Monday, 21 February 2011

भीऊ नका...

स्थळ : मलबार हिल. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान.
पात्रे : उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अन्य मंत्री.
वेळ : अर्थात रात्रीची. निवांत.

उपमुख्यमंत्री (उमं) - काय भिता राव... १५-२० हजार रुपयांची भीक महिन्याच्या महिन्याला घेणारी पोरं ती... त्यांना काय घाबरायचं!
बांधकाम मंत्री (बांमं) - मी कुठं घाबरलोय?
उमं - मग... काल काय म्हणालात... मला तुमची भीती वाटते म्हणून...
बांमं - ते असंच हो... मला कॉमेडी करायची सवय आहे ना... त्याचाच परिणाम.
उमं - यांना खरंतर फटके मारले पाहिजेत. मी मागे म्हणालेलो ते उगीच नाही. पण त्यावरून पण गोंधळ घातला. आता तुम्ही भीती वाटते म्हणाल्यावर तुमच्या मागे लागतील बघा हे लोक...
बांमं - होय की... ते लक्षात नाही आलं माझ्या... फार गोंधळ झाला तर सांगून टाकीन की मी असं बोललोच नव्हतो...
उमं - टीव्हीवर दिसलात तुम्ही तसं बोलताना... आता कसं म्हणणार?
बांमं - बस का धाकटे साहेब... तुम्ही नाही का तेच केलंत. आधी फटके मारा म्हणालात... आपल्या कार्यकर्त्यांनी मारलेदेखील... मग म्हणालात मी असं बोललोच नाही... माफी पण नाही मागितलीत. शेवटी थोरल्या साहेबांना सॉरी म्हणावं लागलं त्या भिकारड्यांना... तुमचा संपलाय... ग्लास भरू का?
उमं - हो.. मी भरतो... आपण आजपर्यंत कोणाची माफी मागितली नाही.. आणि या दिडदमडीच्या लोकांना सॉरी म्हणू काय मी... काकाच म्हणाले, तू गप्प बस मी काय ते बघतो. त्यांनी मस्त गप्प केलं पण त्यांना. सगळे लाईनीवर आले...
बांमं - आता पुन्हा माझ्यामुळे गोंधळ झाला तर बघतील का साहेब?
उमं - माहिती नाही बुवा... विचारावं लागेल. बघुयात काय होतंय ते...
बांमं - तुम्ही पण कमाल केलीत हां साहेब... सरळ सांगून टाकलंत की आपण टगे आहोत म्हणून...
उमं - आहोत तर आहोत...
बांमं - पण निवडणुकीत मतं मागायला जाताना आपण हात जोडून जातो. टग्या कधी हात जोडतो का?
उमं - अरे ते नाटक असतं हो... तुम्हालाही हे माहित्ये... तुमच्या जुन्या पक्षात सगळे टगेच तर होते...
बांमं - हो... पण मतदारांनी सांगितलं की आम्हाला टग्या नको... चांगला नेता पाहिजे. तर?
उमं - कोण भिकार** म्हणतोय असं... फटके मारा रे त्याला.... टग्यांना मतं देत नाही म्हणजे काय? मतदार असला तर घरचा... दंडुक्यानं मारलं पाहिजे *डव्यांना... आण रे दंडूका... एकेकाच्या गां*वर हाणतो... मत देत नाही म्हणजे काय... दिलंच पाहिजे...
बांमं -  (स्वगत) साहेबांना जास्त झाली वाटतं... (प्रकट)  ए... जेवण आण रे... जाऊ दे साहेब... निवडणुकीच्या वेळी बघुयात... तोपर्यंत हे मीडियावाले दंडुका, भीती, टग्या हे सगळं विसरून जातील... त्यांना खोडच आहे ती... नवी बातमी हाती येईपर्यंत पहिलीचा पिच्छा पुरवतात... नवं काही मिळालं की पुढलं पाठ मागचं सपाट... आणि लोकांचं काय... ते तर विसरले पण असतील एव्हाना...
दंडुकेशाही जिंदाबाद.... टगेगिरी जिंदाबाद....

(अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही. हा संवाद संपूर्णतः काल्पनिक असू शकतो...)

Friday, 18 February 2011

ALL THE BEST....

उद्यापासून वर्ल्डकप सुरू होतोय... काय होणार याची उत्कंठा आणि धाकधुक आपल्या मनात आहे. काय होईल ते होवो... पुढला दीड महिना धम्माल असणार, हे नक्की...

BEST OF LUCK TEAM INDIA...

असंच सहज इंटरनेटवर मिळालेलं एक कार्टून आपल्या मनातल्या भावना मांडणारं...

Thursday, 17 February 2011

दोन बातमीदार... टीम एकच की वेगवेगळी?

लेट अस भंकस, डोक्याची मंडई, बातमीदार-सहयोगी बातमीदार हे वृत्तपत्रसृष्टीची काही गुपिते जगजाहीर करणारे जाम प्रसिद्ध झालेले ब्लॉग बंद पडले. पडले की कोणी बंद पाडले, या प्रश्नाची चर्चा पत्रकारांच्या वर्तुळात होतच राहील. यातला डोक्याची मंडई तर कोणी आणि का बंद पाडला, हे जगजाहीर आहे. लेट्स भंकस आणि बातमीदारबाबत मात्र ठोस वृत्त नसलं, तरी काहीतरी मालफंक्शन असल्याचं बोललं जातंय. त्याच वेळी आणखी दोन असेच नवे ब्लॉग पुन्हा एकदा सुरू झालेत.
ब्रेकिंग न्यूज  आणि बातमीदार The Reporter हे दोन ब्लॉग पुन्हा एकदा वृत्तसृष्टीतील गमतीजमती घेऊन सादर झाले आहेत.
यातला दुसरा ब्लॉग हा अधिक काळजीपूर्वक तयार करण्यात आल्याचं दिसतंय. आशिष चांदोरकर या माझ्या मित्रानं या ब्लॉगची सखोल माहिती दिल्यामुळे ते पुन्हा देण्याचं टाळतोय. इच्छुकांनी इथं क्लिक करावं, म्हणजे त्याची माहितीपूर्ण पोस्ट वाचता येईल.
ब्रेकिंग न्यूज हा ब्लॉग मात्र मुंबईतल्याच कोणीतरी, मुंबईतच सुरू केल्याचं त्याच्या रुपावरून दिसतंय. प्रामुख्यानं वाहिन्यांमधील ब्रेकिंगन्यूज इथं असल्यामुळे एखाद्या मराठी वाहिनीत काम करणा-या कोणीतरी हा ब्लॉग सुरू केला असावा, अशीही शक्यता आहे.
माझ्या डोक्यात आलेली आणखी एक शक्यता म्हणजे हे दोन्ही ब्लॉग एकाच व्यक्तीनं (किंवा एकाच गटानं म्हणूयात हवं तर) सुरू केलेले असण्याची शक्यता आहे. एखाद्याबद्दल फारच अवमानकारक लिहायचं असेल आणि कायदेशीर कारवाईचा धोका असेल, तर बातमीदारवर बिनधास्त लिहायचं आणि एखादा हलकाफुलका प्रसंग लिहायचा असेल, तर ब्रेकिंग न्यूजवर जायचं. दोन ब्लॉग एकाच वेळी सुरू असतील, तर बॅकअपही कायम राहातो. काही कारणानं एखादा बंद पडलाच, तर दुसरा आधीपासून अस्तित्वात असलेला आणि वाचला जाणारा ब्लॉग हाती असणं केव्हाही चांगलंय... दोन्ही ब्लॉग बारकाईने पाहिल्यास त्यात काही ठिकाणी साम्य दिसतं तर काही ठिकाणी मुद्दाम घडवून आणलेलं वेगळेपण... मनात शंका येण्याचं हे प्रमुख कारण. आणि दुसरं म्हणजे आजवर एकाच वेळी दोन ब्लॉग्ज सुरू आहेत, असं कधीही घडलेलं नाही. दोन्ही ब्लॉग शैलीदार आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता लिहिले जात आहेत. अशी अनेक कारणं आहेत मनात ही शंका यायला...
ब्लॉग दोन असले तरी टीम एकच आहे की वेगवेगळी?
ते काही असो... दोन्ही ब्लॉग चांगले आहेत आणि बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणा-यांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दोन्ही ब्लॉग्जनी पुढे सुरू ठेवलं आहे. त्यामुळे त्यांचं स्वागतच करायला हवं...