊन झालं की आपापल्या ए.सी. छावणीत झोपायला जायचं, हे प्रत्येकानंच ठरवलेलं. (ए.सी.ची सवय झाली होती. काय करणार?)
प्रयोग दुसरा. आपल्या भाषणात गडकरीनी सगळ्या मानक-यांना फैलावर घेतलं... बुरूजांच्या वेगवेगळ्या रंगांवर टीका केली... ए.सी.ला चटावलेल्या मानक-यांचे वाभाडे काढले... लोक किल्ल्याबद्दल जे बोलतात, ते मालकाला आवडत नाही, हे सांगितलं... सामान्य सैनिक आणि कर्मचा-यांशी संबंध वाढवायला सांगितलं... कायम घोडागाड्यांमध्ये फिरणा-यांना पायी जायला सांगितलं... एक ना अनेक...
'गडकरी'चं भाषण झालं... सगळ्या मानक-यांनी ऐकून घेतलं... सैनिकांनी-कामगारांनी टाळ्या वाजवल्या...
एकीच्या आणाभाका झाल्या... दुस-या किल्ल्यातल्या लोकांना नावं ठेऊन झाली... जत्रा संपली... सगळे मानकरी आपल्या ए.सी. बुरूजांकडे परतले... जाताना सगळे जण गालातल्या गालात हसत होते...!!!

Wednesday 10 February 2010

माय नेम ईज 'वाद...'

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू असावेत की नाही... यावरून पेटलेल्या वादानं शिवसेना आणि शाहरूख खानमध्ये सध्या चांगलीच जुंपलीय... शाहरूखचं म्हणणं असं की खेळात राजकारण आणू नये आणि शिवसेनेचे म्हणणं असं की मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तानशी संबंध तोडायचे म्हंटल्यावर भारतातल्या अलिकडच्या काळातल्या मोठ्या स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये त्यांच्या खेळाडूंना येऊच देऊ नये...
खरंतर या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा हवाला दिला, तर शाहरूख बरोबर आणि 'राष्ट्रप्रेमा'ची कसोटी लावली तर शिवसेना १०० टक्के बरोबर...
शाहरूखचं म्हणणं वरवर खरं दिसत असलं तरी तो स्वतः कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे... त्यानं लिलावानंतर पोपटपंची करण्यापेक्षा त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना का घेतलं नाही? त्यानं एखादा खेळाडू घेतला असता आणि मग त्याला शिवसेनेनं विरोध केला असता, तर शाहरूखकडे एकतरी हुकमाचा पत्ता असता... पण त्यानं 'लोका सांगे ब्रह्मज्ञान...' या उक्तीला स्मरून नंतर बडबड करणं पसंत केलं... का? अहो, कारण सरळ आहे... त्याचा 'माय नेम ईज खान' येऊ घातलाय... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा सोनेरी मुलामा देऊन थोडा पाकधार्जिणेपणा दाखवला तर सिनेमाच्या प्रमोशनला मदत नाही का होणार???? इतका साधा-सरळ हिशोब आहे... त्यात शिवसेना-भाजप किंवा आणखी कोणी विरोध केलाच तर उत्तमच... अन्यथा सिनेमाची इतकी फुटक पब्लिसिटी कशी होणार?
बरं... शाहरूख ज्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची बाजू घेऊन गळा काढतोय, ते 'स्पोर्ट्समन स्पिरीट'च्या कसोटीवर किती उतरतात, हे तो बघणार नाही का? शाहीद आफ्रिदी सफरचंद खावं तसा बॉल खात होता. मैदानात १७ ते २० कॅमेरे असताना त्याची चेंडू कुरतडण्याची हिम्मत झाली... आफ्रिदीही आयपीएलसाठी उपलब्ध होता आणि शाहरूखला त्याला घेण्याची इच्छा होती म्हणे... आता या आफ्रिदीसाठी त्याला कोलकाता संघात घ्यायला इच्छुक असलेल्या शाहरूखनं 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चं नाव घेत बोंब मारावी? हे म्हणजे 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं पहायचं वाकून' अशातली गत नाही का?
मुंबई हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी शाहरूखला कंठ का फुटला नाही? कारण स्पष्ट आहे... कारण त्या वेळी शाहरूख खानचा 'माय नेम ईज खान' नावाचा सिनेमा येऊ घातला नव्हता... त्या वेळी एका विशिष्ट समाजाची सहानुभूती मिळवण्याची त्याला व्यावसायिक गरज नव्हती...
अनेक बुद्धिवादी सांगत असतात की, सिनेमा ही कलाकृती आहे... त्याकडे त्याच नजरेनं पाहिलं जावं... आपले मंत्रीही हाच सल्ला देतात... पण मग अवधूत गुप्तेच्या झेंडाला राणेंच्या स्वाभिमाननं केलेला विरोध चालतो का?
सरकारचं म्हणणं असं की विरोध जरूर करा पण सनदशीर मार्गानं करा... पण शिवसेनेची कार्यपद्धती पाहता, पक्षाचा इतिहास पाहता शिवसेनेकडून आणखी कशा प्रकारचा विरोध अपेक्षित आहे? 'खान'चे प्रयोग बंद पाडा.... शाहरूखसमोर निदर्शनं करा.... त्याची पोस्टर्स जाळा.... असे आदेश शिवसैनिकांना द्यावे लागत नाहीत. पोर जन्माला येताना ज्याप्रमाणे श्वास घ्यायचं शिकूनच येतं, तसं काहीसं शिवसेनेचं आहे. 'खान'ला विरोध करा, इतकं मातोश्रीवरून सांगितलं तरी प्रत्येकाला माहित असतं नेमकं काय करायचंय ते...! आता मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना सेनेची ही पद्धत माहित नाही, असं कसं मानायचं? आणि सनदशीर मार्गानं विरोध करायचा, म्हणजे नेमकं काय करायचं? 'सरकारनं आपला आवाज ऐकावा' यासाठी भगतसिंगांनी संसदेत स्फोट घडवला. त्यावेळी कोणाला इजा होऊ नये, साधं खरचटूही नये, याची काळजी घेत मोकळ्या जागी हातबॉम्ब फेकला... हा मार्ग सनदशीर म्हणायचा की हिंसक? आत्ता प्रसिद्धी मिळवणं ही सेनेची राजकीय गरज आहे, हे काही अंशी खरं असलं तरी अशी कुठलीही गरज नसतानाही (उदा. राज ठाकरे सेनेत असताना वैगरे...) बाळासाहेबांनी वेळोवेळी राष्ट्रवादी भूमिका घेतलीय... मग वानखेडे स्टेडियमचं पिच उखडणं असेल किंवा बाबरी मशिद पाडल्याची जबाबदारी स्विकारणं असेल....
सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरूखला आलेला पाकिस्तानचा कड प्रामाणिक आहे, असं म्हणायला हवं... कारण बुद्धिवाद्यांनी कितीही घोषा लावला तरी 'चित्रपट बनवणे' हा एक व्यवसाय आहे... नव्हे कोट्यवधींचा व्यवसाय आहे. आता धंदा करायचा म्हंटल्यावर त्याची जाहिरात करणंही आलंच की... आमीर खान वेगवेगळी रुपं घेऊन देशभर फिरतो, ते चालतं... शाहरूखनं पाकिस्तानची बाजू घेतलेली खपत नाही... असं कसं? शाहरूखला आलेला क्रिकेटचा पुळका हा त्या धंदेवाईक विचारातून आलाय. त्यामुळे त्यानं केलं ते चूक असं कसं म्हणणार...
Everything is fare in LOVE and WAR... and this is BOX OFFICE WAR...