Wednesday 22 September 2010

मॅच्युरिटीची लिटमस टेस्ट...

परवा, २४ तारखेला दुपारी साडेतीन नंतर आपल्या देशाची वार्षिक परिक्षा आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूबाबत गेली ६० वर्षे सुरू असलेल्या खटल्याचे निकालवाचन सुरू होण्याची ही वेळ असेल. यावेळी आपला देश आणि अर्थातच राजकारण्यांच्या परिपक्वतेची लिटमस चाचणी होणार आहे.
- गेल्या ६० वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खटला दाखल झाल्यानंतर बाबरी वादावरून अनेक दंगलीही झाल्या. याचा कळस गाठला १९९२ सालाने... कारसेवेच्या नावाखाली बाबरी मशिद (किंवा ढाचा!) उध्वस्त केली गेल्यानंतर देशभरात दंगली झाल्या... त्यात हजारो हिंदू आणि मुस्लिमांचे शिरकाण केले गेले. लोकांना शांत करण्याऐवजी डोकी भडकविण्याची कामं दोन्ही धर्मांच्या धुरिणांनी (आणि काही राजकीय नेत्यांनीही) केली. या दंगलींना 'उत्तर' म्हणून मुंबईत १२ मार्च रोजी दाऊद इब्राहिम पुरस्कृत स्फोटमालिका घडल्याचे मानले जाते. पहिल्या चाचणी परिक्षेत आपण नापास झालो होतो...
- २००२ साली अशीच एक कारसेवा अयोध्येत केली गेली. त्यासाठी देशभरातून विहिंपचे शेकडो कार्यकर्ते गेले होते. गुजरातमधील कारसेवकांचा डबा गोध्रा स्थानकात पेटवून देण्यात आला. यात सुमारे ६० जण (यातील बहुतांश विहिंपचे कार्यकर्ते होते) मारले गेले. त्यानंतर जातीय दंगलींमध्ये गुजरात भाजून निघाला... १ ते २ हजार लोकांचा बळी या दंगलींनी घेतला. गुजरातच्या मोदी सरकारच्या आशिर्वादानेच या दंगली घडविल्याचा आरोप आजही केला जात असून या प्रकरणातले अनेक खटले प्रलंबित आहेत... ही सहामाही परिक्षा मानली तर त्यातही आपण सपशेल आपटी खाल्ली होती... एकही विषय असा नव्हता की ज्यात आपल्याला ३५ टक्के देता यावेत...
- २००५ साली अयोध्येतील वादग्रस्त स्थळी अतिरेकी हल्ला झाला. यावेळी सुरक्षा दलांनी पाच इस्लामी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं... यावेळी देशात कोणतीही भडक प्रतिक्रीया उमटली नाही... दुसरी चाचणी (नऊमही) परिक्षेचा गड यावेळी आपण सर केला. हिंसा भडकविण्यासाठी हा हल्ला केल्याचं मानलं जात असलं तरी अशी कोणतीही प्रतिक्रीया उमटली नाही.
- २६/११ला झालेल्या प्रिलिम परिक्षेत मात्र आपण उत्तम गुण मिळविले आहेत. मुंबईवर झालेला भयानक हल्ला... यावेळी सगळा देश एकजूट असल्याचे चित्र हायला मिळाले. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानने आपल्यावर लादलेले युद्ध आहे, अशी भावना हिंदूंबरोबरच मुस्लिम धर्मियांचीही होती. कसाब वगळता मारल्या गेलेल्या ९ अतिरेक्यांवर अंत्यसंस्कार करण्यास किंवा त्यांना भारताच्या मातीत चिरनिद्रा देण्यास मुस्लिम समुदायाने कडवा विरोध केला. या घटनांमुळे आपण पूर्वीपेक्षा अधिक मॅच्युअर झाल्याची झलक बघायला मिळाली.
- २४ सप्टेंबर रोजी आपली वार्षिक परिक्षा आहे. आत्तापर्यंत आपण दाखविलेली प्रगती आपण कायम ठेवणार की पुन्हा आपली गुणांची पाटी कोरी होणार, हे या दिवशी ठरेल. वातावरणात तणाव आहे... किंबहुना हा कृत्रिम तणाव उत्पन्न केला गेला आहे. उत्तर प्रदेशात निमलष्करी दले मागविणे, विविध पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंच्या भेटी घेणे, सतत शांतता राखण्याचे आवाहन करणे या गोष्टींमुळे वातावरणनिर्मिती झाली आहे.
निकाल काहीही लागला तरी कोणीतरी आनंदी होणार आणि कोणीतरी संतापणार हे निश्चित आहे. दोन्ही बाजूंना मान्य होईल, असा निकाल येण्याची शक्यता फारच अंधुक आहे. एकवेळ दोन्ही पक्ष नाराज होतील, अशी स्थिती येऊ शकते. पण win-win situation असणं जवळजवळ अशक्यच... हा निकाल हायकोर्टाचा असल्यामुळे नाराज झालेल्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग निश्चित खुला आहे. दोन्ही बाजूंकडून तसं बोलूनही दाखवलं गेलंय... सर्वांनीच लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय आणि केंद्र व सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्याचं स्पष्ट केलंय...
मात्र त्या दिवशी प्रत्यक्षात काय घडतं, यावर आपल्या परिपक्वतेची पातळी मापली जाणार आहे. ही अंतिम परिक्षा आपण पास होऊ ही अपेक्षा आहे. या महत्त्वाच्या परिक्षेसाठी देशाला आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक नेत्यांना आणि सर्व राजकीय पक्ष आणि सरकारांना हार्दिक शुभेच्छा...

4 comments:

Anonymous said...

छान लिहल आहे तुम्ही....खरच खुप मोठी परीक्षा आहे ही, पाहुया काय होते ते...

अमोल केळकर said...

खरच छान लिहिले आहे आपण

अमोल केळकर

Unknown said...

Lekh chan zala aahe..kharach pariksha aahe aapalya deshachi..

sanket said...

छान लिहीलयं. ही परिक्षाच आहे.. बघूया काय निकाल लागतो.