Tuesday 17 July 2012

वयम् पंचाधिकम् शतम्...

"सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनही पांडवांना देणार नाही..." 
सुयोधनाची ही प्रतिज्ञा भावी महायुद्धाची नांदी ठरली... ध्रृतराष्ट्रांनी त्याचं हे वाक्य प्रमाण मानलं... भीष्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मात्तब्बर राजकारण्यांनीही सुयोधनालाच पाठिंबा देऊ केला...
अर्जुनासह पांडवांना १४ वर्षांचा वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवास भोगायला लागला. ही १५ वर्षं संपल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं... अखेरीस श्रीकृष्णानं अर्जुनाचं सारथ्य केलं आणि अर्जुनासह पांडवांना मौलिक उपदेश करून एकेक करून कौरवांचे धनुर्धर पाडले आणि युद्धाची समाप्ती झाली...

हे झालं ओरिजनल महाभारत... कलियुगात अशी अनेक महाभारतं घडत असतात. मात्र त्यात दरवेळी असंच होतं, असं नाही... इथं काय झालं ते ऐका!

"सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनही पांडवांना देणार नाही..." 
सुयोधनाची ही प्रतिज्ञा भावी महायुद्धाची नांदी ठरली... ध्रृतराष्ट्रांनी त्याचं हे वाक्य प्रमाण मानलं... भीष्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मात्तब्बर राजकारण्यांनीही सुयोधनालाच पाठिंबा देऊ केला...

दोन्ही बाजुंनी युद्धाची संपूर्ण सिद्धता झाली... ध्रुतराष्ट्रांनी जरी सुयोधनाची बाजू घेतली असली, तरी सुयोधन आणि अर्जुनादी पांडव एकत्र यावे असंच त्यांनाही वाटत होतं. किंबहुना अर्जून उघड-उघड ध्रुतराष्ट्र हेच आपला आदर्श असल्याचं सांगायचा आणि सुयोधनाच्या राजकारणाला कंटाळून आपण हस्तीनापूर सोडल्याचं म्हणायचा... अर्जुनाचं बोलणं-चालणं-वागणंही थेट ध्रुतराष्ट्रांच्या प्रमाणेच... त्यामुळे अनेकांना अर्जून हाच हस्तीनापूरचा उत्तराधिकारी आहे, असं वाटायचं. मात्र सुयोधनानं केलेली प्रतिज्ञा आणि ध्रुतराष्ट्रांचं पुत्रप्रेम यामुळे गोची झाली होती... 

दोन्ही बाजू दोन वर्षांनी होऊ घातलेल्या युद्धाच्या सिद्धतेला लागल्या होत्या... तत्पु्र्वी छोट्या-मोठ्या लढायांमध्ये दोघंही आपापलं बळ आजमावत होते. कधी अर्जुनाची सरशी व्हायची तर कधी सुयोधनाची... त्यामुळे प्रत्यक्ष महायुद्धात काय होईल, हे कोणालाच सांगता येणं कठीण होतं... ध्रुतराष्ट्रांना वेळोवेळी युद्धाचं वृत्त आणि सल्ले देणारा 'संजय'ही गोंधळात पडल्याचं दिसत होतं. (महायुद्ध झालं, तरच आपल्याला आपली अंतर्ज्ञान विद्या  वापरता येणार, असं वाटत होतं आणि युद्ध व्हावं, असंच त्याला वाटत होतं, हा तपशिलाचा भाग झाला...) 

एकदा अशीच युद्धाची तयारी सुरू असताना सुयोधनाच्या छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या... त्याला तातडीनं राजवैद्यांकडे नेलं गेलं. राजवैद्यांनी त्यावर उपाय सांगितले आणि आराम करण्याचा सल्ला दिला... सुयोधनाच्या या स्थितीचं वर्तमान दुतांकरवी अर्जुनाकडे पोहोचलं आणि तो गहिवरलाच... द्रोणाचार्यांच्या आश्रमात एकत्र घालवलेले क्षण, हस्तीनापूरात ध्रुतराष्ट्रांच्या मांडीवर एकत्र खेळलेले खेळ, असं सगळं त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिलं आणि स्वतः युद्धाची तयारी सोडून अर्जुन थेट राजवैद्यांच्या आश्रमात दाखल झाला आणि अर्जुन-सुयोधनाची गळाभेट झाली... इतक्यावरच अर्जुन थांबला नाही, तर रस्त्यांवरच्या खड्यांचा सुयोधनाला त्रास होऊ नये, म्हणून त्याच्या परदेशातून आलेल्या रथाचा चाप अर्जुनानं स्वतःच्या हातात घेतला आणि त्याला सुखरूप हस्तीनापूरात पोहोचवला... खरंतर वनवासाची सात वर्षंच लोटली असताना अर्जुनानं हस्तीनापुरात येण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं... हे हस्तीनापुरातल्या संजयादी काही राजकारणी मंडळींना पसंत पडलं नसलं, तरी कौरव-पांडवांच्या सैन्यांमध्ये मात्र यामुळे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय...

एकमेकांसोबत युद्ध करण्यापेक्षा "वयम् पंचाधिकम् शतम्" असं म्हणत सुयोधन आणि अर्जुन हस्तीनापुराच्या अन्य मोठ्या शत्रुंशी लढण्यासाठी खांद्याला-खांदा लावून उभे राहोत, अशी प्रार्थना हे सैनिक आता करू लागले आहेत म्हणे! अर्थात, रणवाद्यं छेडली जात नाहीत... रणभेरी निनादत नाहीत... पाञ्चजन्य-देवदत्त फुंकले जात नाहीत... तोपर्यंत अर्जुन-सुयोधनाचं हे प्रेम कायम टिकतं की त्यांच्यात पुन्हा कटुता येते, यावरच युद्धाचं स्वरूप अवलंबून राहणार आहे... 

Wednesday 4 July 2012

पुन्हा ये... रे... ये.... रे...

२००९ साली पावसानं आता मारलीये तशीच दडी मारली होती. नंतर पडला चांगला. पण तेव्हाही जुलै उजाडला तरी त्याचा पत्ता नव्हता. त्यावेळी १ जुलै रोजी लिहिलेल्या पोस्टची लिंक खाली दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता ३ वर्षांनंतरही परिस्थितीत काडीचा फरक पडलेला नाही. विधानसभा निवडणुका वैगरे तात्कालिन प्रसंग वगळता आताही परिस्थिती तशीच आहे. ही खरंच गमत्तशीर गोष्ट आहे आणि आपले राज्यकर्ते आणि आपणही, किती निर्ढावले आहोत, त्याचंच हे प्रतिक आहे.
आपण जुन्या गोष्टी पटकन विसरतो. पब्लिकची मेमरी शॉर्ट-टर्म असते, असं एक खास मराठी वाक्य आपल्याला माहिती असतं... त्यातंच हे प्रतिक म्हणता येईल का?


पाऊस आलाच नाही तर?

Thursday 28 June 2012

पंतप्रधानाचा धर्म...

हा ब्लॉग लिहायला थोडा उशीर झालेला वाटू शकतो... कारण तसा गेल्या एक-दोन आठवड्यांत चर्चिला गेलेला हा विषय आहे. मात्र काल एका मित्राशी बोलत असताना हा विषय निघाला आणि आज सुदैवानं थोडा वेळ होता... त्यामुळे हिंदुत्ववादी पंतप्रधान हवा की नको, या विषयावर लिहावं असं वाटलं...

-------------------


मुळात हा मुद्दा पंतप्रधानाच्या धर्माचा नाही, तर पंतप्रधान होण्यास इच्छुक असलेल्या दोन नेत्यांमधल्या स्पर्धेचा आहे. यातले एक आहेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि दुसरे आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. हा वाद हिंदुत्वाच्या रिंगणात जाण्याचं मुख्य कारण म्हणजे या दोघांनीही आपण पंतप्रधान होण्यास लायक असल्याचं सिद्ध केलंय. दोघांचीही प्रतिमा विकासाभिमुख, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा अशी आहे. नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीला असलेली काळी किनार म्हणजे गुजरात दंगली... या दंगलींमध्ये केलेली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पापं मोदींना आमरण भोवणार आहेत. नितीश कुमारांचा मुद्दा हा याचाच पहिला अध्याय म्हटला पाहिजे. कारण दोन वर्षांनी (कदाचित आधीही) होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची दाट शक्यता सर्वांनाच दिसते आहे. अशा वेळी पंतप्रधान कोण असणार, हा प्रश्न निश्चितच निर्माण होणार आहे आणि कुमारांनी निर्माण केलेला हा वाद या प्रश्नाला पार्श्वभूमी देणारा आहे...
उद्या एनडीएची सत्ता आलीच, तर मोदींचा अडसर दूर करण्याची तयारी आतापासून केलेली बरी, असं त्यांना वाटत असण्याची शक्यता आहे. खरंतर नितीश कुमारांनी घाई केली, असं मला वाटतं... कारण मोदी पंतप्रधान झालेले त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना नको आहेत... उद्या एनडीएची सत्ता आली, तर त्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असणार हे उघड आहे. अशा वेळी भाजपामध्ये अनेक नेते गुढग्याला बाशिंग बांधून सजले असल्यास नवल नाही... मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, व्यंकय्या नायडू, आता नितीन गडकरी आणि 'आजन्म भावी पंतप्रधान' लालकृष्ण आडवाणी या सगळ्यांना पार करून मोदींना जावं लागणार आहे आणि हे नेते त्यांच्या वाटेवर फुलांच्या पायघड्या घालण्याची शक्यता अजिबात नाही... पण धर्मनिरपेक्ष चाळणी लावली, तर हे सगळेच नेते बाद होऊ शकतात, कारण बाबरी मशिदीचे दगड यांच्याही भिंतींसाठी वापरलेले आहेतच... त्यामुळे एनडीएमध्ये नितीशबाबू किंवा शरदबाबू यादव हे आपण एकमेव धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करू शकतात... त्यामुळे हिंदुत्ववादी पंतप्रधान नको, असं कुमारांना वाटू लागल्यास नवल नाही...

मात्र इथं नितीश कुमार एक महत्त्वाचा इतिहास विसरलेले दिसतात. 'हिंदू तन मन.. हिंदू जीवन... रग रग हिंदू मेरा परिचय...' असं म्हणणा-या अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात शरदबाबू आणि नितीशबाबू हे दोघंही मंत्री राहिलेले आहेत... अटलबिहारी वाजपेयी हे केवळ कवितेतून हिंदू नव्हेत, तर संपूर्ण हिंदुत्त्ववादी नेता आहेत, हे या दोघांना माहिती नसेल, असं कसं म्हणणार... 

-------------------


पंतप्रधान होण्यासाठी नितीशकुमार एकटेच मोर्चेबांधणी करतायत, असं मानायचं कारण नाही... मोदींनाही आपल्याला भविष्यात मिळू शकणा-या या संधीची कल्पना निश्चितच आलेली आहे आणि त्यांची पावलं नेमकी त्याच दिशेनं पडत आहेत. संजय जोशींना इतका टोकाचा विरोध करण्याचं तेच कारण आहे... याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ती मोदी पहिल्यांदा मु्ख्यमंत्री होण्यापूर्वीची... प्रचारक असलेल्या माणसानं मुख्यमंत्री होऊ नये, असं म्हणून जोशींनी त्यावेळी आपला जुना मित्र नरेनभाईच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. तेव्हापासून मोदींचा संजय जोशींवर रोष आहे. नंतर बनावट असल्याचं सिद्ध झालेली जोशींच्सेया सेक्सस्कॅंडलची सीडी ही गुजरातमध्येच जन्माला आल्याचं बोललं जातं. (अर्थात ही वदंता आहे, पण आग असल्याशिवाय धूर निघत नाही म्हणतात...) बिहार निवडणुकांची जबाबदारी संजय जोशींवर दिल्यानंतर मोदी तिथं प्रचाराला गेले नाहीत, संजय जोशी भाजपात राहिले असते तर त्यांनी थेट मुंबईत झालेल्या कार्यकारिणीला टांग देण्याची तयारी केली होती... अखेरीस त्यांनी जोशींची सरचिटणीस पदावरून उचलबांगडी करायलाच लावली... इतक्या वर्षांनीही मोदींनी खुन्नस कायम ठेवल्याचं कारण काय असू शकतं? ही जुनी खुन्नस नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदींनी लावलेली फिल्डिंग आहे, असं मला वाटतं. कदाचित २०१४ साली भाजपाची सत्ता आलीच, तर मोदींच्या नावाला पहिला विरोध हा संजय जोशींचा असू शकतो आणि ते पक्षाचे सरचिटणीस असतील, तर त्यांच्या विरोधाला ब-यापैकी वजन प्राप्त होणार, हे उघड आहे. जोशींची ढाल करून आडवाणी ते गडकरी असे सर्व स्वपक्षीय इच्छुक मोदींवर वार करू शकतात. त्यामुळे मोदींनी या ढालीला भोक पाडण्यासाठी आपलं सगळं वजन वापरलं... इतकं, की दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनाही त्यांनी या अकाली वादात ओढलं... भागवतांनी हिंदुत्त्ववादी पंतप्रधान का नको, असा सवाल करत नितिश कुमारांना आव्हान देऊन टाकलं... खरंतर भागवतांच्या या अस्थानी विधानाची खरोखरच काही गरज नव्हती. हिंदुत्व आणि हिंदुत्त्ववाद याबाबत संघाची मतं काय आहेत, हे जगजाहीर आहे. पण भागवतांच्या या विधानानं पटावरला मोदींचा वजीर पुढे सरकवलाय. हे मात्र निश्चित... 


खरंतर 'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' यातला हा प्रकार आहे... निवडणुका अद्याप लांब आहेत. त्यातही भारतीय घटनेनुसार पंतप्रधान कोण होणार, हे आधी जाहीर करण्याची सक्ती कोणत्याच पक्षावर नाही. निवडणुका झाल्यानंतर बहुमतात निवडून आलेला पक्ष आपला संसदीय नेता कोण असणार, ते निवडतो व तो पंतप्रधान असतो. विरोधी पक्षांमधल्या सर्वात मोठ्या पक्षाचे खासदार आपला संसदीय नेता निवडतात व तो विरोधी पक्षनेता होतो... मात्र नितीश कुमारांनी उगीचच नेता जाहीर करा, असा सूर लावला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षीय बलाबलाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच याचा निवाडा होऊ शकेल. कारण अनेक शक्यता आहेत. त्या अशा...
१. भाजपा संपू्र्ण बहुमतात - एकट्या भाजपाला (किंवा भाजपा आणि त्याच्या हिंदुत्त्ववादी सहका-यांना मिळून) अर्ध्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर नितिश कुमारांचा मुद्दा आपोआपच बाद होईल आणि पंतप्रधान कोण होणार, याचा निर्णय एकटा भाजपा घेऊ शकेल. अर्थात, या पक्षातच अनेक इच्छुक असल्यामुळे ते काम सोपं होणार नसलं, तरी किमान नितिश कुमारांचा संयुक्त जनता दलाला त्यात मोजण्याचं कारण राहणार नाही...
२. एनडीए बहुमतात, भाजपा सर्वात मोठा पक्ष - ही नितिश कुमारांसाठी मोठी संधी असेल. सत्ता काँग्रेसकडे जाऊ नये, असं भाजपाला वाटत असेल तर त्यांना एखाद्या छोट्या पक्षाचा पंतप्रधान करावा लागेल आणि नितिश कुमार या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर असतील. या स्थितीत त्यांना मुख्य आव्हान असेल ते शिरोमणी अकाली दलाचं... पण विकासाच्या मुद्द्यावर कुमारांचं पारडं जड ठरू शकतं.
३. काँग्रेस किंवा भाजपाच्या पाठिंब्यावर तिसरी आघाडी - हीदेखील नितिश कुमार पंतप्रधान होऊ शकण्यासाठी आदर्श स्थिती असेल. उलट ते शरद पवार, चंद्राबाबू नायडू, जयललिता, मायावती, ममता बॅनर्जी अशा अनेक छोट्या पक्षांची धर्मनिरपेक्ष मोट बांधू शकतील. नितिश कुमारांच्या पक्षानं प्रणवदांना पाठिंबा दिल्यामुळे ते काँग्रेसच्या नको तितके जवळ आल्याचं दिसतंय आणि ही भाजपासाठी धोक्याची सूचना असू शकते. अर्थात, या कथित धर्मनिरपेक्ष तिस-या आघाडीला भाजपाही पाठिंबा देऊ शकेल...
४. पुन्हा काँग्रेस - पुन्हा काँग्रेस किंवा युपीए बहुमतात आल्यास पंतप्रधान कोण, हा प्रश्न फक्त १० जनपथपुरता मर्यादित होईल. अगदी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान करण्याची वेळ काँग्रेसजनांवर आलीच, तरीही नितिश कुमारांना ही संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण सध्या ते काँग्रेसजवळ सरकले असले, तरी गेली अनेक वर्षं ते भाजपासोबत आहेत आणि बिहारमध्ये युतीत सत्तेत आहेत. त्यामुळे झालं गेलं विसरून काँग्रेस त्यांना राजमुकुट देईल, अशी अजिबात शक्यता नाही.
पंतप्रधानपद ही 'बाजारातली तुरी' आहे. मात्र असं असताना नितिश कुमार आणि नरेंद्र मोदी (व्हाया सरसंघचालक) यांनी हा अकारण वाद घालून स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे, असं मला वाटतं. मतदार शाहणा असतो... जो खुर्चीसाठी टपून बसलेला असतो, त्याच्या गळ्यात विजयाची माळ कधीच घालायची नाही, असं गेल्या काही वर्षांत सिद्ध झालंय. (आठवा... वाजपेयींनी ६ महिने आधीच घेतलेल्या इंडिया शायनिंग निवडणुका, आडवाणींच्या स्वप्नरंजनात सरलेल्या २००९च्या निवडणुका इत्यादी) त्यामुळे बोलघेवडेपणा आणि अंतर्गत राजकारण न खेळता या दोघा विकासाभिमुख मुख्यमंत्र्यांनी आपलं काम करावं आणि नियतीला आपलं करू द्यावं, हेच इष्ट नाही का?

Thursday 14 June 2012

जुनी पोस्ट नव्याने...

आज असंच टाईमपास म्हणून माझाच ब्लॉग वाचत बसलेलो... (हल्ली ब-याच दिवसांत लिहिलेलं नाही... लिहिण्यासाठी काही इन्पिरेशन मिळतंय का, हे बघावं, म्हणून जुन्या पोस्ट बघत होतो.)  वाचताना ही पोस्ट नजरेसमोर आली आणि लक्षात आलं की अरे... १५ जून म्हणजे उद्याच की... म्हणजे या पोस्टला जवळजवळ ३ वर्ष झालीयेत आता... पण मध्य रेल्वेच्या कारभारात (नव्या गाड्या आल्यानंतरही) काडीचाही फरक पडलेला नाही... गेल्या तीन वर्षांत बहुदा एकदाही मध्य रेल्वे १०० टक्के वेळेवर धावलेली नसणार... त्यामुळेच मग त्यावेळी लोकसत्ता आणि मटा या दोन वर्तमानपत्रांनी दिलेल्या या बातम्यांचं महत्त्व किती आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे... असो! सहज गम्मत म्हणून ही जुनी पोस्ट कॉपी-पेस्ट करून टाकत आहे...



Wednesday, 17 June 2009

मध्य रेल्वेची "शंभरी...!"


आज सकाळी पेपरच्या आतल्या पानावर एक बातमी वाचली. मध्य रेल्वेनं म्हणे काल १०० टक्के वेळेवर येऊन दाखवलं... (बातमी पहा) खरोखर या पेपरवाल्यांना काहीच कळत नाही. इतकी महत्त्वाची बातमी आतल्या पानावर कुठेतरी फेकून द्यायची, म्हणजे काय? एकीकडे म्हणायचं, 'माणूस कुत्र्याला चावला' तरच ती बातमी... आणि दुसरीकडे मध्य रेल्वे वेळेवर धावली, तर त्याला आतल्या पानात कुठेतरी जागा द्यायची... याला काय अर्थ आहे. मराठीत आता एक नवी म्हण रूढ झाल्ये. "रोज म.रे. (म्हणजे आपली मध्य रेल्वे) त्याला कोण रडे..." अशी ख्याती असलेल्या या सगळ्यात मोठ्या सार्वजनिक वाहतुक यंत्रणेचा हा विक्रमच आहे.
म्हणजे कल्पना करा की हा शंभर नंबरी विक्रम मध्य रेल्वेनं रोज-रोज (अगदी १ इंच पाऊस झाल्यावरही...) केला तर काय होईल? अनर्थ ओढवेल अनर्थ.... म्हणजे बॉसला "गाडी लेट झाली" असं सांगून मैत्रिणीबरोबर चौपाटीवर फिरायला जाणं मुश्किल.... बायकोला "ओव्हरहेड वायर तुटली" असं सांगून बारमध्ये बियरच्या बाटल्या रिचवणं महाकठीण.... सासूबाई येणार असतील तर "मोटरमनचा संप आहे, येऊ नका..." असं सांगायची चोरी... "रुळांवर पाणी साचलंय... काल चालत घरी गेलो..." असं सांगून दुस-या दिवशी दांडी मारणं अशक्यच... अराजक माजेल. मग ही बातमी महत्त्वाची नाही का, तुम्हीच सांगा??
पण हे लिहिता-लिहिता वाटलं की आतलं पान-तर-आतलं पान.... बातमी तर छापली... म्हणजे मध्य रेल्वे वेळेवर धावली एखाद् दिवस तरी, म्हणजे ही "माणूस कुत्र्याला चावला..." या कॅटेगरीतलीच बातमी वाटली असणार छापणा-या प्रतिष्ठित वर्तमानपत्राला, नाही का? आणि पुन्हा ही बातमी छापताना त्यात मध्य रेल्वे लेट येते (म्हणजे काल सोडून....!) त्याची शंभर कारणं दिली आहेत. म्हणजे लोकं चेन (गाडीतली... गैरसमज नको!) ओढतात... (उगीचच), ओव्हरहेड वायर तुटते (उगीचच), सिग्नल बंद पडतात (उगीचच), लोक रेल-रोको करतात (उगीचच) त्याला मध्य रेल्वे काय करणार? रुळांवर पाणी साचतं, मालगाडी घसरते, इंजिनं फेल होतात त्याला मध्य रेल्वे काय करणार? असा एकूण या बातमीचा सूर आहे. ((दुस-या एका प्रतिष्ठित दैनिकानं ही बातमी फारसा मुलामा न देता दिल्ये. (बातमी पहा) या दैनिकानं मध्य रेल्वेवर किती अन्याय केलाय, याची कल्पनाच नाही करवत...))

तात्पर्य काय? तर रोज "म.रे." असं नाहीये... आता उद्या-परवा केव्हाही बदलापूर-टिटवाळा-कल्याण-डोंबिवली-कळव्यात गाडीत चढता नाही आलं... गाडी लेट झाली आणि लेटमार्क लागला... किंवा आता पावसाळा आलाच आहे... तेव्हा.... (सूज्ञ मुंबईकरांना अधिक सांगणे न लगे...!) असं काहीही झालं तरी सोमवार, दि. १५ जून २००९ हा सुवर्णदिन लक्षात ठेवायचा... "हाच तो दिवस ज्या दिवशी मध्य रेल्वे १०० % वेळेवर धावली होती..." असा जप १०० वेळा 'मनातल्या मनात' करायचा (मोठ्यानं केलात तर मार खाल कोणाचातरी...) आणि मुकाट्यानं दरवाजात... माफ करा, डोअरला लटकून मुसळधार पावसात भिजत ऑफीस गाठायचं... जय महाराष्ट्र... जय मुंबई... जय म.रे...

Wednesday 4 April 2012

पंचाला हात..!

ब्लॉगची सलग दुसरी पोस्ट लष्कराबाबत येतेय, हा निव्वळ योगायोग आहे... झालं असं, की 'लिहावं' असं वाटण्याजोग्या घटना नेमक्या लष्कराशीच संबंधित आहेत, त्यामुळे इलाज नाही...
-------------------------

आजच्या पहिल्या पानभर बातमीत इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं थेट केंद्र सरकारच्या पंचाला हात घातला आहे. ही बातमी अर्थातच सर्वांनी वाचली असणार. दिवसभर सगळ्या चॅनल्सवर सुरू असलेल्या चर्चा काही जणांनी ऐकल्या असणार.. या चर्चांत प्रश्न समोर येतात ते, घडलेली घटना खरंच घडली का? घडलीच असेल, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो?
इंडियन एक्सप्रेसनं केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी दिली, ही एक बाजू तर लष्कराच्या दोन तुकड्यांची मुव्हमेंट झाली होती आणि त्यामुळे केंद्र सरकारची झोप उडाली होती ही दुसरी बाजू... यामध्ये सुवर्णमध्य मांडणारेही काही जण आहेत. मुव्हमेंट झाली, मात्र तो रुटीनचा भाग होता असं ते म्हणतायत. यातलं सत्य-असत्य काय, यापेक्षा खरोखर हा बंडाचा प्रयत्न असेल, तर तो गैर आहे का असा प्रश्न माझ्या मनात येतो...
लष्कराला होली काऊ मानणारे हा उठावाचा प्रयत्न नव्हता, असं ठामपणे सांगत आहेत. अर्थात लष्कराची प्रतिमा जपण्यासाठी ते असं म्हणत असतील... पण माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की खरंच असं एखादं बंड झालं असतं आणि आपल्या लष्करानं सध्याचं निष्क्रीय आणि भ्रष्ट सरकार उलथून टाकलं असतं, तर ते चांगलं झालं असतं की वाईट? कोणी म्हणेल की असलं निकम्मं सरकार लष्करानं उठाव करून बडतर्फ केलं असतं, तरी चाललं असतं... माझंही मत तसंच आहे. पण सध्याच्या स्थितीत नाही. कारण एकतर हे सरकार लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं आहे आणि अजूनतरी त्यांनी लोकशाहीला धक्का लागेल असं काहीही केलेलं नाही. दुसरी गोष्ट आहे ती सध्याच्या लष्करप्रमुखांच्या विश्वासार्हतेची... लष्करातली सगळी कारकीर्द एका जन्मतारखेवर काढल्यानंतर (कदाचित लष्करप्रमुखपदी बढतीही याच तारखेमुळे मिळालेली असताना)  अचानक निवृत्त होताना त्यांना तारीख बदलावीशी वाटते... पूर्वी कधीतरी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचं ते आता निवृत्त होताना सांगतात... यामागे लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांची महत्त्वाकांक्षा आणि सरकारवर असलेली उघड नाराजीच ध्वनित होते. बंड करून अशा माणसाच्या हातात सत्ता जाण्यापेक्षा ती सध्याच्या सरकारकडे काय वाईट आहे... किमान आणखी दोन वर्षांनी त्यांना फेकून देण्याचा अधिकार तरी आपल्याकडे आहे. व्ही.के. सिंगसारख्या महत्त्वाकांक्षी लष्करी अधिका-यानं लोकशाहीच्या भल्यासाठी हे घडवलं असं मानणं खुळचटपणाचं ठरेल...
आपले काही लष्करी अधिकारी कितीही भ्रष्ट असले, तरी आपली सेना ही जनसामान्यांना अतिशय प्रिय आहे. असेच पॉप्युलर आर्म फोर्सेस असलेल्या इजिप्तचं उदाहरण आपल्याकडे ताजं आहे. तिथंही लष्करानं सत्ता हाती घेतल्यानंतर लोकांनी जल्लोष केला होता. आता त्यांचा भ्रमनिरास झाला आहे आणि त्यांनी लष्करी शासनाविरुद्धही आंदोलनं करायला सुरूवात केली आहे. आपल्याकडे याचीच पुनरावृत्ती झाली नसती कशावरून?
लष्कराच्या केवळ दोन तुकड्यांनी बंड करून भागलं नसतं, हेदेखील तितकंच खरं आहे... लष्कराव्यतिरिक्त आपल्या देशात वायुदल, नौदल, निमलष्करी दल अशी अनेक सैन्यदलं आहेत... त्यांना एकत्र केल्याशिवाय किंवा किमान शांत बसण्यासाठी प्रवृत्त केल्याशिवाय असं बंड होऊ शकत नाही. दिल्लीकडे कथितरित्या निघालेल्या दोन तुकड्यांच्या कमांडरना हे माहिती नसेल, असं भाभडेपणानं मानण्याचं काहीच कारण नाही...त्यामुळे या घटनेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघायची गरज आहे...
कदाचित हा रुटीनचा भाग असेलही... पण तो नसेल, तर ही सिंग यांची आणखी एक खेळी असू शकते. निवृ्त्त होण्यापूर्वी त्यांनी सरकारला जेरीस आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतल्या एक-दोन अधिका-यांना हातीशी धरून सरकारवर केवळ दबाव आणायचा आणि 'असंही होऊ शकतं' याची जाणीव करून द्यायची, असा त्यांचा हेतू असू शकतो... अर्थात हा जर-तरचा विषय झाला. पण अशा पद्धतीनं बातमी आल्यामुळे जगात आपली प्रतिमा डागाळली गेली आहे, हे मात्र निश्चित...
प्रतिमा लष्कराची डागाळली गेली तर आहेच, पण सरकारची, लोकशाहीची आणि भारतीय नागरिकांचीही...लष्कर आणि सरकार यांच्यात आलबेल असावं, असं कोणीच म्हणत नाही. पण किमान ही पेल्यातली वादळं पेल्यातच राहिलेली चांगली... या वादळाचा साद जगभर पसरणं देशासाठी हितावह नाही... प्रसारमाध्यमं, लष्करप्रमुख, सरकारी अधिकारी आणि मुख्य म्हणजे ही बातमी फोडणा-यांनी  याचं भान ठेवणं आवश्यक आहे... 

Wednesday 28 March 2012

होली काऊ... होली शिट्...

आपल्याकडे लष्कराला होली काऊ म्हटलं जातं... म्हणजे पवित्र गाय. त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, ऐकायचं नाही आणि बघायचं नाही... पण आपलं लष्कर खरोखर तितकं होली आहे का? गेल्या काही वर्षांमध्ये अशी अनेक प्रकरणं बाहेर आली. त्यावर दबक्या आवाजात चर्चाही झाली... पण आता खुद्द लष्करप्रमुखांनीच आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न झाला आणि तो बाहेरच्यानं नव्हे, तर एका निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिका-यानंच केला, असं जाहीर केलंय...
लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांचा सरकारवर विशेष राग आहे. त्यांना १ वर्ष आधी घरी पाठवण्याची घाई सरकारला का झाली आहे, हे स्पष्ट नाही आणि ते कधी होणारही नाही... पण मुद्दाम त्यांची जन्मतारीख बदलून देण्यामागे काहीतरी राजकीय स्वार्थ दडलाच नसेल, असं कसं म्हणणार! त्यामुळे मग सिंग यांनी जाता-जाता सरकारला जोर का झटका देण्याचं ठरवलेलं दिसतंय. त्यातूनच हे १४ कोटींचं प्रकरण त्यांनी पुढे रेटलंय... पण यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. त्याची उत्तरं स्वतः सिंग यांनाही द्यावी लागतील.
पहिली गोष्ट म्हणजे ही लाच देण्याचा प्रयत्न झाला, त्याच वेळी त्यांनी निवृ्त्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांच्या हातात बेड्या का ठोकल्या नाहीत... उलट अँटोनींनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार जनरल सिंग यांनी हे प्रकरण आपल्याला वाढवायचं नसल्याचं त्यांना सांगितलं होतं. हे खरं असेल, तर नेमका आत्ताच हा विषय छेडायचं कारण काय? यामुळे त्यांना सरकारची बदनामी करायची आहे की लष्कराची...
सिंग आणि अँटोनी यांच्या विधानांमध्ये सत्यता असेल, तर आपल्या लष्कराला भ्रष्टाचाराची कीड किती प्रमाणात पोखरते आहे, हे स्पष्ट होतं. पण सर्वाधिक दुःखाची बाब अशी, की ज्यांच्या हातात देशाच्या रक्षणाची खरी जबाबदारी असते, त्या सर्वसामान्य जवानांना यातून काहीच मिळत नसणार. सगळा मलिदा लाटला जात असणार तो वरच्या पदांवर... पोलिस खातं भ्रष्ट आहे, असं हे ओपन सिक्रेट आहे... पण त्यात निदान ताळातल्या हवालदारापासून ते कमिशनर, गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच काही ना काही मिळतं. (आता पोस्टनुसार त्यात फरक असेल, पण मोजके प्रामाणिक अधिकारी-जवान सोडले, तर सगळे या वाहत्या गंगेत हात धुतातच). म्हणजे मला भ्रष्टाचाराचं समर्थन करायचं नाही, पण निदान पोलिस खातं लष्कराच्या मानानं या बाबतीत सुदैवीच म्हणावं लागेल... लष्करात मात्र तसं नाही. या सात पुज्य असलेल्या आकड्यांच्या मलईमध्ये सीमेवर बर्फात किंवा वाळवंटात किंवा खोल समुद्रातल्या एखाद्या बोटीत डोळ्यात तेल घालून आपलं रक्षण करणा-या जवानांच्या नशिबी मात्र घरच्यांचा विरह, मिळेल ते कच्चं खाणं आणि आपलं नाव लिहिलेल्या गोळीची वाट बघणं यापलिकडे काहीच नसतं... बरं. लष्करात कडक शिस्त असते (म्हणे) त्यामुळे आपल्या वरच्या अधिका-यांनी किती खाल्लं, काय खाल्लं, का खाल्लं याचं उत्तर मागायचं नसतं. मागितलं आणि आपलंच कोर्ट मार्शल झालं तर काय घ्या?
सिंग यांच्या आरोपाची आता म्हणे सीबीआय चौकशी होणार आहे. म्हणजे आणखी किमान ५-१० वर्षं (सहा महिन्यातून एका बातमीचा अपवाद वगळता) हा विषय फाईलबंद झाल्यात जमा आहे. जेव्हा केव्हा सीबीआयचा अहवाल येईल आणि याचा निकाल लागेल, तोपर्यंत देशात एक पिढी पुढे गेली असेल. त्यामुळे त्यात कोणाला रस असणार नाही... आता बोफोर्स तोफा खरेदी प्रकरण, क्वात्रोचीची सुटका यात कोणाला इंटरेस्ट आहे सांगा... ही नावं आता केवळ राजकीय फायदा उचलण्यासाठी काही राजकीय पक्ष अधेमधे उच्चारत असतात इतकंच... आणखी १०-१२ वर्षांनी या प्रकरणाचं महत्त्वही तितकंच उरणार आहे. आपल्या 'होली काऊ' ची ही 'होली शिट्' आहे, इतकंच...

*****************
ताजा कलम  : विचारार्थ एक चौकट...


टू-जी स्कॅम 
१.७६ लाख कोटी 
राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा 
७० हजार कोटी 
सत्यम घोटाळा
१४ हजार कोटी 
चारा घोटाळा 
९०० कोटी 
आयपीएल घोटाळा 
काही शे कोटी...


सिंग यांना देऊ केलेली कथित लाच - (फक्त) १४ कोटी ? पटतंय का?

Tuesday 29 November 2011

R2020... क्रांती!

चेतन भगत हा माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक... किंबहुना भारतीय इंग्रजी लेखकांमध्ये सर्वात आवडता. काल दुपारी चेतनचं रिव्हॉल्यूशन २०२० हे नवं पुस्तक पोष्टानं हाती पडलं आणि आजची दुपार येईस्तोवर त्याचा फडशा पाडला. चेतनच्या पुस्तकांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रोलॉग वाचल्यावर एपिलॉग वाचेस्तोवर ते खाली ठेवावंसंच वाटत नाही. २४ तासांत पुस्तक संपवलं खरं, पण डोक्यात त्याचं कथानक रेंगाळतचं आहे. पण बाकीची कामंही आहेत, त्यामुळे विचारांना वाट मोकळी करून देणं खूपच आवश्यक आहे. म्हणून तातडीनं ब्लॉग लिहायला घेतला. त्या निमित्तानं गेल्या अनेक महिन्यांचा ब्लॉगसन्यास संपला, तर सोने पे सुहागा...

*****************************************************

रिव्हॉल्यूशन २०२०... खरंतर ही एक त्रिकोणी प्रेमकथा आहे. पण त्याला अनेक सामाजिक-आर्थिक-मानसशास्त्रीय  पैलू आहेत. चेतनच्या आधीच्या चारही कादंब-यांमध्ये ते थोडेफार आहेतच, पण आर२०२० (आरतीनं केलेला शॉर्टफॉर्म) या पुस्तकाइतकं कधीच नाहीत.
गोपाळ हा चेनतच्या अन्य हिरोंसारखाच 'लूजर..' त्याचा शाळेपासूनचा मित्र, राघव हुश्शार आणि मैत्रीण  आरती दिसायला सुंदर... स्टोरी तशी टिपिकल. गोपाळचं आरतीवर जीवापाड प्रेम... आरती त्याला आपला सगळ्यात जवळचा मित्र मानते (ते शाळेत असतानापासून सोबत असतात.) पण इंजिनियरिंग एन्टरन्समध्ये नापास झाल्यानंतर गोपाळ दुस-या गावी पुन्हा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातो आणि नेमके त्याच वेळी राघव आणि आरती जवळ येतात. ती तसं गोपाळला सांगतेही... गोपाळ परत आल्यानंतर त्याच्या मनात सुरू झालेलं द्वंद्व... तो आणि आरती पुन्हा आणि जास्त जवळ येणं.... राघवपासून वाढत असलेलं अंतर आणि असं बरंच काही...
पण या सगळ्या गोष्टीचा कणा आहे, राघवला हवी असलेली क्रांती... क्रांतीसाठी झपाटलेला राघव. त्याचा राजकारण्यांशी संघर्ष... त्याच वेळी त्याच राजकारण्यांच्या मदतीनं मोठा होत असलेला गोपाळ... त्यामुळे त्या दोघांमध्ये असलेला संघर्ष... अर्थात रावघच्या दृष्टीनं हा संघर्ष व्यावसायिक असला, तरी गोपाळसाठी तो आरतीचा प्रश्न असतो. त्याला कोणत्याही स्थितीत आरती हवी असते. तशी ती त्याच्याजवळ येतेदेखील... पण!
कादंबरीच्या शेवटची प्रकरणं चेतननं जबरदस्त घेतली आहेत. एका लहानशा प्रसंगामुळे सगळंच चित्र बदलतं आणि आपल्याला लूजर-पैशांच्या मागे लागलेला-लाचखोरी करणारा गोपाळ आपलंसं करून घेतो... अर्थात इथं शेवट सांगून कादंबरी वाचण्यातली मजा हिरावून घ्यायची नाही, त्यामुळे हे वर्णन इथंच थांबवतो.

*****************************************************

कादंबरीला चेतन भगतनं दिलेला सामाजिक आशय मात्र जबरदस्त आहे. त्याची थ्री मिस्टेक्स वगळता अन्य कादंब-यांमध्ये तसा तो तितका दिसत नाही. शिक्षणाचं बाजारीकरण, भ्रष्टाचार, हे प्रकार संपवण्याची गरज, त्यासाठी झपाटलेला राघव हे सामाजिक तसंच राघव आणि गोपाळच्या द्वंद्वात अडकलेली आरती, आपल्या झपाटलेपणामुळे तिच्यापासून दूर गेलेला राघव, वाराणसीच्या आमदाराची मनस्थिती आणि मुख्य म्हणजे गोपाळ... अशा अनेक मानसिक बाबी या कादंबरीत अतिशय योग्य पद्धतीनं हाताळल्या आहेत. एकूण काय, तर ही कादंबरी (नेहमीप्रमाणे) अतिशय वाचनीय आणि चिंतनीयही झाली आहे. इंग्रजी पुस्तक वाचण्याची आवड असलेल्यांनी ती वाचली पाहिजेच.. पण तशी सवय नसलेल्यांनीही वाचायला हरकत नाही. (अन्य भारतीय लेखकांप्रमाणे) कोणतीही क्लिष्ट भाषा न वापरताही कादंबरी रंजक होऊ शकते, हे वाचल्यावर लक्षात येईलच... So... Read R2020 for sure... Happy Reading....

Saturday 20 August 2011

अण्णा एके अण्णा...

आज घरी पुजा होती. त्यानिमित्त गावातले आणि जवळचे नातलग घरी आले होते. सध्या घरी-दारी एकाच विषयाची चर्चा आहे.. अण्णा हजारे. देशभरात अण्णा-लाट पसरलेली असताना आमचं घरही त्याला अपवाद कसं असणार? माझा वैयक्तिकरित्या आताच्या अण्णांच्या उपोषणाला विरोध आहे. त्यामुळे सहाजिकच मी अल्पमतातला... माझी मावसबहीण मधुरा एकदम अण्णामय झालीय. त्यामुळे अर्थातच मोठा वाद रंगला. त्यावेळी तिनं अनेक दावे केले. वादविवादात ते खोडून काढले असले, तरी मुळात मी पत्रकार असल्यामुळे बोलण्यापेक्षा लिहायची सवय अधिक. त्यामुळे ब-याच दिवसांनी ब्लॉग लिहायला मुहूर्त सापडला. त्या निमित्तानं आपले विचार शब्दांत मांडायची संधीही साधता येतेय, याचंदेखील समाधान....
--------------
पहिला मुद्दा म्हणजे अर्थातच देशभरात बोकाळलेला भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी अण्णांचं उपोषण आहे, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. दुसरा गैरसमज म्हणजे अण्णांचं उपोषण लोकपाल विधेयकासाठी आहे. ही दोन्ही गृहितकं चुकीची आहेत. अण्णांचं सध्याचं उपोषण हे त्यांनी देऊ केलेलं लोकपाल विधेयकच संमत झालं पाहिजे, यासाठी आहे. लोकपाल विधेयकासाठी उपोषण करण्याची गरज नाही. कारण ते संसदेत मांडलं गेलंय आणि स्थायी समितीकडेही पाठवण्यात आलंय. ही प्रशासकीय यंत्रणा आहे. इथं कोणतेही चमत्कार होत नसतात. त्या प्रक्रियेला जितका वेळ दिला गेला पाहिजे, तितका दिला गेलाच पाहिजे... प्रक्रिया सुरू झाली असती आणि मग बासनात बांधली गेली असती, तर मी अण्णांना संपूर्ण पाठिंबा दिला असता... आता पहिला गैरसमज... या उपोषणामुळे देशातला भ्रष्टाचार खरोखर संपणार आहे का? दिल्लीत आणि देशभरात झेंडे घेऊन घोषणाबाजी करणारे किती लोक प्रामाणिक आहेत? लायसन्स नसेल, तर किती जण दंड भरतात? पास नसताना पावती फाडण्याची तोषिश किती जण सहन करतात? ते सगळं जाऊदे... यातल्या किती लोकांनी आजवर सिक-लिव्हसाठी डॉक्टरचं खोटं प्रमाणपत्र दिलेलं नाही? आपण सगळेच भ्रष्ट झालेलो असताना एका उपोषणानं आणि नारेबाजी करून हा प्रश्न सुटणार नाही, हे समजण्याइतकं आपण सूज्ञ असायलाच हवं. चॅरिटी बिगिन्स ऍट होम, या धर्तीवर नॉन-करप्शन बिगिन्स ऍट होम, असं म्हणायला हवं. (आपण आपल्या मुलांनाही सांगतो, पहिला आलास तर सायकल घेईन. हे काय आहे?) याबाबत जनजागृती करण्यासाठी अण्णा आणि त्यांच्या टीमनं देशभरात दौरा केला असता, तर अधिक बरं झालं असतं...
भ्रष्टाचार कसा सुरू होतो, हे आपल्याला माहितीच आहे... त्याचं उदाहरण बघा...

--------------
अण्णांचा आग्रह पंतप्रधानपद लोकपालाच्या कक्षेत आणण्याला आहे. याची खरंच काय गरज आहे, हे समजण्या पलिकडचं आहे. पंतप्रधान हा लोकांनी निवडून दिलेल्या संसदेला उत्तरदायी असतो आणि आपल्या लोकशाहीत संसद ही सर्वश्रेष्ठ आहे. पंतप्रधानाला हटविण्याचा अधिकार संसदेला आहे... आणि जर योग्य प्रतिनिधी निवडून गेले, तर त्या संसदेची पंतप्रधानालाही जरब वाटेल. मग माझ्या मनात प्रश्न येतो की, योग्य लोकं निवडून का जात नाहीत? याचं उत्तर शोधताना पुन्हा दुर्दैवानं स्वतःकडेच बोट जातं. अण्णांना पाठिंबा देणारे किती जण नियमित मतदान करतात? लागून सुट्ट्या आल्या, की पिकनिकचे प्लॅन आखले जातात. अगदी गावात असलोच, तर टाकून येऊ मत... तेवढंच लोकशाही जपल्याचं पुण्य! पण मतदान हे आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये सर्वात तळाला असतं. मग चांगले लोकं संसदेत जाणार कसे आणि पंतप्रधानाला त्यांची भीती वाटणार कशी? मनमोहन सिंगांसारखा दुबळा पंतप्रधान असणं, हेदेखील आपल्याच मतदान नाकर्तेपणाचं फलित आहे, असं वाटत नाही का? कलमाडींना कोणी निवडून दिलं? राजांना कोणी निवडून दिलं? त्यांना मतं दिलेल्यांनी त्यांना निवडलं आहे, असं आपल्याला वाटत असेल, तर तो मोठ्ठा गैरसमज आहे. मतदान न केलेल्यांनी त्यांना लोकसभेवर पाठवलंय. केलेल्यांनी नव्हे!!!
--------------
आणखी एक प्रश्न... अण्णांना ज्यांचा पाठिंबा आहे, त्यांच्यापैकी, ती जणांनी जन लोकपाल विधेयकाचा मसुदा आणि लोकपाल विधेयकाचा मसुदा यांचा अभ्यास केला आहे? अभ्यास जाऊ दे, ती फार लांबची गोष्ट आहे. किती जणांनी या मसुद्यांचं फ्रंट कव्हर प्रत्यक्ष हातात घेऊन पाहिलंय? घरी राहून पाठिंबा देणारेही राहू द्या... रस्त्यावर उतरलेल्यांपैकी किती जणांनी ते पाहिलंय?
इथं एक स्पष्टिकरण केलं पाहिजे. मी कोणताही मसुदा पाहिलेला नाही. त्याचा अभ्यास ही तर डोक्यावरून जाणारी गोष्ट झाली... पण मला तशी गरज वाटत नाही. कारण मी अण्णांचं अंधानुकरण करत नाहीये. पण जे अण्णा-अनुयायी आहेत, त्यांनी तरी ते पाहिलेलं असावं, अशी अपेक्षा आहे... मला खात्री आहे, की यातल्या फार थोड्या लोकांनी हे पाहिलं असणार... पण मग रस्त्यांवर इतकी गर्दी का? रामलीला मैदान पॅक का झालंय?
माझ्या मते, देशभरातल्या रस्त्या-रस्त्यांवर व्यक्त होतोय, तो बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविषयीचा संताप... या संतापाचं प्रकटीकरण आपण अण्णांना असलेला पाठिंबा मानतो आहोत... पण अण्णांच्या निमित्तानं का होईना, देशात एक मंथन होतंय, ही चांगली बाब आहे. अण्णांच्या  (आरटीआय वगळता) भूतकाळातील आंदोलनांसारखी याची गत होऊ नये, ही प्रामाणिक इच्छा आहे. या निमित्तानं अर्धा भारत जरी जागृत झाला, तरी आपल्याला महासत्ता होण्यापासून कोणी अडवूच शकणार नाही... या आंदोलनाची परिणती काही का असेना, ते कोणत्याही भल्या-बु-या कारणानं अर्धवट राहू नये, ही माझ्यासह सर्वांना शुभेच्छा...

--------------

Sunday 15 May 2011

सेंट पर्सेंट बालगंधर्व...

सर्वप्रथम नितीन देसाई आणि त्यांच्या टीमचे आभार... बालगंधर्व केवळ पुण्यातल्या रंगमंदिरातील चित्रात पाहिलेल्यांना त्यांचं दर्शन घडवून आणल्याबद्दल...

आज बालगंधर्व हा चित्रपट पाहिला आणि पाहिला नसता तर आपण काय गमावलं असतं, याची सर्वप्रथम जाणीव झाली. एकतर बालगंधर्वांसारख्या ज्येष्ठतम रंगकर्मीच्या आयुष्याची ही कथा. त्यामुळे त्यात 'नाट्य' असणार, यात नवल ते काय? पण हे नाट्य ज्या खुबीनं पडद्यावर आलंय, त्याला तोड नाही. स्वतः चित्रपटांचे क्षेत्र न पटलेल्या बालगंधर्वांना यापेक्षा वेगळी श्रद्धांजली असूच शकत नाही. दैवाने (सु की दुर् हे पाहणा-याच्या दृष्टीकोनावर आहे... माझ्या दृष्टीने सु) मी टीव्ही माध्यमात काम केलं असल्यामुळे कोणत्याही हालत्या चित्रांकडे पाहण्याचा अँगल आपोआप वेगळा झाला आहे. कॅमेरा, एडिटिंग, लाईट यासारख्या गोष्टींकडे अन्यथा लक्ष जाण्याचं फारसं कारण नाही. त्यामुळेच अनेक चित्रपट त्यांच्यातल्या तांत्रिक दोशांमुळे आवडत नाहीत. बालगंधर्व मात्र याला सन्मान्य अपवाद ठरला याचा खूप आनंद वाटला...
०००००००००००००००००००००
मला भावलेला बालगंधर्व माझ्या ब्लॉग वाचकांसाठी थोडक्यात... अर्थात सर्वाधिक भावलेल्या पैलूंच्या चढत्या क्रमाने...
१. कथा - कथा आवडणारच होती, कारण ती बालगंधर्वांची होती.
२. पटकथा - बालगंधर्वांच्या आयुष्यातले चढ-उतार आणि त्यातलं नाट्य अत्यंत प्रभावीपणे मांडलं गेलं आहे. कोणताही संवाद किंवा एखादा शॉट हा ऊगीचच आहे, हा सीन नसता तर चाललं असतं, असं एकदाही वाटलं नाही. त्यामुळेच कथेपेक्षा जास्त पटकथा भावली.
३.छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी) - मराठी चित्रपटांमध्ये आभावानं आढळणारा हा गुण बालगंधर्वमध्ये दिसतो. अगदी पहिल्या शॉटपासून ते शेवटी मावळत्या सूर्याला सामोरे जाणा-या बालगंधर्वांपर्यंत... प्रत्येक ठिकाणी कॅमे-याचा अँगल, त्याचं फ्रेमिंग अतिशय अचुक झालं आहे. मराठी चित्रपटातही हे होऊ शकतं, याचं उदाहरण बालगंधर्वनं घालून दिलं आहे. ५. संकलन (एडिटिंग) - चांगल्या कॅमेरावर्कला चांगल्या एडिटिंगची साथ मिळाली, तर काय होऊ शकतं याचा पाठ बालगंधर्वमध्ये दिसतो. इफेक्ट्सचा भडीमार न करता केलेलं एडिटिंगही चांगलंच असतं, हे या चित्रपटानं दाखवून दिलं आहे. मध्यंतर होतानाचा शॉट हा एडिटिंगचा परमोच्च बिंदू ठरावा. बालगंधर्व पावसात भिजत जात आहेत... रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडलेल्या चंद्राचं प्रतिबिंब त्यांच्या पायानं मोडतं... पाणी परत स्थिरावत असताना मध्यंतर ही अक्षरं येतात आणि त्यातील ध्य वर असलेला अनुस्वार हा सूर्याचं प्रतिबिंब असतं... क्लासिक. जस्ट क्लासिक. (शब्दांत वर्णन करता येणं अशक्य आहे... बघायलाच हवा असा हा शॉट आहे.)
५. संगीत - कौशल इनामदार यांनी केलेला शास्त्रीय संगीताचा वापर हे एक कारण आहेच... शिवाय चित्रपटात जागोजागी पेरलेली बालगंधर्वांच्या नाटकातली पदंही गोड वाटतात. आर्या आंबेकरच्या पहिल्या बंदिशीसह सगळीच पदं-गाणी मस्त जमली आहेत. ऐकायला जाम मजा आली. राहुल देशपांडे केशवराव भोळेंच्या भूमिकेत भाव खाऊन गेले आहेत...
६. कलाकार - विभावरी देशपांडे यांनी लक्ष्मीबाई मस्त केली आहे. डाऊन टू अर्थ, सोशिक आणि तरीही कणखर...  लहानशा भूमिकांमध्येही आपल्याला प्राण ओतलेला दिसतो. अथर्व कर्वेच्या बाल नारायणापासून निर्माते नितीन देसाई यांच्या लोकमान्य टिळकांपर्यंत... प्रत्येकाचं काम मस्त आहे. सर्वांनी आपापला 'रोल' सॉलिड ताकदीनं केला आहे. कलाकारांच्या सहज अभिनयामुळे वरच्या सर्व गोष्टींना महत्त्व आहे.... मुळात ऐतिहासिक कथानक असल्यामुळे पाहुण्या कलाकारांचा प्रचंड राबता असतानाही प्रत्येक भूमिकेवर बारीक काम आणि प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसतं. म्हणूनच चित्रपटाच्या श्रेय्यनामांची चढती भाजणी लावताना दुस-या क्रमांकाचा मान हा चित्रपटातल्या कलाकारांकडे जातो.
आणि
७. सुबोध भावे - काय दिसतो सुबोध या सिनेमात... भन्नाट! चित्रपटातला सुबोधनं साकारलेला बालगंधर्व बघत असताना मला पुलंच्या हंड्रेड पर्टेंट पेस्तनकाकांची आठवण आली... 'विष्णुपंत पागनीस म्हणजे सेंट पर्सेंट तुकाराम... खरा तुकाराम बी असा नाय....' हे पेस्तनकाकांचं वाक्य 'सुबोध भावे म्हणजे सेंट पर्सेंट बांलगंधर्व... खरा बालगंधर्व बी असा नाय...' असं नावं बदलून टाकलं, तरी चालेल. कारण पेस्तनकाकांनी खरा तुकाराम आणि आम्ही खरा बालगंधर्व पाहिलेलाच नाही! त्यामुळे यापुढे बालगंधर्वांबाबत काही वाचण्या-ऐकण्यात आलं, तर डोळ्यासमोर सुबोध दिसणार! सेंट पर्सेंट बालगंधर्व...
सुबोधनं अतिशय साध्या पद्धतीनं बालगंधर्वांचं बेअरिंग घेतलं आहे. धोतर-सदरा घातलेला सुबोध आणि भरजारी शालू नेसलेला सुबोध, या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत... त्याच्या अभिनयात कुठेही भडकपणा नाही. (तसा मला तो धोबीपछाड वगळता अन्यत्र कुठेही दिसलेला नाही म्हणा.) लुगडं नेसल्यानंतर थेट बालगंधर्वांच्या शैलीत खांदा किंचित खाली पाडून उभं राहणा-या सुबोधच्या अभिनयातले बारकावे मनाला भावले. सुबोध... चित्रपटाच्या यशाचे मानकरी ठरवताना पहिल्या क्रमांकाचा मान तुलाच द्यायला हवा... तो तुझाच अधिकार आहे...
००००००००००००००००००
हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग आणि आता बालगंधर्व... मनोरंजनाच्या तीन भिन्न क्षेत्रांशी जुळलेले हे तीन छान चित्रपट. नंदू माधव यांचा फाळके, अतुल कुलकर्णीचा गुणा आणि सुबोधचा बालगंधर्व... तुलना होऊच शकत नाही. तीन्ही भूमिका वेगळ्या धाटणीच्या आणि तितक्यात ताकदीने पेललेल्या. आता आपल्या मालकीचा ब्लॉग असल्यामुळे जाता-जाता एक इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. ही बायोग्राफीची मालिका खंडित होऊ नये, असं वाटतंय... आणि पुढला नंबर दादा कोंडकेंचा लागला, तर फारच मजा येईल. एकाद्या निर्मात्या-दिग्दर्शकाच्या मनातही माझ्यासारखीच ही कल्पना घोळत असेल का? असावी, असं मनापासून वाटतंय....

Wednesday 4 May 2011

कोणी बनवेल का हा कीबोर्ड?

बराक ओबामा यांच्या आदेशावरून अमेरिकन सैनिकांनी पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. याची ब्रेकिंग न्यूज देण्याच्या भानगडीत अनेक चॅनल्स आणि खूप देण्याच्या भानगडीत वर्तमानपत्रांचा थोडा गोंधळच झाला. ओबामा आणि ओसामा यांच्या नावातील साधर्म्यामुळे काहींनी ओबामांचाच 'एन्काऊंटर' केला. एव्हाना फेसबुकवर त्याच्या अनेक क्लिप्स आणि फोटो पडले आहेत... त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी खास पत्रकारांकरता एखाद्या कंपनीनं कीबोर्ड तयार करावा, असं वाटतंय. डिझाईनिंगमध्ये कंपनीचा वेळ जाऊ नये, यासाठी मी फोटोशॉपवर डिझाईन तयार केलंय...  इच्छुक कंपन्यांनी कॉपिराईट मिळवण्यासाठी संपर्क साधावा...