Monday 21 February 2011

भीऊ नका...

स्थळ : मलबार हिल. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान.
पात्रे : उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अन्य मंत्री.
वेळ : अर्थात रात्रीची. निवांत.

उपमुख्यमंत्री (उमं) - काय भिता राव... १५-२० हजार रुपयांची भीक महिन्याच्या महिन्याला घेणारी पोरं ती... त्यांना काय घाबरायचं!
बांधकाम मंत्री (बांमं) - मी कुठं घाबरलोय?
उमं - मग... काल काय म्हणालात... मला तुमची भीती वाटते म्हणून...
बांमं - ते असंच हो... मला कॉमेडी करायची सवय आहे ना... त्याचाच परिणाम.
उमं - यांना खरंतर फटके मारले पाहिजेत. मी मागे म्हणालेलो ते उगीच नाही. पण त्यावरून पण गोंधळ घातला. आता तुम्ही भीती वाटते म्हणाल्यावर तुमच्या मागे लागतील बघा हे लोक...
बांमं - होय की... ते लक्षात नाही आलं माझ्या... फार गोंधळ झाला तर सांगून टाकीन की मी असं बोललोच नव्हतो...
उमं - टीव्हीवर दिसलात तुम्ही तसं बोलताना... आता कसं म्हणणार?
बांमं - बस का धाकटे साहेब... तुम्ही नाही का तेच केलंत. आधी फटके मारा म्हणालात... आपल्या कार्यकर्त्यांनी मारलेदेखील... मग म्हणालात मी असं बोललोच नाही... माफी पण नाही मागितलीत. शेवटी थोरल्या साहेबांना सॉरी म्हणावं लागलं त्या भिकारड्यांना... तुमचा संपलाय... ग्लास भरू का?
उमं - हो.. मी भरतो... आपण आजपर्यंत कोणाची माफी मागितली नाही.. आणि या दिडदमडीच्या लोकांना सॉरी म्हणू काय मी... काकाच म्हणाले, तू गप्प बस मी काय ते बघतो. त्यांनी मस्त गप्प केलं पण त्यांना. सगळे लाईनीवर आले...
बांमं - आता पुन्हा माझ्यामुळे गोंधळ झाला तर बघतील का साहेब?
उमं - माहिती नाही बुवा... विचारावं लागेल. बघुयात काय होतंय ते...
बांमं - तुम्ही पण कमाल केलीत हां साहेब... सरळ सांगून टाकलंत की आपण टगे आहोत म्हणून...
उमं - आहोत तर आहोत...
बांमं - पण निवडणुकीत मतं मागायला जाताना आपण हात जोडून जातो. टग्या कधी हात जोडतो का?
उमं - अरे ते नाटक असतं हो... तुम्हालाही हे माहित्ये... तुमच्या जुन्या पक्षात सगळे टगेच तर होते...
बांमं - हो... पण मतदारांनी सांगितलं की आम्हाला टग्या नको... चांगला नेता पाहिजे. तर?
उमं - कोण भिकार** म्हणतोय असं... फटके मारा रे त्याला.... टग्यांना मतं देत नाही म्हणजे काय? मतदार असला तर घरचा... दंडुक्यानं मारलं पाहिजे *डव्यांना... आण रे दंडूका... एकेकाच्या गां*वर हाणतो... मत देत नाही म्हणजे काय... दिलंच पाहिजे...
बांमं -  (स्वगत) साहेबांना जास्त झाली वाटतं... (प्रकट)  ए... जेवण आण रे... जाऊ दे साहेब... निवडणुकीच्या वेळी बघुयात... तोपर्यंत हे मीडियावाले दंडुका, भीती, टग्या हे सगळं विसरून जातील... त्यांना खोडच आहे ती... नवी बातमी हाती येईपर्यंत पहिलीचा पिच्छा पुरवतात... नवं काही मिळालं की पुढलं पाठ मागचं सपाट... आणि लोकांचं काय... ते तर विसरले पण असतील एव्हाना...
दंडुकेशाही जिंदाबाद.... टगेगिरी जिंदाबाद....

(अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही. हा संवाद संपूर्णतः काल्पनिक असू शकतो...)

1 comment:

डॉ. प्रकाश देव said...

Good communication. I like it. Please also access recent article on my blog:http://prakashwata.blogspot.com/2011/02/immortals-of-melhua.html.