Saturday 25 September 2010

चक दे...

कॉमनवेल्थ गेम्सवरून देशाची पुरती आब्रु गेल्यानंतर एकदाचं घोडं गंगेत न्हालं आहे. स्पर्धा होणार की नाही होणार हा घोळ संपला आहे आणि ३ तारखेला एकेकाळच्या सूर्य न मावळणा-या राष्ट्राचे विभागलेले कुळ आपली मशाल दिल्लीत पेटवणारच, हे निश्चित झालं आहे.
सुरूवातीला मणिशंकर अय्यर यांनी या स्पर्धांच्या आयोजनावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. मात्र त्यानंतर बाहेर आलेल्या एकेक प्रकरणांमुळे या लोकांचेच दात घशात गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. टॉयलेट पेपरपासून ते क्वीन्स बॅटन रिलेच्या लंडनमधील कार्यक्रमापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्या राष्ट्रीय धर्माला जागून पैसे खाल्ल्याचे आरोप केले जात आहे. इतकंच नाही, तर या स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठीही म्हणे सर्व ७१ देशांना लाच देऊ केली गेली आहे. देशाचं नाक कापलं गेल्यानंतर आता किमान स्पर्धेच्या काळात तरी चांगल्या सोयी ठेवून किमान देशाची मान खाली घातली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.
आजच कॉमनवेल्थ फेरडेशनचे अध्यक्ष मायकेल फेनेल यांनी आयोजनातील ढिसाळपणाला सगळेच जबाबदार असल्याचं म्हंटलं आहे. या 'सगळे'मध्ये त्यांची समिती आणि ते स्वतःदेखील त्यांना अभिप्रेत आहेत. दोन दिवसांपूर्वीचा त्यांचा सूर अचानक बदलण्यास काही कारणं असू शकतात. एकतर त्यांनी कॅबिनेट सचिव चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रानंतर खरंच सरकार दणकून कामाला लागलं आणि खरोखरच ४८ तासांत अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि आता क्रीडाग्राम अत्यंत देखणं, स्वच्छ आणि नीटनेटकं झालेलं आहे... असं मानायला जागा आहे. पण त्यासाठी हॅरी पॉटरच प्रत्यक्षात यायला हवा...
यापेक्षा स्पर्धा सुरू होण्याच्या तोंडावर कटुता नको, असा विचार करून फेनेल यांनी हे वक्तव्य करणं पटण्यासारखं आहे. कारण अवघ्या आठवड्यावर स्पर्धा आल्यामुळे आता ऑलिम्पिक समिती, राष्ट्रकुल समिती, आयोजन समिती हे सगळेच 'पॉइंट ऑफ नो रिटर्न'वर आले आहेत. आता स्पर्धा रद्द होऊ शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे स्पर्धेच्या काळात कोणाच्या मनात किल्मिष राहायला नको आणि सर्वांना ही स्पर्धा एन्जॉय करता यावी, या उद्देशाने फेनेल बॅकफूटवर आलेले असू शकतात. (आरोप होतो आहे, त्याप्रमाणे जर खरंच आंतरराष्ट्रीय लाचखोरी करून यजमानपद मिळवलं असेल, तर या ७१ देशांना हे कथित पैसे परत करावे लागणार नाहीत ना, ही भीतीदेखील फेनल यांच्या मनात असावी का?)  कारण काहीही असलं, तरी आता राष्ट्रकुलावरचं मळभ दूर झालं आहे आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह सर्व संघ दिल्लीत डेरेदाखल होत असल्याचं आश्वासन फेनेल यांनी देऊ केलंय.
तात्पर्य, स्पर्धांचे गेट.... सेट...(?) झाले आहे आणि फक्त बंदुकीचा बार उडण्याची वाट सगळे बघतायत (रेफरीच्या बंदुकीचा बार... अतिरेक्यांच्या नव्हे!!!) त्यामुळे आता पुढले २-३ आठवडे कलमाडी-शीला दीक्षित यांना विसरूयात... सायना, तेजस्वीनी, विजयेंद्र यांच्यासह तिरंगा खांद्यावर लावून खेळणा-या प्रत्येकाला शुभेच्छा देण्यासाठी १०० कोटी कंठांमधून एकच आवाज देऊयात....

चक दे इंडिया...!!!

Friday 24 September 2010

तारीख पुढे... टेन्शन वाढणार की घटणार?

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या निकालाच्या सुनावणीला स्थगिती दिली. २४ तारखेला निकाल लागेल असं गृहित धरून आधीची पोस्ट लिहिली होती... तारीख पुढे ढकलली तरी निकाल अटळ आहे.
६० वर्षं भिजत पडलेलं हो घोंगडं 'वॉशिंगमशिन'च्या बाहेर सुकवायचा हा शेवटचाच प्रयत्न ठरावा...  पण इतक्या वर्षांत जे घडलं नाही, ते चार दिवसांत घडायची शक्यता कमीच आहे. किंबहुना लखनौ उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठात दोन्ही बाजूंनी तसं स्पष्ट केल्यानंतरच निकालाची तारीख जाहीर करण्यात आली होती. यामुळे आजचं मरण उद्यावर गेलंय, इतकंच म्हणता येईल...
मात्र आता तारीख आणखी पुढे ढकलली गेल्याने एक वेगळीच समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ३ तारखेला आहेत. आता हा निकाल या स्पर्धांच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे. तसं झालं आणि आपल्या सर्वाच्या दुर्दैवाने आपण या 'वार्षिक परीक्षे'त नापास झालोच, तर आधीच अनेक अपघातांनी जर्जर झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी तो शेवटचा आघात ठरावा... अर्थात तारीख जाहीर करताना मायबाप सुप्रिम कोर्ट या सगळ्याचा विचार नक्की करेल, अशी आशा आहे.
आता स्पर्धा संपल्यानंतरची तारीख मुक्रर झाली, तर मात्र काही काळ स्पर्धांच्या निमित्ताने आसेतूहिमाचल पसरलेला कृत्रिम तणाव नाहीसा होण्यास मदत होणार आहे...
असो... परीक्षा पुढे ढकलली की हुशार विद्यार्थी ती इष्टापत्ती मानतात आणि नियोजित वेळेत वाचायचे राहून गेलेल्या विषयांची उजळणी करतात... पण एखादा ढ कार्टा असेल, तर परीक्षा पुढे गेल्याच्या आनंदात एकतर सिनेमाला जाऊन बसतो किंवा नाक्यावर टंगळ-मंगळ तरी करतो... आपली कॅटेगरी कोणती ते काळच ठरवेल!!!

Wednesday 22 September 2010

मॅच्युरिटीची लिटमस टेस्ट...

परवा, २४ तारखेला दुपारी साडेतीन नंतर आपल्या देशाची वार्षिक परिक्षा आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूबाबत गेली ६० वर्षे सुरू असलेल्या खटल्याचे निकालवाचन सुरू होण्याची ही वेळ असेल. यावेळी आपला देश आणि अर्थातच राजकारण्यांच्या परिपक्वतेची लिटमस चाचणी होणार आहे.
- गेल्या ६० वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खटला दाखल झाल्यानंतर बाबरी वादावरून अनेक दंगलीही झाल्या. याचा कळस गाठला १९९२ सालाने... कारसेवेच्या नावाखाली बाबरी मशिद (किंवा ढाचा!) उध्वस्त केली गेल्यानंतर देशभरात दंगली झाल्या... त्यात हजारो हिंदू आणि मुस्लिमांचे शिरकाण केले गेले. लोकांना शांत करण्याऐवजी डोकी भडकविण्याची कामं दोन्ही धर्मांच्या धुरिणांनी (आणि काही राजकीय नेत्यांनीही) केली. या दंगलींना 'उत्तर' म्हणून मुंबईत १२ मार्च रोजी दाऊद इब्राहिम पुरस्कृत स्फोटमालिका घडल्याचे मानले जाते. पहिल्या चाचणी परिक्षेत आपण नापास झालो होतो...
- २००२ साली अशीच एक कारसेवा अयोध्येत केली गेली. त्यासाठी देशभरातून विहिंपचे शेकडो कार्यकर्ते गेले होते. गुजरातमधील कारसेवकांचा डबा गोध्रा स्थानकात पेटवून देण्यात आला. यात सुमारे ६० जण (यातील बहुतांश विहिंपचे कार्यकर्ते होते) मारले गेले. त्यानंतर जातीय दंगलींमध्ये गुजरात भाजून निघाला... १ ते २ हजार लोकांचा बळी या दंगलींनी घेतला. गुजरातच्या मोदी सरकारच्या आशिर्वादानेच या दंगली घडविल्याचा आरोप आजही केला जात असून या प्रकरणातले अनेक खटले प्रलंबित आहेत... ही सहामाही परिक्षा मानली तर त्यातही आपण सपशेल आपटी खाल्ली होती... एकही विषय असा नव्हता की ज्यात आपल्याला ३५ टक्के देता यावेत...
- २००५ साली अयोध्येतील वादग्रस्त स्थळी अतिरेकी हल्ला झाला. यावेळी सुरक्षा दलांनी पाच इस्लामी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं... यावेळी देशात कोणतीही भडक प्रतिक्रीया उमटली नाही... दुसरी चाचणी (नऊमही) परिक्षेचा गड यावेळी आपण सर केला. हिंसा भडकविण्यासाठी हा हल्ला केल्याचं मानलं जात असलं तरी अशी कोणतीही प्रतिक्रीया उमटली नाही.
- २६/११ला झालेल्या प्रिलिम परिक्षेत मात्र आपण उत्तम गुण मिळविले आहेत. मुंबईवर झालेला भयानक हल्ला... यावेळी सगळा देश एकजूट असल्याचे चित्र हायला मिळाले. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानने आपल्यावर लादलेले युद्ध आहे, अशी भावना हिंदूंबरोबरच मुस्लिम धर्मियांचीही होती. कसाब वगळता मारल्या गेलेल्या ९ अतिरेक्यांवर अंत्यसंस्कार करण्यास किंवा त्यांना भारताच्या मातीत चिरनिद्रा देण्यास मुस्लिम समुदायाने कडवा विरोध केला. या घटनांमुळे आपण पूर्वीपेक्षा अधिक मॅच्युअर झाल्याची झलक बघायला मिळाली.
- २४ सप्टेंबर रोजी आपली वार्षिक परिक्षा आहे. आत्तापर्यंत आपण दाखविलेली प्रगती आपण कायम ठेवणार की पुन्हा आपली गुणांची पाटी कोरी होणार, हे या दिवशी ठरेल. वातावरणात तणाव आहे... किंबहुना हा कृत्रिम तणाव उत्पन्न केला गेला आहे. उत्तर प्रदेशात निमलष्करी दले मागविणे, विविध पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंच्या भेटी घेणे, सतत शांतता राखण्याचे आवाहन करणे या गोष्टींमुळे वातावरणनिर्मिती झाली आहे.
निकाल काहीही लागला तरी कोणीतरी आनंदी होणार आणि कोणीतरी संतापणार हे निश्चित आहे. दोन्ही बाजूंना मान्य होईल, असा निकाल येण्याची शक्यता फारच अंधुक आहे. एकवेळ दोन्ही पक्ष नाराज होतील, अशी स्थिती येऊ शकते. पण win-win situation असणं जवळजवळ अशक्यच... हा निकाल हायकोर्टाचा असल्यामुळे नाराज झालेल्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग निश्चित खुला आहे. दोन्ही बाजूंकडून तसं बोलूनही दाखवलं गेलंय... सर्वांनीच लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय आणि केंद्र व सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्याचं स्पष्ट केलंय...
मात्र त्या दिवशी प्रत्यक्षात काय घडतं, यावर आपल्या परिपक्वतेची पातळी मापली जाणार आहे. ही अंतिम परिक्षा आपण पास होऊ ही अपेक्षा आहे. या महत्त्वाच्या परिक्षेसाठी देशाला आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक नेत्यांना आणि सर्व राजकीय पक्ष आणि सरकारांना हार्दिक शुभेच्छा...

Friday 7 May 2010

प्राणप्रिय मोटरमन...

मी तुला कधीच पाहिलेले नाही. आपली थेट ओळखही नाही. एखादवेळी रागा-लोभाच्या क्षणी आपण भेटलो असू-नसू... पण त्यानं काहीच फरक पडत नाही. ज्याप्रमाणे हवा दिसत नाही पण तिचे अस्तित्व सतत जाणवते. गदिमांच्या भाषेत ‘कधी भक्त का पाहतो ईश्वराला... नदी न्याहळी का कधी सागराला...!’ तसा माझ्यासाठी तू... आपल्या भारती संस्कृतीत ‘ग्राहको देवो भवः’ असं म्हणतात... पण इथं मी ग्राहक असले तरी माझा देव मात्र तूच आहेस. गेल्या दोन दिवसांत ‘देव कोपल्या’वर काय होतं, त्याचा प्रत्यय मला पुरेपुर आला. अखेरीस तुझा कोप दूर झाला व तू पुन्हा आमची ‘सेवा’ घ्यायला सुरूवात केलीस, हे समजल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला...
‘नाक दाबलं की तोंड उघडतं...’ अशी एक म्हण आहे. ही म्हणदेखील तू अपुरी ठरविलीस. ‘एकाचं नाक दाबलं की दुस-याचं तोंड उघडतं...’ अशी नवी म्हण तू जन्माला घातली आहेस. प्राण गुदमरेपर्यंत माझं नाक दाबल्यानंतर अखेर सरकारच्या तिजोरीचं तोंड थोडं का होईना, किलकिलं झालं आहे. त्यामुळे तुझं अभिनंदन केलं पाहिजे... आता मी हे खवचटपणाने बोलतेय, असं वाटत असेल तुला... पण मी खरंच मनापासून म्हणतेय.
तू ज्या मागण्यांसाठी माझं नाक दाबलंस, त्या योग्य की अयोग्य हे ठरविण्याची माझी लायकी नाही. ‘कोणीही यावे टपली मारून जावे...’ या आपल्या सांघिक खेळात कायम माझ्यावरच राज्य असतं आणि तूझ्यासारखे अनेक जण टपली मारून जात असतात. एखादी टपली थोडी जोरात बसते (कालच्यासारखी). पण माझी सहन करायची ताकद अमर्याद आहे. अशा पदोपदी टपल्या खाणारीने तू आणि तुझ्या मालकांमध्ये बोलू नये, हे समजतं मला... पण या मागण्यांसाठी तू पत्करलेल्या मार्गाचं कौतुक केल्यावाचून रहावत नाहीये.
खरंतर सकाळी ६ वाजल्यापासून तू उपोषण करून गांधीगिरी सुरू केली होतीस. हेच जर तू मध्यरात्रीपासून केलं असतंस, तर कदाचित सकाळपासून गाड्यांचा गोंधळ झाला असता आणि मी मुंबईत (ऑफिसला) गेले नसते. घरीच राहिले असते. पण तू सकाळी ६पासून उपास सुरू केलास. त्यामुळे एक मन नको म्हणत असताना गाडी राईट-टाईम असल्याने मी मुंबईत गेलेच. दिवसभर काम करून आणि अनेकांच्या ‘टपल्या’ खाऊन थकल्यावर घरी यायला निघाले आणि अचानक तुला चक्कर आली, हॉस्पि़टलात न्यावं लागलं... ही तुझी आयडिया चांगली होती. तुझा घाव अतिशय योग्य जागी लागला. माझ्या नाकावर तू दाबलेला चिमटा अधिक घट्ट झाला. माझा जीव गुदमरला... पण त्या क्षणी तुला आणि तुझ्या मालकांना माझी चिंता नव्हतीच... (ती तशी कधीच नसते म्हणा!) मी घरी कशी पोचले, कधी पोचले का कुठल्यातरी स्टेशनच्या कोप-यातल्या बाकावर एकटीच बसून रात्र काढली... याच्याशी तुला काही घेणंदेणं असायचं कारण नाही. घरी माझी पिल्लं वाट बघत असतील, माझे म्हातारे आई-बाबा, सासू-सासरे एकटे असतील, याच्याशी तुला काय घेणंदेणं असणार? उलट माझे जितके जास्त हाल होतील, तितकं तुला बरं होतं... नाही! तू मुद्दाम मला त्रास द्यायला हे केलंस, असं मला म्हणायचं नाहिये. किंबहूना आपले संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत, असंच मला वाटतंय. पण मला होणारा त्रास तुझ्याच फायद्याचा आहे, हे नाकारण्यातही अर्थ नाही...
माझे कसे हाल झाले किंवा तू कसा चुकलास हे सांगण्याची माझी इच्छा नाही आणि त्यानं काही फरक पडेल, असंही नाही. त्यासाठी हे पत्र नाही. तुझ्या मागण्या मान्य होणार आहेत म्हणे. त्याकरिता तुझं अभिनंदन करण्यासाठी हा पत्रप्रपंच... आणि समजा मालकांनी आश्वासन दिलं असलं तरी त्या नाहीच झाल्या मान्य, तरी चिंता करू नकोस... माझं नाक शाबूत आहे. तुला वाटेल तेव्हा त्याला चिमटा लाव... ते कापून टाक... काय हवं ते कर... पण मागण्या सोडू नकोस. त्या तुझ्या आणि तुझ्यामुळे माझ्या अस्तित्वासाठी फार गरजेच्या आहेत. माझी चिंता करू नकोस... माझी सहनशक्ती भक्कम होती, आहे आणि राहील...

तुझी कायम कृपाभिलाषी,
एक अतिसामान्य लोकल प्रवासी
ताजा कलम – पुन्हा आबांना भेटलास की हा खालचा भाग फाडून त्यांना दे प्लीज...

------------------------------------------------------------

प्रिय आबा,
तुम्ही मोटरमन आणि त्यांचे मालक यांच्यात शिष्टाई करून अखेरीस हे प्रकरण मिटविल्याचे समजले. हे तुम्ही माझ्यासाठीच केलेत, असे मानले तरी त्याला ३० तास का लागले, हा प्रश्न मला छळतो आहे. आता मी घरी पोचले आहे. जर गाड्या आणखी चार दिवस धावल्या नाहीत तर मी घरीच राहणार... ऑफीसला जाणार नाही... त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होणार... हा विचार करून तर तुम्ही घाई केली नाहीत ना?
असो. नसेल तसं... उगीच विचार आला डोक्यात इतकंच... राग मानू नका!

तुमची,
ए.अ.लो.प्र.

Wednesday 14 April 2010

एक शोध ‘देवा’चाही...!

(दै. लोकमतच्या रविवार दि. ५ एप्रिलच्या 'मंथन' पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा माझा लेख ब्लॉगवाचकांसाठी पुन्हा...)

विश्वाची निर्मिती कशी झाली.... अनादी काळापासून किंवा असे म्हणुयात की मानवाला ‘समज’ आल्यापासून छळणारा हा प्रश्न... विज्ञान सिद्धांतांच्या आधारे तर धर्ममार्तंड ग्रंथांच्या आधारे त्याची उत्तरे देत असतात. ‘सर्न’मध्ये झालेल्या महाप्रयोगामुळे हे ब्रह्मांड घडविणा-या ‘देवा’चा शोध शास्त्रज्ञांना लागेल का? प्रयोगाच्या इतक्या प्राथमिक अवस्थेत या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे नाही... पण कल्पनेला थोडा ताण दिला आणि आपली ‘देवा’ची व्याख्या व्यापक केली, तर हे उत्तर मिळूही शकते...
-------------------------------
‘सर्न’मधील प्रयोगात विश्वाच्या या उत्पत्तीचे रहस्य शास्त्रज्ञांना उलगलेड काय? या आदीम प्रश्नाचे उत्तर या प्रयोगातून मिळू शकेल, असे अनेकांना वाटते आहे. ते सिद्ध करण्याचे दोन प्रकार असू शकतात... एक म्हणजे थिअरॉटिकल आणि दुसरा प्रॅक्टिकल... थिअरॉटिकली बिग बँग सिद्ध करण्यासाठी गणिताचा आधार घेतला जाईल आणि तो विषय फारच क्लिष्ट असेल. दुसरा मार्ग असेल तो प्रॅक्टिकल... या प्रयोगातून हाती आलेल्या गोष्टी तपासून... पण आजवर कोणीच “विश्व’ निर्माण केलेले नसल्यामुळे हाती आलेल्या गोष्टी बरोबर आहेत, हे तपासणार तरी कसे...
प्रयोगातून काय साध्य होऊ शकते?
अध्यात्मिक किंवा गणिती प्रश्नही बाजुला ठेऊन भौतिक जगाचा विचार केला खरेतर या प्रयोगातून शास्त्रज्ञांच्या हातात मोठा खजिना लागू शकतो. विश्वाची निर्मिती कशी झाली... यापेक्षा एका बिंदुतून निर्माण झालेल्या या विश्वातील सूर्य नावाच्या ता-याचा तिसरा ग्रह वाचविता येईल का, याचे उत्तर मिळू शकते... सध्याचा सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे अर्थातच ‘ग्लोबल वॉर्मिंग...’ या ग्लोबल वॉर्मिंगवर कायमचा इलाज शास्त्रज्ञांना मिळू शकतो... अणुपेक्षाही हजारो पट अधिक उर्जा देणारी... कोणताही कचरा मागे न सोडणारी... कुठल्याही प्रकारचे प्रदुषण न करणारी... अर्थात हे इतक्यात साध्य होणार नाही. त्यासाठी अनेक वर्षेही जावी लागतील कदाचित. पण खरोखर ही वस्तू पुढेमागे तयार करता आली आणि मुख्य म्हणजे ती साठवून ठेवणे शक्य झाले तर संबंध पृथ्वीचा उर्जेचा प्रश्न चुटकीसरशी निकालात निघू शकेल... ती वस्तू म्हणजे अँटीमॅटर...
अँटीमॅटर काय आहे?
आपण पाहतो ते विश्व पदार्थाचे किंवा मॅटरचे बनलेले आहे. पदार्थाच्या अणूंमध्ये मध्यभागी असलेला प्रोटॉन हा धन विद्युतभारीत (possitive) असतो तर त्याभोवती ऋण विद्युतभार असलेले इलेक्टॉन्स फिरत असतात... मात्र हेच जर उलट असेल, म्हणजे ऋण विद्युतभार केंद्रस्थानी आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स (शास्त्रीय भाषेत पॉझिट्रॉन्स) धन विद्युतभारीत असतील तर त्याला वैज्ञानिक भाषेत प्रतिपदार्थ किंवा अँटीमॅटर म्हणतात... गणिताचा आधार घेऊन शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की मॅटर आणि अँटीमॅटर संपर्कात येताच एकमेकांचा नाश करतील... याला ‘एनिहिलेशन' म्हणतात. हा निव्वळ उर्जेचा उत्तम स्त्रोत... एकवेळ अँटीमॅटर तयार झाला तरी तो साठवून ठेवणे अशक्यच आहे... कारण या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट, अगदी हवादेखील मॅटरची बनलेली आहे. त्यामुळे हा अँटीमॅटर ठेवणार कुठे आणि कशात? या प्रश्वाचे उत्तर संशोधकांवर सोपवणेच योग्य होईल... राहता राहिला प्रश्न ‘सर्न’मधील प्रयोगातून देवाचा शोध लागू शकेल का...? या मुळ प्रश्नाला बगल देऊन अँटीमॅटरचं पुराण लावायचं कारण इतकंच की जरी साठवून ठेवता आला नाही, तरी अँटीमॅटर असतो... तो असू शकतो... ही गोष्टच देवाच्या अस्तित्वाला सप्रमाण सिद्ध करणारी ठरेल... हे विधान बहुदा खुळचटपणाचं किंवा नास्तिकतेचं वाटेल... या विधानाचा तर्कसंगत विचार करायचा तर आधी विश्वाच्या निर्मितीबद्दल धर्म काय सांगतो, ते बघायला हवे...
ब्रह्मांडाची निर्मिती... धर्मग्रंथ काय सांगतात?
वैज्ञानिक मानतात की, विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली. हिच ती ‘बिग बँग थिअरी.’ एक बिंदू होता... या बिंदूला ‘हिग्ज बोसन’ किंवा ‘देवाचा कण (God’s Particle)’ असे नाव दिले गेले आहे. त्याचा महास्फोट झाला आणि त्यातून हे ब्रह्मांड घडले, असे विज्ञान मानते... महदाश्चर्याची गोष्ट म्हणजे ही थिअरी सर्वप्रथम मांडली बेल्जियममधील एका ख्रिश्चन धर्मगुरूने... फादर जॉर्जेस लेमिटर यांनी... त्यानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडविन हबल याने गणिताच्या आधारे या बिग बँग थिअरीला बळकटी दिली. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबलमधील विश्वाच्या निर्मितीचे वर्णन आहे... देव म्हणाला प्रकाश होऊ दे... आणि प्रकाश झाला... हिंदू वेद-पुराणे सांगतात की एका बिंदूतुन ब्रह्माने हे विश्व जन्माला घातले... हीदेखील एक प्रकारे ‘बिग बँग थिअरी’च... जगातील सर्व धर्म सांगतात की देवाने जग निर्माण करताना नेहमी ‘समानता’ (symmetry) साधली आहे. प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती... देवदूत आणि सैतान... सज्जन आणि दुर्जन... विश्वाच्या निर्मितीतमधील ही सिमेट्री विज्ञानालाही मान्य आहे... प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली हा या सिमेट्री-थिअरीचा सर्वात मोठा भोक्ता होता, यात सर्वकाही आलेच... आता या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा आपल्या अँटीमॅटरकडे पाहिले तर काय दिसते?
अँटीमॅटर आणि सिमेट्री...?
जर शास्त्रज्ञांना जिनिव्हातील या महाप्रयोगातून अँटीमॅटर तयार झाल्याचे दिसले, तर विश्वाच्या निर्मितीतील ही सिमेट्री आपोआप सिद्ध होणार आहे. अँटीमॅटरचा उर्जेसाठी वापर, ग्लोबल वॉर्मिंग कमी करायला त्याची होऊ शकणारी मदत... इत्यादी भौतिक गोष्टी बाजुला ठेऊनही विश्वाची निर्मिती करताना निसर्गाने सिमेट्री बिघडविलेली नाही... हे सप्रमाण सिद्ध होऊ शकेल... जसा प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... तसाच हा मॅटर आणि अँटीमॅटर... हे सिमेट्री-बिमेट्री ठिक आहे... पण ‘देवाचा शोध’ कसा लागेल... हाच प्रश्न पडला असेल ना?
जिनिव्हाच्या ‘हायड्रॉन कोलायडर’मधील ‘देव...?’
देव म्हणजे दगडाची मूर्ती... देव म्हणजे पंचमहाभूते... देव म्हणजे निसर्ग... देव म्हणजे आपले मन... या सगळ्या रुढ कल्पना बाजूला ठेवल्या आणि देव म्हणजे एक शक्ती आहे, असे मानले तर... विज्ञानाची मोठी झेप घेणा-या माणसाची नजर ‘ब्रह्मांड संपते’ तिथपर्यंत अजूनही पोहोचू शकलेली नाही... ‘असे हे ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती म्हणजे देव...’ अशी जर देवाची व्यापक व्याख्या केली, तर ‘सर्न’ या केवळ विज्ञान आणि विज्ञानालाच वाहिलेल्या... देवाचे नाव जिथे घेतले जात नाही अशा अत्याधुनिक प्रयोगशाळेतील एका २७ किलोमीटर लांब नळीतून शास्त्रज्ञांना या देवाचा ‘साक्षात्कार’ होणे अवघड नाही...!

Sunday 28 March 2010

वड्डा शाणा छे नरेनभाई...!

काल दिवसभर नरेंद्र मोदींची चौकशी सुरू होती... गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींमध्ये गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत काँग्रेसच्या खासदाराची हत्या झाली होती... या प्रकरणी सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने, अर्थात एसआयटीने ही चौकशी केली... इत्यादी... इत्यादी... दिवसभर हेच सगळ्या चॅनलवर सुरू होतं... आज रविवार असल्याने बहुदा हेच दिवसभर चालणार... पेपरमध्ये सकाळी उठल्यावर हेच वाचणार आहोत आपण सगळे, त्यामुळे खोलात जात नाही...
आत्ता रात्रीचे २ वाजतायत. मोदींची चौकशी संपून तासभरच झालाय. पण त्याबद्दल प्रकार्षानं काही गोष्टी वाटल्या, म्हणून लगेच लिहायला बसलो...
नरेंद्र मोदींची चौकशी होणार... दंगल प्रकरणी चौकशी होणार... ही बोंबाबोंब गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खरंतर या एसआयटीनं मोदींना २१ तारखेला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यावेळी ते तिथे गेलेच नाहीत. उलट त्यांनी जाहीर पत्र लिहिण्याचा घाट घातला... त्यामुळे मोदी चौकशीला घाबरतात, अशी आरोळी दिली गेली. बरं त्यांनी लिहिलेलं पत्रही खास होतं, वैगरे नाही. साधंच... म्हणजे कायदा सगळ्यांना सारखा आहे... कायद्याचा मी मान राखतो इत्यादी...
काल मात्र त्यांनी तब्बल नऊ-साडेनऊ तास चौकशीत विचारलेल्या ६०-७० प्रश्नांची उत्तरं अधिका-यांना दिलीच. याचा अर्थ ते चौकशीला घाबरतात ही भिती अनाठायी होती, असा घ्यायचा का? पण या कृतीने त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत...
पहिला पक्षी : २१ तारखेची चौकशी टाळून त्यांनी आपणहूनच घाबरत असल्याचा देखावा उभा केला. जेणेकरून जेव्हा चौकशी होईल, त्यावेळी तिला वलय प्राप्त व्हावं आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं.
दुसरा पक्षी : एका मुख्यमंत्र्याला तुम्हाला हवं त्यावेळी चौकशीला बोलावू शकत नाही, हे त्यांनी एसआयटीला दाखवून दिलं. एसआयटी जरी सुप्रिम कोर्टानं नेमली असली तरी तिने दिलेली तारीख पाळायला ते कोर्ट नाही, हे त्यांनी जाताजाता अधोरेखित करून टाकलं.
पक्षी तिसरा : त्यांना व्हिलन बनवण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांना त्यांनी तशी पार्श्वभूमी तयार करू दिली. कारण त्यांना त्या काळ्या रंगावर स्वतःचा (म्हणजे त्यांच्या मते.... ते स्वच्छ आहेत, असं मला म्हणायचं नाही.) पांढरा रंग लख्ख उठून दिसावा...
पक्षी चौथा : इतकी मिडीया-हाईप झाल्यावर आजच चौकशी संपवायची आहे, असं सांगून तमाम हिंदी-इंग्रजी चॅनलवाल्यांना रात्री १ वाजताचं बुलेटीन लाईव्ह करायला लावलं...
स्वतःबद्दल कुतूहल निर्माण केल्यानंतर काल दोन्ही वेळा उत्तरे देऊन बाहेर पडताना ते हसतमुखाने मिडियाला सामोरे गेले... पुन्हा त्यांनी मिडियाला काही माहिती पुरवली का.... तर नाहीच! हे सुप्रिम कोर्टाचं पथक असल्यामुळे ते त्यांची माहिती कोर्टाला देतील, मला ती देण्याचा अधिकार नाही, असं सांगत त्यांनी अन्यच मुद्द्यांवर भाषणबाजी केली.
गुजरात दंगली सरकार पुरस्कृत आहेत किंवा नाही, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल पुरस्कृत (किंवा गोघ्राकांडामुळे ते भडकून उठले, असं म्हणा हवं तर) होत्या, हे मानायला जागा आहेच. संघाच्या मुशित तयार झालेले नरेंद्र मोदी प्रत्यक्षात जरी दंगलीत दगड मारत नसतील, तरी त्यांना या काळात काय घडतंय, ते माहितीच नव्हतं, असं म्हणणं भोळसटपणाचंच ठरेल. कारण एकतर मुख्यमंत्री आणि जे दंगली करत होते, त्यांना अधिक जवळ... त्यामुळे माहितीचे स्त्रोत अधिक असणारच! पण या चौकशीतून काय निष्पन्न होणार? मोदींइतका मुरलेला राजकारणी स्वतःलाच अडचणीत आणणा-या गोष्टी एसआयटीला सांगेलच, याची शाश्वती कोणी द्यायची? त्यामुळे मोदींनी स्वतःहून स्वतःभोवती वलय निर्माण करून कालच्या चौकशीचा आणखी मोठा फार्स घडवून आणला (कर्टसी - मिडिया) हेच यातील सत्य असावं, असं वाटतंय...
स्वतःविरुद्ध पडलेला एखादा फासा डाव जिंकण्यासाठी कसा वापरावा, याचं उत्तम उदाहरण मोदींनी या निमित्तानं देशातील मी-मी म्हणणा-या तमाम नेत्यांना घालून दिलं आहे, हे मात्र खरं... स्वतःच्या विरोधात मोठ्ठी हवा निर्माण करायची आणि हवा एकदा पुरेशी वाहू लागली की त्यात पतंग उडवून मौज लुटायची... ही मोदींची खेळी 'चोक्कस'च म्हणाली लागेल...
'तमे वड्डा शाणा छे.... नरेनभाई!'

Saturday 20 March 2010

माया मेमसाब...!

मायावतींचं एक बरं आहे... स्वतःचे मोठ्ठेच्या मोठ्ठे पुतळे स्वतःच उभारायचे... स्वतःला नोटांचे हार घालून घ्यायचे... आणि त्यावर कोण बोललं की 'दलित की बेटी' मोठी झालेली यांना चालत नाही, असं म्हणत गळा काढायचा...

हे म्हणजे मुंबईत राहणा-या झोपडपट्टीतल्या लोकांसारखंच आहे. रहायचं झोपडीत. आत टीव्ही, डिश टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, फ्रीज, एअर कुलर असं सगळं असतं. मग ती झोपडी पाडायला कोणी गेलं की 'बेघर केलं' असं म्हणत बोंब ठोकायची...
मायावती यापेक्षाही एक पाऊल पुढे गेल्यात. फक्त बेघर केलं असं म्हणून त्यांचं भागत नाही. बाबासाहेबांचं नाव घेत दलितला बेघर केलं, असं म्हणून सहानुभूती मिळवायची, असला हा त्यांचा उद्योग... त्या दलित घरातल्या आहेत, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आल्या असू शकतात वैगरे... सगळं मान्य.... पण जर तसं असेल तर त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी काय केलं, ते जगासमोर यायला नको का? दलित घरातून येऊन देशातल्या सगळ्यात मोठ्ठ्या राज्याचा मुख्यमंत्री झालेली ही बाई... तिनं स्वतःचे पुतळे उभे करण्यापेक्षा उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात खेडोपाडी शाळा काढल्या असत्या तर त्या गावातल्या दलित जनतेनेच त्यांचे पुतळे उभारले असते. त्यासाठी राज्य सरकारच्या किंवा गेलाबाजार पक्षाच्या तिजोरीत हात घालायची गरजच पडली नसती. पण काशिराम (सॉरी... मा. कांशिराम) यांच्या पुतळ्याजवळ स्वतःचा फूल साईज पुतळे त्यांनी स्वखर्चाने (?) उभारले.... यात जनतेचं त्यांनी काय आणि कसं भलं केलं, हे त्याही सांगू शकणार नाहीत.
पुतळ्यांचा प्रश्व अजून मिटलेला नाही. केंद्र सरकारने त्याच्या खर्चाचा तपशील शोधण्याचे आदे दिलेत. न्यायसंस्थेनंही या उधळपट्टीवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. हे संपत नाही तोच मायावतींनी बसपाच्या मेळाव्यात १००० रुपयांच्या नोटांचा हार स्वतःच्या गळ्यात घालून घेतला. कहर म्हणजे त्यावर चहूबाजूनी झोड उठल्यावरही दुस-या दिवशी आणखी एक हार घालून घेतला. आणि या कहराचा कहर म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जाहीरच करून टाकलं, 'बहेनजी जिथे जिथे जेव्हा केव्हा जातील, तिथे त्यांना नोटांचाच हार घालू...!' आता झोपडीत राहणा-या (म्हणजे खरोखरच्या... टीव्ही-फ्रीजवाल्या झोपडीत नव्हे) रंजल्या-गांजलेल्या दलिताचं मायावतींनी नोटांचे हारच हार घालून कसं भलं होणार? येता जाता बाबासाहेब-महात्मा फुल्यांचं नाव घ्यायचं आणि त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्याऐवजी विमानातून शॉर्टकट मारायचा... हे कसलं नेतृत्व.... हे कुठले नेते... यांना कोण निवडून देतं... का निवडून देतं... निवडून दिल्यानंतर 'तुम्ही असं का केलंत' हे विचारण्याचा अधिकार जनतेला नाही का... की तिने मुकाटपणे पुढली पाच वर्षं असली थेरं बघत बसायची...
मायावतींचं हार प्रकरण म्हणजे आपल्या देशाचं राजकारण किती हीन दर्जाला जाऊन पोहोचलंय, त्याचं जातिवंत आणि ताजं उदाहरण आहे.
मायावतींच्या पक्षाचे नेते सांगतात की हारासाठी लागलेला पैसा जनतेकडून गोळा केलाय... उत्तर प्रदेशातल्या जनतेकडे जर इतका पैसा असेल तर मग महागाईच्या नावाने गळा काढायचा अधिकार कोणाला उरतो... ना जनतेला, ना नेत्यांना...
यापेक्षा १० पट मोठी पोस्ट लिहिली तरी कमीच पडेल आणि इतकं लिहून मनातला संताप कमी होईल याची शक्यता नाहीच... किती लिहिणार आणि का लिहायचं, असा विचार करून इथेच थांबावं, हे बरं...

Thursday 4 March 2010

एका सस्पेन्सची अखेर...!


प्रमोद महाजन यांचा मारेकरी प्रवीण याचा अखेर अंत झाला... काही जण म्हणतात 'पापाचं प्रायश्चित्त मिळालं...,' काही जण म्हणतात 'बरं झालं गेला एकदाचा...,' पण प्रवीणच्या अकाली मृत्यूमुळे एका सस्पेन्सची अखेर झालीय, हे मात्र खरं...
प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडणारा... त्यानंतर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होणारा... आणि त्यानंतर कोर्टात 'नॉट गिल्टी' असं सांगणारा... खालच्या कोर्टानं जन्मठेप ठोठावल्यावर वरच्या कोर्टात अपिल करणारा... प्रमोद महाजन यांच्यासोबतचे प्रसंग 'माझी डायरी'च्या रुपानं शब्दांत मांडणारा... अशी प्रवीणची अनेक रुपं. त्यानं आपल्या 'डायरी'त प्रमोदला हिरो-टर्न-व्हिलन असं रंगवलंय. प्रमोद महाजनांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि संघटन कौशल्याबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही 'प्रवीणनं जे लिहिलंय ते धादांत खोटं आहे...' असं म्हणवत नाही. कारण प्रमोद महाजनांचं आयुष्यही तितकंच गूढ होतं. प्रवीणनं प्रमोदजींमध्ये बदल होण्याचं खापर विवेक मैत्रा याच्या माथी फोडलंय... राहूलबद्दल प्रवीणनं प्रमानं लिहिलंय... राहूललाही विवेकनंच बहकवलं, असा काहीसा प्रवीणच्या लेखनाचा सूर आहे. स्वयंसेवक प्रमोद आणि राजकारणी प्रमोद यांच्यातला फरक प्रवीणनं मांडलाय. त्यांची घरात चालणारी दादागिरी काहीशी भडक असली तरी त्यातला १० टक्के अंश खरा मानायला हरकत नाही.
प्रमोदजींची हत्या झाल्यापासून 'प्रवीणनं हे कृत्य का केलं...?' याची चर्चा होत राहिली. कोर्टात आणि बाहेरही प्रवीण सतत म्हणत आलाय की, त्याचं कारण तुम्हाला कधीही समजणार नाही... म्हणजे दिसतं तितकं साधं कारण नाही, हे प्रवीणनं अप्रत्यक्षपणे सुचित केलंय. या हत्येमागे घरगुती कारण असेल का? की प्रवीण प्रमोदजींचा करत असलेला अत्यंतिक द्वेष, हे कारण असेल...? की यात काही राजकीय धागे गुंतले आहेत? याचं उत्तर दोनच व्यक्ती देऊ शकत होत्या. एकतर स्वतः प्रमोदजी किंवा प्रवीण... आता हे दोघंही नाहीत.
प्रमोदजींच्या अल्प पण दैदिप्यमान आयुष्याची अखेर कशामुळे झाली, या सस्पेन्सचा शेवट झालाय... 'हा सस्पेन्स तुम्हाला कधीच कळणार नाही,' असं म्हणत सस्पेन्स वाढवणारा प्रवीणच आता इतिहासजमा झालाय...

Wednesday 24 February 2010

जहॉंपना... तुसी ग्रेट हो..!

एकदिवसीय सामन्यात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच २०० धावा ठोकण्याचा पराक्रम दुसरं कोण करू शकणार होतं...
'मला वाटलं ते...!'कडून आणि या ब्लॉगच्या वाचकांकडून सचिन रमेश तेंडूलकरला शतशः मनःपूर्वक धन्यवाद...
(attn. ऍनॉनिमस : मला धन्यवादच म्हणायचं आहे... उगाच चुक काढू नये. अभिनंदन करण्याची आपली कोणाचीच योग्यता नाही. आपली एक संध्याकाळ धन्य केल्याबद्दल सचिनचे आभारच मानायला हवेत...)

Monday 22 February 2010

ए.सी. संस्कृतीचा बुरूज सर...?

किल्ला राखायचा कुणी... किल्ल्याच्या मालकाला प्रश्न. ज्या कष्टानं 'कमळगड' उभारला, जोपासला, तब्बल ६ वर्षं राजधानी म्हणून जो किल्ला देशभर मिरवला... त्याचे बुरूज बेढब झाले होते... त्यांची डागडुजी आवश्यक होती. इतकी वर्षं किल्लेदार असलेल्यांना ते काही जमलं नाही... करायचं काय? मालकाला चिंता... शेवटी पांढ-या मिशीत हसून मालकानं काही निर्णय घेतला आणि तो अमलात आणला...
किल्ल्यात अनेक वर्षं काढलेल्या एका भरभक्कम मानक-याची नेमणूक 'किल्लेदार' म्हणून केली आणि किल्ल्याची डागडुजी करण्याची, त्याला चांगलं रूप देण्याची अशक्यप्राय जबाबदारी सोपवली... या किल्लेदाराला यापुढे आपण सोयीसाठी 'गडकरी' म्हणूयात...
तर... या 'गडकरीं'पुढचं आव्हान कठीण... किल्ल्याची डागडुजी करायची, रंगरंगोटी करायची हे काम वाचून वाटतं तितकं सोपं नाहीये... कारण या 'गडकरीं'च्या बरोबरचे जे लढवय्ये आहेत, त्यांना ए.सी. छावण्यांमध्ये झोपायची सवय लागलीये... प्रत्येक जण आपला आपापला बुरूज सांभाळण्यात व्यस्त... एकानं आपल्या बुरूजाला भगवा रंग दिलेला... दुस-यानं निळा... तिस-यानं लाल.... त्यामुळे एकूण किल्ल्याचं रुप विदुषकासारखं झालेलं... 'गडकरी'चं पहिलं काम होतं या सगळ्यांची तोंड एकमेकांकडे फिरवण्याचं... मालकांनी दिलेली असाईनमेंटच होती ती... झालं 'गडकरी' कामाला लागले...
किल्ल्यावरचे सगळे मानकरी-कामगार-सैनिक वर्षातून एकदा किल्ल्यावरच्या जत्रेसाठी एकत्र येत... 'गडकरी'नं ही संधी साधायचं ठरवलं... जत्रेच्या ठिकाणी त्यांनी सगळे एकाच रंगात रंगवलेले, एकसारखे दिसणारे तंबू उभारले... दरबारातले सगळे मानकरी एकाच पातळीचे आहेत, हे दाखवण्यासाठी... हा पहिला प्रयत्न... पण तो फसला! कारण दिवसभर दुस-या किल्ल्यावर आणि किल्लेदारांवर तोंडसूख घेऊन झालं की आपापल्या ए.सी. छावणीत झोपायला जायचं, हे प्रत्येकानंच ठरवलेलं. (ए.सी.ची सवय झाली होती. काय करणार?)
प्रयोग दुसरा. आपल्या भाषणात गडकरीनी सगळ्या मानक-यांना फैलावर घेतलं... बुरूजांच्या वेगवेगळ्या रंगांवर टीका केली... ए.सी.ला चटावलेल्या मानक-यांचे वाभाडे काढले... लोक किल्ल्याबद्दल जे बोलतात, ते मालकाला आवडत नाही, हे सांगितलं... सामान्य सैनिक आणि कर्मचा-यांशी संबंध वाढवायला सांगितलं... कायम घोडागाड्यांमध्ये फिरणा-यांना पायी जायला सांगितलं... एक ना अनेक...
'गडकरी'चं भाषण झालं... सगळ्या मानक-यांनी ऐकून घेतलं... सैनिकांनी-कामगारांनी टाळ्या वाजवल्या...
एकीच्या आणाभाका झाल्या... दुस-या किल्ल्यातल्या लोकांना नावं ठेऊन झाली... जत्रा संपली... सगळे मानकरी आपल्या ए.सी. बुरूजांकडे परतले... जाताना सगळे जण गालातल्या गालात हसत होते...!!!

Wednesday 10 February 2010

माय नेम ईज 'वाद...'

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू असावेत की नाही... यावरून पेटलेल्या वादानं शिवसेना आणि शाहरूख खानमध्ये सध्या चांगलीच जुंपलीय... शाहरूखचं म्हणणं असं की खेळात राजकारण आणू नये आणि शिवसेनेचे म्हणणं असं की मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तानशी संबंध तोडायचे म्हंटल्यावर भारतातल्या अलिकडच्या काळातल्या मोठ्या स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये त्यांच्या खेळाडूंना येऊच देऊ नये...
खरंतर या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा हवाला दिला, तर शाहरूख बरोबर आणि 'राष्ट्रप्रेमा'ची कसोटी लावली तर शिवसेना १०० टक्के बरोबर...
शाहरूखचं म्हणणं वरवर खरं दिसत असलं तरी तो स्वतः कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे... त्यानं लिलावानंतर पोपटपंची करण्यापेक्षा त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना का घेतलं नाही? त्यानं एखादा खेळाडू घेतला असता आणि मग त्याला शिवसेनेनं विरोध केला असता, तर शाहरूखकडे एकतरी हुकमाचा पत्ता असता... पण त्यानं 'लोका सांगे ब्रह्मज्ञान...' या उक्तीला स्मरून नंतर बडबड करणं पसंत केलं... का? अहो, कारण सरळ आहे... त्याचा 'माय नेम ईज खान' येऊ घातलाय... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा सोनेरी मुलामा देऊन थोडा पाकधार्जिणेपणा दाखवला तर सिनेमाच्या प्रमोशनला मदत नाही का होणार???? इतका साधा-सरळ हिशोब आहे... त्यात शिवसेना-भाजप किंवा आणखी कोणी विरोध केलाच तर उत्तमच... अन्यथा सिनेमाची इतकी फुटक पब्लिसिटी कशी होणार?
बरं... शाहरूख ज्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची बाजू घेऊन गळा काढतोय, ते 'स्पोर्ट्समन स्पिरीट'च्या कसोटीवर किती उतरतात, हे तो बघणार नाही का? शाहीद आफ्रिदी सफरचंद खावं तसा बॉल खात होता. मैदानात १७ ते २० कॅमेरे असताना त्याची चेंडू कुरतडण्याची हिम्मत झाली... आफ्रिदीही आयपीएलसाठी उपलब्ध होता आणि शाहरूखला त्याला घेण्याची इच्छा होती म्हणे... आता या आफ्रिदीसाठी त्याला कोलकाता संघात घ्यायला इच्छुक असलेल्या शाहरूखनं 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चं नाव घेत बोंब मारावी? हे म्हणजे 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं पहायचं वाकून' अशातली गत नाही का?
मुंबई हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी शाहरूखला कंठ का फुटला नाही? कारण स्पष्ट आहे... कारण त्या वेळी शाहरूख खानचा 'माय नेम ईज खान' नावाचा सिनेमा येऊ घातला नव्हता... त्या वेळी एका विशिष्ट समाजाची सहानुभूती मिळवण्याची त्याला व्यावसायिक गरज नव्हती...
अनेक बुद्धिवादी सांगत असतात की, सिनेमा ही कलाकृती आहे... त्याकडे त्याच नजरेनं पाहिलं जावं... आपले मंत्रीही हाच सल्ला देतात... पण मग अवधूत गुप्तेच्या झेंडाला राणेंच्या स्वाभिमाननं केलेला विरोध चालतो का?
सरकारचं म्हणणं असं की विरोध जरूर करा पण सनदशीर मार्गानं करा... पण शिवसेनेची कार्यपद्धती पाहता, पक्षाचा इतिहास पाहता शिवसेनेकडून आणखी कशा प्रकारचा विरोध अपेक्षित आहे? 'खान'चे प्रयोग बंद पाडा.... शाहरूखसमोर निदर्शनं करा.... त्याची पोस्टर्स जाळा.... असे आदेश शिवसैनिकांना द्यावे लागत नाहीत. पोर जन्माला येताना ज्याप्रमाणे श्वास घ्यायचं शिकूनच येतं, तसं काहीसं शिवसेनेचं आहे. 'खान'ला विरोध करा, इतकं मातोश्रीवरून सांगितलं तरी प्रत्येकाला माहित असतं नेमकं काय करायचंय ते...! आता मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना सेनेची ही पद्धत माहित नाही, असं कसं मानायचं? आणि सनदशीर मार्गानं विरोध करायचा, म्हणजे नेमकं काय करायचं? 'सरकारनं आपला आवाज ऐकावा' यासाठी भगतसिंगांनी संसदेत स्फोट घडवला. त्यावेळी कोणाला इजा होऊ नये, साधं खरचटूही नये, याची काळजी घेत मोकळ्या जागी हातबॉम्ब फेकला... हा मार्ग सनदशीर म्हणायचा की हिंसक? आत्ता प्रसिद्धी मिळवणं ही सेनेची राजकीय गरज आहे, हे काही अंशी खरं असलं तरी अशी कुठलीही गरज नसतानाही (उदा. राज ठाकरे सेनेत असताना वैगरे...) बाळासाहेबांनी वेळोवेळी राष्ट्रवादी भूमिका घेतलीय... मग वानखेडे स्टेडियमचं पिच उखडणं असेल किंवा बाबरी मशिद पाडल्याची जबाबदारी स्विकारणं असेल....
सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरूखला आलेला पाकिस्तानचा कड प्रामाणिक आहे, असं म्हणायला हवं... कारण बुद्धिवाद्यांनी कितीही घोषा लावला तरी 'चित्रपट बनवणे' हा एक व्यवसाय आहे... नव्हे कोट्यवधींचा व्यवसाय आहे. आता धंदा करायचा म्हंटल्यावर त्याची जाहिरात करणंही आलंच की... आमीर खान वेगवेगळी रुपं घेऊन देशभर फिरतो, ते चालतं... शाहरूखनं पाकिस्तानची बाजू घेतलेली खपत नाही... असं कसं? शाहरूखला आलेला क्रिकेटचा पुळका हा त्या धंदेवाईक विचारातून आलाय. त्यामुळे त्यानं केलं ते चूक असं कसं म्हणणार...
Everything is fare in LOVE and WAR... and this is BOX OFFICE WAR...