Wednesday, 14 April 2010

एक शोध ‘देवा’चाही...!

(दै. लोकमतच्या रविवार दि. ५ एप्रिलच्या 'मंथन' पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा माझा लेख ब्लॉगवाचकांसाठी पुन्हा...)

विश्वाची निर्मिती कशी झाली.... अनादी काळापासून किंवा असे म्हणुयात की मानवाला ‘समज’ आल्यापासून छळणारा हा प्रश्न... विज्ञान सिद्धांतांच्या आधारे तर धर्ममार्तंड ग्रंथांच्या आधारे त्याची उत्तरे देत असतात. ‘सर्न’मध्ये झालेल्या महाप्रयोगामुळे हे ब्रह्मांड घडविणा-या ‘देवा’चा शोध शास्त्रज्ञांना लागेल का? प्रयोगाच्या इतक्या प्राथमिक अवस्थेत या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे नाही... पण कल्पनेला थोडा ताण दिला आणि आपली ‘देवा’ची व्याख्या व्यापक केली, तर हे उत्तर मिळूही शकते...
-------------------------------
‘सर्न’मधील प्रयोगात विश्वाच्या या उत्पत्तीचे रहस्य शास्त्रज्ञांना उलगलेड काय? या आदीम प्रश्नाचे उत्तर या प्रयोगातून मिळू शकेल, असे अनेकांना वाटते आहे. ते सिद्ध करण्याचे दोन प्रकार असू शकतात... एक म्हणजे थिअरॉटिकल आणि दुसरा प्रॅक्टिकल... थिअरॉटिकली बिग बँग सिद्ध करण्यासाठी गणिताचा आधार घेतला जाईल आणि तो विषय फारच क्लिष्ट असेल. दुसरा मार्ग असेल तो प्रॅक्टिकल... या प्रयोगातून हाती आलेल्या गोष्टी तपासून... पण आजवर कोणीच “विश्व’ निर्माण केलेले नसल्यामुळे हाती आलेल्या गोष्टी बरोबर आहेत, हे तपासणार तरी कसे...
प्रयोगातून काय साध्य होऊ शकते?
अध्यात्मिक किंवा गणिती प्रश्नही बाजुला ठेऊन भौतिक जगाचा विचार केला खरेतर या प्रयोगातून शास्त्रज्ञांच्या हातात मोठा खजिना लागू शकतो. विश्वाची निर्मिती कशी झाली... यापेक्षा एका बिंदुतून निर्माण झालेल्या या विश्वातील सूर्य नावाच्या ता-याचा तिसरा ग्रह वाचविता येईल का, याचे उत्तर मिळू शकते... सध्याचा सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे अर्थातच ‘ग्लोबल वॉर्मिंग...’ या ग्लोबल वॉर्मिंगवर कायमचा इलाज शास्त्रज्ञांना मिळू शकतो... अणुपेक्षाही हजारो पट अधिक उर्जा देणारी... कोणताही कचरा मागे न सोडणारी... कुठल्याही प्रकारचे प्रदुषण न करणारी... अर्थात हे इतक्यात साध्य होणार नाही. त्यासाठी अनेक वर्षेही जावी लागतील कदाचित. पण खरोखर ही वस्तू पुढेमागे तयार करता आली आणि मुख्य म्हणजे ती साठवून ठेवणे शक्य झाले तर संबंध पृथ्वीचा उर्जेचा प्रश्न चुटकीसरशी निकालात निघू शकेल... ती वस्तू म्हणजे अँटीमॅटर...
अँटीमॅटर काय आहे?
आपण पाहतो ते विश्व पदार्थाचे किंवा मॅटरचे बनलेले आहे. पदार्थाच्या अणूंमध्ये मध्यभागी असलेला प्रोटॉन हा धन विद्युतभारीत (possitive) असतो तर त्याभोवती ऋण विद्युतभार असलेले इलेक्टॉन्स फिरत असतात... मात्र हेच जर उलट असेल, म्हणजे ऋण विद्युतभार केंद्रस्थानी आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स (शास्त्रीय भाषेत पॉझिट्रॉन्स) धन विद्युतभारीत असतील तर त्याला वैज्ञानिक भाषेत प्रतिपदार्थ किंवा अँटीमॅटर म्हणतात... गणिताचा आधार घेऊन शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की मॅटर आणि अँटीमॅटर संपर्कात येताच एकमेकांचा नाश करतील... याला ‘एनिहिलेशन' म्हणतात. हा निव्वळ उर्जेचा उत्तम स्त्रोत... एकवेळ अँटीमॅटर तयार झाला तरी तो साठवून ठेवणे अशक्यच आहे... कारण या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट, अगदी हवादेखील मॅटरची बनलेली आहे. त्यामुळे हा अँटीमॅटर ठेवणार कुठे आणि कशात? या प्रश्वाचे उत्तर संशोधकांवर सोपवणेच योग्य होईल... राहता राहिला प्रश्न ‘सर्न’मधील प्रयोगातून देवाचा शोध लागू शकेल का...? या मुळ प्रश्नाला बगल देऊन अँटीमॅटरचं पुराण लावायचं कारण इतकंच की जरी साठवून ठेवता आला नाही, तरी अँटीमॅटर असतो... तो असू शकतो... ही गोष्टच देवाच्या अस्तित्वाला सप्रमाण सिद्ध करणारी ठरेल... हे विधान बहुदा खुळचटपणाचं किंवा नास्तिकतेचं वाटेल... या विधानाचा तर्कसंगत विचार करायचा तर आधी विश्वाच्या निर्मितीबद्दल धर्म काय सांगतो, ते बघायला हवे...
ब्रह्मांडाची निर्मिती... धर्मग्रंथ काय सांगतात?
वैज्ञानिक मानतात की, विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली. हिच ती ‘बिग बँग थिअरी.’ एक बिंदू होता... या बिंदूला ‘हिग्ज बोसन’ किंवा ‘देवाचा कण (God’s Particle)’ असे नाव दिले गेले आहे. त्याचा महास्फोट झाला आणि त्यातून हे ब्रह्मांड घडले, असे विज्ञान मानते... महदाश्चर्याची गोष्ट म्हणजे ही थिअरी सर्वप्रथम मांडली बेल्जियममधील एका ख्रिश्चन धर्मगुरूने... फादर जॉर्जेस लेमिटर यांनी... त्यानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडविन हबल याने गणिताच्या आधारे या बिग बँग थिअरीला बळकटी दिली. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबलमधील विश्वाच्या निर्मितीचे वर्णन आहे... देव म्हणाला प्रकाश होऊ दे... आणि प्रकाश झाला... हिंदू वेद-पुराणे सांगतात की एका बिंदूतुन ब्रह्माने हे विश्व जन्माला घातले... हीदेखील एक प्रकारे ‘बिग बँग थिअरी’च... जगातील सर्व धर्म सांगतात की देवाने जग निर्माण करताना नेहमी ‘समानता’ (symmetry) साधली आहे. प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती... देवदूत आणि सैतान... सज्जन आणि दुर्जन... विश्वाच्या निर्मितीतमधील ही सिमेट्री विज्ञानालाही मान्य आहे... प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली हा या सिमेट्री-थिअरीचा सर्वात मोठा भोक्ता होता, यात सर्वकाही आलेच... आता या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा आपल्या अँटीमॅटरकडे पाहिले तर काय दिसते?
अँटीमॅटर आणि सिमेट्री...?
जर शास्त्रज्ञांना जिनिव्हातील या महाप्रयोगातून अँटीमॅटर तयार झाल्याचे दिसले, तर विश्वाच्या निर्मितीतील ही सिमेट्री आपोआप सिद्ध होणार आहे. अँटीमॅटरचा उर्जेसाठी वापर, ग्लोबल वॉर्मिंग कमी करायला त्याची होऊ शकणारी मदत... इत्यादी भौतिक गोष्टी बाजुला ठेऊनही विश्वाची निर्मिती करताना निसर्गाने सिमेट्री बिघडविलेली नाही... हे सप्रमाण सिद्ध होऊ शकेल... जसा प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... तसाच हा मॅटर आणि अँटीमॅटर... हे सिमेट्री-बिमेट्री ठिक आहे... पण ‘देवाचा शोध’ कसा लागेल... हाच प्रश्न पडला असेल ना?
जिनिव्हाच्या ‘हायड्रॉन कोलायडर’मधील ‘देव...?’
देव म्हणजे दगडाची मूर्ती... देव म्हणजे पंचमहाभूते... देव म्हणजे निसर्ग... देव म्हणजे आपले मन... या सगळ्या रुढ कल्पना बाजूला ठेवल्या आणि देव म्हणजे एक शक्ती आहे, असे मानले तर... विज्ञानाची मोठी झेप घेणा-या माणसाची नजर ‘ब्रह्मांड संपते’ तिथपर्यंत अजूनही पोहोचू शकलेली नाही... ‘असे हे ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती म्हणजे देव...’ अशी जर देवाची व्यापक व्याख्या केली, तर ‘सर्न’ या केवळ विज्ञान आणि विज्ञानालाच वाहिलेल्या... देवाचे नाव जिथे घेतले जात नाही अशा अत्याधुनिक प्रयोगशाळेतील एका २७ किलोमीटर लांब नळीतून शास्त्रज्ञांना या देवाचा ‘साक्षात्कार’ होणे अवघड नाही...!

Sunday, 28 March 2010

वड्डा शाणा छे नरेनभाई...!

काल दिवसभर नरेंद्र मोदींची चौकशी सुरू होती... गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींमध्ये गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत काँग्रेसच्या खासदाराची हत्या झाली होती... या प्रकरणी सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने, अर्थात एसआयटीने ही चौकशी केली... इत्यादी... इत्यादी... दिवसभर हेच सगळ्या चॅनलवर सुरू होतं... आज रविवार असल्याने बहुदा हेच दिवसभर चालणार... पेपरमध्ये सकाळी उठल्यावर हेच वाचणार आहोत आपण सगळे, त्यामुळे खोलात जात नाही...
आत्ता रात्रीचे २ वाजतायत. मोदींची चौकशी संपून तासभरच झालाय. पण त्याबद्दल प्रकार्षानं काही गोष्टी वाटल्या, म्हणून लगेच लिहायला बसलो...
नरेंद्र मोदींची चौकशी होणार... दंगल प्रकरणी चौकशी होणार... ही बोंबाबोंब गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खरंतर या एसआयटीनं मोदींना २१ तारखेला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यावेळी ते तिथे गेलेच नाहीत. उलट त्यांनी जाहीर पत्र लिहिण्याचा घाट घातला... त्यामुळे मोदी चौकशीला घाबरतात, अशी आरोळी दिली गेली. बरं त्यांनी लिहिलेलं पत्रही खास होतं, वैगरे नाही. साधंच... म्हणजे कायदा सगळ्यांना सारखा आहे... कायद्याचा मी मान राखतो इत्यादी...
काल मात्र त्यांनी तब्बल नऊ-साडेनऊ तास चौकशीत विचारलेल्या ६०-७० प्रश्नांची उत्तरं अधिका-यांना दिलीच. याचा अर्थ ते चौकशीला घाबरतात ही भिती अनाठायी होती, असा घ्यायचा का? पण या कृतीने त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत...
पहिला पक्षी : २१ तारखेची चौकशी टाळून त्यांनी आपणहूनच घाबरत असल्याचा देखावा उभा केला. जेणेकरून जेव्हा चौकशी होईल, त्यावेळी तिला वलय प्राप्त व्हावं आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं.
दुसरा पक्षी : एका मुख्यमंत्र्याला तुम्हाला हवं त्यावेळी चौकशीला बोलावू शकत नाही, हे त्यांनी एसआयटीला दाखवून दिलं. एसआयटी जरी सुप्रिम कोर्टानं नेमली असली तरी तिने दिलेली तारीख पाळायला ते कोर्ट नाही, हे त्यांनी जाताजाता अधोरेखित करून टाकलं.
पक्षी तिसरा : त्यांना व्हिलन बनवण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांना त्यांनी तशी पार्श्वभूमी तयार करू दिली. कारण त्यांना त्या काळ्या रंगावर स्वतःचा (म्हणजे त्यांच्या मते.... ते स्वच्छ आहेत, असं मला म्हणायचं नाही.) पांढरा रंग लख्ख उठून दिसावा...
पक्षी चौथा : इतकी मिडीया-हाईप झाल्यावर आजच चौकशी संपवायची आहे, असं सांगून तमाम हिंदी-इंग्रजी चॅनलवाल्यांना रात्री १ वाजताचं बुलेटीन लाईव्ह करायला लावलं...
स्वतःबद्दल कुतूहल निर्माण केल्यानंतर काल दोन्ही वेळा उत्तरे देऊन बाहेर पडताना ते हसतमुखाने मिडियाला सामोरे गेले... पुन्हा त्यांनी मिडियाला काही माहिती पुरवली का.... तर नाहीच! हे सुप्रिम कोर्टाचं पथक असल्यामुळे ते त्यांची माहिती कोर्टाला देतील, मला ती देण्याचा अधिकार नाही, असं सांगत त्यांनी अन्यच मुद्द्यांवर भाषणबाजी केली.
गुजरात दंगली सरकार पुरस्कृत आहेत किंवा नाही, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल पुरस्कृत (किंवा गोघ्राकांडामुळे ते भडकून उठले, असं म्हणा हवं तर) होत्या, हे मानायला जागा आहेच. संघाच्या मुशित तयार झालेले नरेंद्र मोदी प्रत्यक्षात जरी दंगलीत दगड मारत नसतील, तरी त्यांना या काळात काय घडतंय, ते माहितीच नव्हतं, असं म्हणणं भोळसटपणाचंच ठरेल. कारण एकतर मुख्यमंत्री आणि जे दंगली करत होते, त्यांना अधिक जवळ... त्यामुळे माहितीचे स्त्रोत अधिक असणारच! पण या चौकशीतून काय निष्पन्न होणार? मोदींइतका मुरलेला राजकारणी स्वतःलाच अडचणीत आणणा-या गोष्टी एसआयटीला सांगेलच, याची शाश्वती कोणी द्यायची? त्यामुळे मोदींनी स्वतःहून स्वतःभोवती वलय निर्माण करून कालच्या चौकशीचा आणखी मोठा फार्स घडवून आणला (कर्टसी - मिडिया) हेच यातील सत्य असावं, असं वाटतंय...
स्वतःविरुद्ध पडलेला एखादा फासा डाव जिंकण्यासाठी कसा वापरावा, याचं उत्तम उदाहरण मोदींनी या निमित्तानं देशातील मी-मी म्हणणा-या तमाम नेत्यांना घालून दिलं आहे, हे मात्र खरं... स्वतःच्या विरोधात मोठ्ठी हवा निर्माण करायची आणि हवा एकदा पुरेशी वाहू लागली की त्यात पतंग उडवून मौज लुटायची... ही मोदींची खेळी 'चोक्कस'च म्हणाली लागेल...
'तमे वड्डा शाणा छे.... नरेनभाई!'

Saturday, 20 March 2010

माया मेमसाब...!

मायावतींचं एक बरं आहे... स्वतःचे मोठ्ठेच्या मोठ्ठे पुतळे स्वतःच उभारायचे... स्वतःला नोटांचे हार घालून घ्यायचे... आणि त्यावर कोण बोललं की 'दलित की बेटी' मोठी झालेली यांना चालत नाही, असं म्हणत गळा काढायचा...

हे म्हणजे मुंबईत राहणा-या झोपडपट्टीतल्या लोकांसारखंच आहे. रहायचं झोपडीत. आत टीव्ही, डिश टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, फ्रीज, एअर कुलर असं सगळं असतं. मग ती झोपडी पाडायला कोणी गेलं की 'बेघर केलं' असं म्हणत बोंब ठोकायची...
मायावती यापेक्षाही एक पाऊल पुढे गेल्यात. फक्त बेघर केलं असं म्हणून त्यांचं भागत नाही. बाबासाहेबांचं नाव घेत दलितला बेघर केलं, असं म्हणून सहानुभूती मिळवायची, असला हा त्यांचा उद्योग... त्या दलित घरातल्या आहेत, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आल्या असू शकतात वैगरे... सगळं मान्य.... पण जर तसं असेल तर त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी काय केलं, ते जगासमोर यायला नको का? दलित घरातून येऊन देशातल्या सगळ्यात मोठ्ठ्या राज्याचा मुख्यमंत्री झालेली ही बाई... तिनं स्वतःचे पुतळे उभे करण्यापेक्षा उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात खेडोपाडी शाळा काढल्या असत्या तर त्या गावातल्या दलित जनतेनेच त्यांचे पुतळे उभारले असते. त्यासाठी राज्य सरकारच्या किंवा गेलाबाजार पक्षाच्या तिजोरीत हात घालायची गरजच पडली नसती. पण काशिराम (सॉरी... मा. कांशिराम) यांच्या पुतळ्याजवळ स्वतःचा फूल साईज पुतळे त्यांनी स्वखर्चाने (?) उभारले.... यात जनतेचं त्यांनी काय आणि कसं भलं केलं, हे त्याही सांगू शकणार नाहीत.
पुतळ्यांचा प्रश्व अजून मिटलेला नाही. केंद्र सरकारने त्याच्या खर्चाचा तपशील शोधण्याचे आदे दिलेत. न्यायसंस्थेनंही या उधळपट्टीवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. हे संपत नाही तोच मायावतींनी बसपाच्या मेळाव्यात १००० रुपयांच्या नोटांचा हार स्वतःच्या गळ्यात घालून घेतला. कहर म्हणजे त्यावर चहूबाजूनी झोड उठल्यावरही दुस-या दिवशी आणखी एक हार घालून घेतला. आणि या कहराचा कहर म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जाहीरच करून टाकलं, 'बहेनजी जिथे जिथे जेव्हा केव्हा जातील, तिथे त्यांना नोटांचाच हार घालू...!' आता झोपडीत राहणा-या (म्हणजे खरोखरच्या... टीव्ही-फ्रीजवाल्या झोपडीत नव्हे) रंजल्या-गांजलेल्या दलिताचं मायावतींनी नोटांचे हारच हार घालून कसं भलं होणार? येता जाता बाबासाहेब-महात्मा फुल्यांचं नाव घ्यायचं आणि त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्याऐवजी विमानातून शॉर्टकट मारायचा... हे कसलं नेतृत्व.... हे कुठले नेते... यांना कोण निवडून देतं... का निवडून देतं... निवडून दिल्यानंतर 'तुम्ही असं का केलंत' हे विचारण्याचा अधिकार जनतेला नाही का... की तिने मुकाटपणे पुढली पाच वर्षं असली थेरं बघत बसायची...
मायावतींचं हार प्रकरण म्हणजे आपल्या देशाचं राजकारण किती हीन दर्जाला जाऊन पोहोचलंय, त्याचं जातिवंत आणि ताजं उदाहरण आहे.
मायावतींच्या पक्षाचे नेते सांगतात की हारासाठी लागलेला पैसा जनतेकडून गोळा केलाय... उत्तर प्रदेशातल्या जनतेकडे जर इतका पैसा असेल तर मग महागाईच्या नावाने गळा काढायचा अधिकार कोणाला उरतो... ना जनतेला, ना नेत्यांना...
यापेक्षा १० पट मोठी पोस्ट लिहिली तरी कमीच पडेल आणि इतकं लिहून मनातला संताप कमी होईल याची शक्यता नाहीच... किती लिहिणार आणि का लिहायचं, असा विचार करून इथेच थांबावं, हे बरं...

Thursday, 4 March 2010

एका सस्पेन्सची अखेर...!


प्रमोद महाजन यांचा मारेकरी प्रवीण याचा अखेर अंत झाला... काही जण म्हणतात 'पापाचं प्रायश्चित्त मिळालं...,' काही जण म्हणतात 'बरं झालं गेला एकदाचा...,' पण प्रवीणच्या अकाली मृत्यूमुळे एका सस्पेन्सची अखेर झालीय, हे मात्र खरं...
प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडणारा... त्यानंतर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होणारा... आणि त्यानंतर कोर्टात 'नॉट गिल्टी' असं सांगणारा... खालच्या कोर्टानं जन्मठेप ठोठावल्यावर वरच्या कोर्टात अपिल करणारा... प्रमोद महाजन यांच्यासोबतचे प्रसंग 'माझी डायरी'च्या रुपानं शब्दांत मांडणारा... अशी प्रवीणची अनेक रुपं. त्यानं आपल्या 'डायरी'त प्रमोदला हिरो-टर्न-व्हिलन असं रंगवलंय. प्रमोद महाजनांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि संघटन कौशल्याबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही 'प्रवीणनं जे लिहिलंय ते धादांत खोटं आहे...' असं म्हणवत नाही. कारण प्रमोद महाजनांचं आयुष्यही तितकंच गूढ होतं. प्रवीणनं प्रमोदजींमध्ये बदल होण्याचं खापर विवेक मैत्रा याच्या माथी फोडलंय... राहूलबद्दल प्रवीणनं प्रमानं लिहिलंय... राहूललाही विवेकनंच बहकवलं, असा काहीसा प्रवीणच्या लेखनाचा सूर आहे. स्वयंसेवक प्रमोद आणि राजकारणी प्रमोद यांच्यातला फरक प्रवीणनं मांडलाय. त्यांची घरात चालणारी दादागिरी काहीशी भडक असली तरी त्यातला १० टक्के अंश खरा मानायला हरकत नाही.
प्रमोदजींची हत्या झाल्यापासून 'प्रवीणनं हे कृत्य का केलं...?' याची चर्चा होत राहिली. कोर्टात आणि बाहेरही प्रवीण सतत म्हणत आलाय की, त्याचं कारण तुम्हाला कधीही समजणार नाही... म्हणजे दिसतं तितकं साधं कारण नाही, हे प्रवीणनं अप्रत्यक्षपणे सुचित केलंय. या हत्येमागे घरगुती कारण असेल का? की प्रवीण प्रमोदजींचा करत असलेला अत्यंतिक द्वेष, हे कारण असेल...? की यात काही राजकीय धागे गुंतले आहेत? याचं उत्तर दोनच व्यक्ती देऊ शकत होत्या. एकतर स्वतः प्रमोदजी किंवा प्रवीण... आता हे दोघंही नाहीत.
प्रमोदजींच्या अल्प पण दैदिप्यमान आयुष्याची अखेर कशामुळे झाली, या सस्पेन्सचा शेवट झालाय... 'हा सस्पेन्स तुम्हाला कधीच कळणार नाही,' असं म्हणत सस्पेन्स वाढवणारा प्रवीणच आता इतिहासजमा झालाय...

Wednesday, 24 February 2010

जहॉंपना... तुसी ग्रेट हो..!

एकदिवसीय सामन्यात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच २०० धावा ठोकण्याचा पराक्रम दुसरं कोण करू शकणार होतं...
'मला वाटलं ते...!'कडून आणि या ब्लॉगच्या वाचकांकडून सचिन रमेश तेंडूलकरला शतशः मनःपूर्वक धन्यवाद...
(attn. ऍनॉनिमस : मला धन्यवादच म्हणायचं आहे... उगाच चुक काढू नये. अभिनंदन करण्याची आपली कोणाचीच योग्यता नाही. आपली एक संध्याकाळ धन्य केल्याबद्दल सचिनचे आभारच मानायला हवेत...)

Monday, 22 February 2010

ए.सी. संस्कृतीचा बुरूज सर...?

किल्ला राखायचा कुणी... किल्ल्याच्या मालकाला प्रश्न. ज्या कष्टानं 'कमळगड' उभारला, जोपासला, तब्बल ६ वर्षं राजधानी म्हणून जो किल्ला देशभर मिरवला... त्याचे बुरूज बेढब झाले होते... त्यांची डागडुजी आवश्यक होती. इतकी वर्षं किल्लेदार असलेल्यांना ते काही जमलं नाही... करायचं काय? मालकाला चिंता... शेवटी पांढ-या मिशीत हसून मालकानं काही निर्णय घेतला आणि तो अमलात आणला...
किल्ल्यात अनेक वर्षं काढलेल्या एका भरभक्कम मानक-याची नेमणूक 'किल्लेदार' म्हणून केली आणि किल्ल्याची डागडुजी करण्याची, त्याला चांगलं रूप देण्याची अशक्यप्राय जबाबदारी सोपवली... या किल्लेदाराला यापुढे आपण सोयीसाठी 'गडकरी' म्हणूयात...
तर... या 'गडकरीं'पुढचं आव्हान कठीण... किल्ल्याची डागडुजी करायची, रंगरंगोटी करायची हे काम वाचून वाटतं तितकं सोपं नाहीये... कारण या 'गडकरीं'च्या बरोबरचे जे लढवय्ये आहेत, त्यांना ए.सी. छावण्यांमध्ये झोपायची सवय लागलीये... प्रत्येक जण आपला आपापला बुरूज सांभाळण्यात व्यस्त... एकानं आपल्या बुरूजाला भगवा रंग दिलेला... दुस-यानं निळा... तिस-यानं लाल.... त्यामुळे एकूण किल्ल्याचं रुप विदुषकासारखं झालेलं... 'गडकरी'चं पहिलं काम होतं या सगळ्यांची तोंड एकमेकांकडे फिरवण्याचं... मालकांनी दिलेली असाईनमेंटच होती ती... झालं 'गडकरी' कामाला लागले...
किल्ल्यावरचे सगळे मानकरी-कामगार-सैनिक वर्षातून एकदा किल्ल्यावरच्या जत्रेसाठी एकत्र येत... 'गडकरी'नं ही संधी साधायचं ठरवलं... जत्रेच्या ठिकाणी त्यांनी सगळे एकाच रंगात रंगवलेले, एकसारखे दिसणारे तंबू उभारले... दरबारातले सगळे मानकरी एकाच पातळीचे आहेत, हे दाखवण्यासाठी... हा पहिला प्रयत्न... पण तो फसला! कारण दिवसभर दुस-या किल्ल्यावर आणि किल्लेदारांवर तोंडसूख घेऊन झालं की आपापल्या ए.सी. छावणीत झोपायला जायचं, हे प्रत्येकानंच ठरवलेलं. (ए.सी.ची सवय झाली होती. काय करणार?)
प्रयोग दुसरा. आपल्या भाषणात गडकरीनी सगळ्या मानक-यांना फैलावर घेतलं... बुरूजांच्या वेगवेगळ्या रंगांवर टीका केली... ए.सी.ला चटावलेल्या मानक-यांचे वाभाडे काढले... लोक किल्ल्याबद्दल जे बोलतात, ते मालकाला आवडत नाही, हे सांगितलं... सामान्य सैनिक आणि कर्मचा-यांशी संबंध वाढवायला सांगितलं... कायम घोडागाड्यांमध्ये फिरणा-यांना पायी जायला सांगितलं... एक ना अनेक...
'गडकरी'चं भाषण झालं... सगळ्या मानक-यांनी ऐकून घेतलं... सैनिकांनी-कामगारांनी टाळ्या वाजवल्या...
एकीच्या आणाभाका झाल्या... दुस-या किल्ल्यातल्या लोकांना नावं ठेऊन झाली... जत्रा संपली... सगळे मानकरी आपल्या ए.सी. बुरूजांकडे परतले... जाताना सगळे जण गालातल्या गालात हसत होते...!!!

Wednesday, 10 February 2010

माय नेम ईज 'वाद...'

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू असावेत की नाही... यावरून पेटलेल्या वादानं शिवसेना आणि शाहरूख खानमध्ये सध्या चांगलीच जुंपलीय... शाहरूखचं म्हणणं असं की खेळात राजकारण आणू नये आणि शिवसेनेचे म्हणणं असं की मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तानशी संबंध तोडायचे म्हंटल्यावर भारतातल्या अलिकडच्या काळातल्या मोठ्या स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये त्यांच्या खेळाडूंना येऊच देऊ नये...
खरंतर या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा हवाला दिला, तर शाहरूख बरोबर आणि 'राष्ट्रप्रेमा'ची कसोटी लावली तर शिवसेना १०० टक्के बरोबर...
शाहरूखचं म्हणणं वरवर खरं दिसत असलं तरी तो स्वतः कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे... त्यानं लिलावानंतर पोपटपंची करण्यापेक्षा त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना का घेतलं नाही? त्यानं एखादा खेळाडू घेतला असता आणि मग त्याला शिवसेनेनं विरोध केला असता, तर शाहरूखकडे एकतरी हुकमाचा पत्ता असता... पण त्यानं 'लोका सांगे ब्रह्मज्ञान...' या उक्तीला स्मरून नंतर बडबड करणं पसंत केलं... का? अहो, कारण सरळ आहे... त्याचा 'माय नेम ईज खान' येऊ घातलाय... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा सोनेरी मुलामा देऊन थोडा पाकधार्जिणेपणा दाखवला तर सिनेमाच्या प्रमोशनला मदत नाही का होणार???? इतका साधा-सरळ हिशोब आहे... त्यात शिवसेना-भाजप किंवा आणखी कोणी विरोध केलाच तर उत्तमच... अन्यथा सिनेमाची इतकी फुटक पब्लिसिटी कशी होणार?
बरं... शाहरूख ज्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची बाजू घेऊन गळा काढतोय, ते 'स्पोर्ट्समन स्पिरीट'च्या कसोटीवर किती उतरतात, हे तो बघणार नाही का? शाहीद आफ्रिदी सफरचंद खावं तसा बॉल खात होता. मैदानात १७ ते २० कॅमेरे असताना त्याची चेंडू कुरतडण्याची हिम्मत झाली... आफ्रिदीही आयपीएलसाठी उपलब्ध होता आणि शाहरूखला त्याला घेण्याची इच्छा होती म्हणे... आता या आफ्रिदीसाठी त्याला कोलकाता संघात घ्यायला इच्छुक असलेल्या शाहरूखनं 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चं नाव घेत बोंब मारावी? हे म्हणजे 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं पहायचं वाकून' अशातली गत नाही का?
मुंबई हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी शाहरूखला कंठ का फुटला नाही? कारण स्पष्ट आहे... कारण त्या वेळी शाहरूख खानचा 'माय नेम ईज खान' नावाचा सिनेमा येऊ घातला नव्हता... त्या वेळी एका विशिष्ट समाजाची सहानुभूती मिळवण्याची त्याला व्यावसायिक गरज नव्हती...
अनेक बुद्धिवादी सांगत असतात की, सिनेमा ही कलाकृती आहे... त्याकडे त्याच नजरेनं पाहिलं जावं... आपले मंत्रीही हाच सल्ला देतात... पण मग अवधूत गुप्तेच्या झेंडाला राणेंच्या स्वाभिमाननं केलेला विरोध चालतो का?
सरकारचं म्हणणं असं की विरोध जरूर करा पण सनदशीर मार्गानं करा... पण शिवसेनेची कार्यपद्धती पाहता, पक्षाचा इतिहास पाहता शिवसेनेकडून आणखी कशा प्रकारचा विरोध अपेक्षित आहे? 'खान'चे प्रयोग बंद पाडा.... शाहरूखसमोर निदर्शनं करा.... त्याची पोस्टर्स जाळा.... असे आदेश शिवसैनिकांना द्यावे लागत नाहीत. पोर जन्माला येताना ज्याप्रमाणे श्वास घ्यायचं शिकूनच येतं, तसं काहीसं शिवसेनेचं आहे. 'खान'ला विरोध करा, इतकं मातोश्रीवरून सांगितलं तरी प्रत्येकाला माहित असतं नेमकं काय करायचंय ते...! आता मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना सेनेची ही पद्धत माहित नाही, असं कसं मानायचं? आणि सनदशीर मार्गानं विरोध करायचा, म्हणजे नेमकं काय करायचं? 'सरकारनं आपला आवाज ऐकावा' यासाठी भगतसिंगांनी संसदेत स्फोट घडवला. त्यावेळी कोणाला इजा होऊ नये, साधं खरचटूही नये, याची काळजी घेत मोकळ्या जागी हातबॉम्ब फेकला... हा मार्ग सनदशीर म्हणायचा की हिंसक? आत्ता प्रसिद्धी मिळवणं ही सेनेची राजकीय गरज आहे, हे काही अंशी खरं असलं तरी अशी कुठलीही गरज नसतानाही (उदा. राज ठाकरे सेनेत असताना वैगरे...) बाळासाहेबांनी वेळोवेळी राष्ट्रवादी भूमिका घेतलीय... मग वानखेडे स्टेडियमचं पिच उखडणं असेल किंवा बाबरी मशिद पाडल्याची जबाबदारी स्विकारणं असेल....
सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरूखला आलेला पाकिस्तानचा कड प्रामाणिक आहे, असं म्हणायला हवं... कारण बुद्धिवाद्यांनी कितीही घोषा लावला तरी 'चित्रपट बनवणे' हा एक व्यवसाय आहे... नव्हे कोट्यवधींचा व्यवसाय आहे. आता धंदा करायचा म्हंटल्यावर त्याची जाहिरात करणंही आलंच की... आमीर खान वेगवेगळी रुपं घेऊन देशभर फिरतो, ते चालतं... शाहरूखनं पाकिस्तानची बाजू घेतलेली खपत नाही... असं कसं? शाहरूखला आलेला क्रिकेटचा पुळका हा त्या धंदेवाईक विचारातून आलाय. त्यामुळे त्यानं केलं ते चूक असं कसं म्हणणार...
Everything is fare in LOVE and WAR... and this is BOX OFFICE WAR...

Thursday, 31 December 2009

नववर्षाच्या शुभेच्छा...

'मला वाटलं ते...!' ब्लॉगच्या सर्व नियमित-अनियमित वाचकांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!
Happy New Year....

Tuesday, 22 December 2009

तूलना करायचीच झाली तर...

गेल्या आठवड्यात उटीला गेलेलो... सहज. फिरायला. आता उटीला जाऊन आलं की त्याबद्दल किमान ब्लॉगवर लिहिलंच पाहिजे... नाहीतर मी पत्रकार कसला! नाही का? पण मला उटीतला निसर्ग... तिथले चहाचे मळे... खालपर्यंत येणारे ढग... (खरंतर ढग तिथेच असतात, आपण वर गेलेलो असतो!!!) तिथे मिळणारी ती 'होम मेड चॉकलेट्स...' इत्यादी इत्यादी असं बरंच लिहिलं जाऊ शकतं... पण मला सांगायचंय ते तिथल्या गावांबद्दल... स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची तामिळनाडूमधल्या निलगिरी जिल्ह्याशी तूलना करण्याचा मोह आवरत नाहीये...
*****************
कोयंबतूर स्टेशनवर पहाटे(?) ६च्या सुमारास उतरल्यावर आधीच इथून ठरवलेली टॅक्सी तयार होती... टॅक्सीत बसल्यावर ड्रायव्हर अंकलनं आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत (अंकलचं नाव जोसेफ) माहिती द्यायला सुरूवात केली... उटी इथून ९० किलोमीटर आहे... नेहमीचा रस्ता गेल्यावर्षी पुरात वाहून गेल्यामुळे लांबून जायला लागतं... इत्यादी. नंतर अंकल म्हणाले की, 'रस्ता खराब असल्यामुळे जायला वेळ लागतो...!!'
एकदा घाट सुरू झाल्यावर खड्ड्या-खुड्ड्यातून जायची मनाची तयारी करू लागलो... शप्पथ सांगतो! थेट हॉटेलच्या दारात उतरेपर्यंत रस्त्यावर एकही खड्डा लागला नाही... पॅचेस अगदी तुरळक... लालूंच्या भाषेत सांगायचं तर 'हेमा मालिनीच्या गालासारखा गुळगुळीत रस्ता...' हा रस्ता जोसेफ अंकलच्या म्हणण्याप्रमाणे 'खराब?' त्यांना एकदा बेलापूर ते बदलापूर असा प्रवास घडवावा (बाजूच्या सीटवर बसवून नेलं तरी चालेल...) अशी तीव्र इच्छा होत होती... म्हणजे प्रगत(?) महाराष्ट्रातून आलेल्या कोणाला 'कोयंबतूर-उटी रस्ता खराब आहे...' असं सांगण्याची अंकलची हिम्मतच झाली नसती...
*******************
दुसऱ्या दिवशी एका टुरिस्ट बसबरोबर 'साईट सिइंग' करायला गेलो... त्यावेळी आमचा ड्रायव्हर अण्णा कम गाईड अण्णा उर्फ रमेश अण्णा (पुन्हा मोडक्या हिंदीत) माहिती देत होता. या उटीच्या व्हॅलीत (तिथूनच आमची बस जात होती) ३६ (चु.भू.द्या.घ्या.) आदिवासी गावं आहेत. एकूण ७ जमातींचे आदिवासी तिथं राहतात...
आता आदिवासी गाव म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? झोपड्या... किंवा केवळ विटांची बांधलेली घरं... घरापुढे अंगण... एखादं ढोर... अंगणात नागडी-शेंबडी पोरं... इत्यादी... उटीमधल्या व्हॅलीच्या आदिवासी घरांमध्ये चारचाकी गाड्या होत्या... ज्याला 'बंगला' म्हणू शकतो, अशी बरीचशी घरं या 'आदिवासी पाड्यां'मध्ये होती. तिथं असलेल्या अफाट चहाच्या मळ्यांमुळे तिथले आदिवासी सधन असणं शक्य आहे. पण सरकारच्या 'पॉझिटीव्ह एनर्जी'ची जोड त्यांना तिथं मिळाली असणार... अन्यथा आपल्या राज्यातल्या हिल स्टेशन्सची अवस्था आठवते... माथेरानचा मार्ग असलेलं नेरळ... महाबळेश्वरच्या आसपासची गावं... जव्हार... या ठिकाणी असलेल्या आदिवासींना या नैसर्गिक संपत्तीचा वापरच करू दिला जात नाही... तामिळनाडू सरकार प्रत्येक आदिवासी कुटुंबाला प्रत्येकी ५ एकर जमीन कसायला देतं... (आपल्याकडे आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी कशा बळकावता येतील, याची चिंता वाहिली जाते...) तिथल्या सरकारच्या धोरणांमुळे निसर्गानं दोन्ही हातांनी उधळलेली संपत्ती तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचते, असंच दिसतंय... तामिळनाडूच्या अन्य भागांमध्ये स्थिती कशी आहे, माहित नाही... तिथं फिरायची संधी मिळाली की पाहता येईल. पण जो भाग पाहिला, त्यात मात्र निसर्ग आणि सरकार या दोघांमुळे तिथल्या आदिवासींच्या दारात विकासाची गंगा पोहोचलीय... अर्थात उटीतल्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचाही याला हातभार लागला असण्याची शक्यताही आहे. पण काहीही झालं तरी राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे होणं नाही...
तिथे जाऊन परतल्यानंतर पुन्हा एकदा जव्हारला जाऊन यावं, असं वाटायला लागलंय... सगळ्यांनी एकत्र येऊन आपलं झोपलेलं सरकार.... आदिवासी खात्याचे स्वतः वनवासी असलेले मंत्री... या सगळ्यांना 'उटी उटी गोपाळा...'चा गजर करून जागं करण्याची गरज आहे...

Tuesday, 1 December 2009

बादशहाचं 'कॉस्ट कटिंग...'

बेगमला कितीतरी दिवसांपासून बिरबलाच्या जागी आपल्या भावाला घुसवायचं होतं... पण दर वेळी बिरबल आपल्या चातुर्यानं बेगमचा 'प्लॅन' हाणून पाडायचा... एकदा आपल्या महालात पेपर वाचत बसली असताना बेगमनं 'कॉस्ट कटिंग'ची बातमी वाचली... ती वाचल्यावर बेगमच्या डोक्यात एक मस्त शक्कल आली... तिचा 'मक्सद' होता अर्थातच बिरबलाला बादशहाच्या मर्जीतून उतरवण्याचा... मग तिनं आपल्या भावाला बोलावणं पाठवलं आणि त्याच्यासोबत चर्चा करून सगळा प्लॅन फायनल केला...
**************
शनिवारी रात्री जेवणाच्या वेळी बादशहा कोंबडीची तंगडी तोडत असतानाच बेगम म्हणाली, 'काय महागाई वाढले सगळीकडे... सगळ्या जगात सगळे राजे-महाराजे पैसे वाचवण्याच्या उद्योगात आहेत... आपल्या राज्यात मात्र उधळपट्टी ऐन भरात आलीय...'
झालं... एकतर चविष्ट कोंबडी रस्सा आणि बेगमचं लाडिक बोलणं... बादशहा पाघळला नाही, तरच नवल... पण बिरबलाशी बोलल्याशिवाय आणि त्याचं मत घेतल्याशिवाय बादशहा काही करणं अशक्यच... त्यानं दुसऱ्याच दिवशी सकाळी बिरबलाकडे दूत पाठवला... सुट्टीच्या दिवशी बादशहानं बोलावलंय, म्हणजे एकतर काही महत्त्वाचं काम असणार किंवा महाराजांच्या डोक्यात कुठलंतरी खुळ आलं असणार... हे बिरबलानं लगेच ताडलं... बिरबल हजर झाल्यावर बादशहानं रात्री जेवताना बेगमकडून ऐकलेलं वाक्य जसंच्या तसं बिरबलाच्या तोंडावर फेकलं... ते ऐकून बिरबल अवाकच झाला... चर्चा नेमकी कुठल्या दिशेनं जात्ये, त्याच्या लक्षात येईना...
इतक्यात बेगम म्हणाली, 'त्यामुळेच आता आपल्या राज्यात कॉस्ट-कटिंग करायचा निर्णय महाराजांनी घेतलाय... त्याची अमलबजावणी करण्यासाठी वजीर या नात्यानं त्यांनी तुम्हाला बोलावलंय... आपल्याकडच्या सगळ्या खात्यांमधली कोण-कोण माणसं काढून टाकता येतील, याची यादी संध्याकाळपर्यंत माझ्या भावाकडे गेली पाहिजे... महाराजांनी कॉस्ट-कटिंग खात्याचा मंत्री म्हणून त्याला नेमलंय...'
बेगमचं हे भाषण ऐकल्यावर बिरबलानं लगेच ओळखलं यामागे कोण आहे... आणि कशासाठी आहे... बेगम आणि तिच्या भावाच्या असल्या क्लुप्त्या बिरबलाला माहित होत्या... पण हे या थराला जाईल, याची त्याला अजिबात खात्री नव्हती...
बिरबलानं आपल्या परीनं बादशहाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला... पण या सगळ्या गोष्टी बेगमनं रात्रभरात बादशहाच्या डोक्यात इतक्या भरल्या होत्या... की बादशहाला बिरबलाचा मुद्दा ऐकूच येईना... राज्याच्या तिजोरीतल्या लाख्खो मोहरा वाचणार, याचीच बादशहाला भुरळ पडलेली... अखेरीस 'जशी आज्ञा खाविंद...' असं म्हणून बिरबल निघून गेला...
**************
बादशहाच्या (खरंतर बेगमच्या!) आज्ञेप्रमाणे बिरबलानं आपल्या इच्छेविरुद्ध राज्यातल्या सगळ्या खात्यातल्या कामगारांची यादी बेगमच्या भावाकडे 'पेश' केली... बेगमच्या भावानं बिरबलाला दुसऱ्या दिवशी येऊन भेटायला सांगितलं...
दुसऱ्या दिवशी बादशहासोबत झालेल्या एका मिटिंगमध्ये बेगमच्या भावानं यादी अपूर्ण असल्याचं सांगून बिरबलावर पहिला हल्ला केला... बिरबलाला असं काहीतरी होणार याची कल्पना होतीच... त्यामुळे त्यानं आपला बचाव तयार ठेवला होता... मात्र तो काही बोलण्यापूर्वी बाहशहानं बेगमच्या भावाला याचा अर्थ विचारला...
त्यावर बेगमचा भाऊ म्हणाला, 'सगळ्या खात्यांची यादी बिरबलानं दिलीय... मात्र संरक्षण खातं, अर्थात सैन्यातल्या ले-ऑफची यादी यात नाही... एकदा कॉस्ट-कटिंग करायचं म्हंटल्यावर सगळ्या खात्यांमध्ये व्हायला पाहिजे...'
हे ऐकल्यावर मात्र बिरबल थक्क झाला... बेगम आणि तिचा भाऊ वजिराच्या खुर्चीसाठी या थराला जातील, याची त्याला कल्पनाच नव्हती...
अखेरीस तो बादशहाला म्हणाला, 'सैन्यातल्या कपातीची यादी करणं आपल्याला शक्य नाही... तो आपला स्वतःचा अधिकार आहे, असं मला वाटतं...'
बिरबलानी असं म्हंटल्यावर बादशहा थोडा सावध झाला... बिरबलाला तो पुरता ओळखून होताच... शेवटी बादशहानं ही जबाबदारी बेगमच्या भावावरच सोपवली आणि मिटिंग संपली....
**************
बेगमच्या भावानं सगळ्यात आधी बिरबलाच्या 'सेनापती'ची रवानगी राजधानीत नव्यानं बांधण्यात आलेल्या मुदपाकखान्याचा सुरक्षा-रक्षक या जागी केली... त्यानंतर ५० टक्के सैनिक कमी करताना त्यानं आणि बेगमनं अक्षरशः चिठ्ठ्या टाकल्या... अर्थात हे बादशहाला माहित नव्हतं... बिरबलाला माहित असून उपयोग नव्हता... कारण बादशहाला सांगून समजणार नाही, हे त्याला स्वानुभवानं माहित होतं...
सगळ्या सैनिकांना खलिते गेले, की उद्यापासून कामावर येऊ नका... इतकं सगळं होऊनही बेगमच्या भावानं उरलेल्या सैनिकांना देण्यात येणारी रसद बंद केली... 'युद्ध सुरू नसल्यानं सैनिकांनी घरून डबे आणावेत आणि चहापण घरूनच थर्मासमध्ये भरून आणावा', असा फतवा बेगमच्या भावानं काढला... या प्रकारामुळे सैन्यामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली... बिरबलालाही हे सगळं असह्य झालं होतं...
**************
एकदा रात्री बादशहा घोरत पडला असताना १च्या सुमारास एक सैनिक धावत-धावत महालात आला... त्यानं तातडीनं महाराजांना उठवण्यास त्यांच्या सेवकांना सांगितलं... बादशहा डोळे चोळत-चोळतच जरा गुश्श्यातच उठला आणि सैनिकाला काय झालंय ते सांगण्याची आज्ञा केली... त्यावर सैनिक म्हणाला, 'शेजारच्या राजानं आपल्यावर हल्ला केलाय... त्याचं सैन्य आपल्या सीमेवर येऊन टेकलंय...'
हे ऐकल्यावर बादशहाची झोपच उडाली... त्यानं तातडीनं बिरबलाला बोलावणं पाठवलं... पण दिड-दोन तासांनी बिरबल डोळे चोळत-चोळत आला.... हे पाहिल्यावर बादशहा आणखीनच भडकला... त्यानं बिरबलाला थेट फैलावर घेतलं आणि हल्ला कसा झाला आणि आत्ता काय स्थिती आहे, ते विचारलं...
बिरबल म्हणाला, 'आपल्या कॉस्ट-कटिंगची बातमी शेजारच्या राजाला त्याच्या गुप्तहेरांनी दिली असणार... आपण सैन्य ५० टक्के कमी केल्यामुळे आपली ताकद कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं असणार आणि.....'
बिरबलाचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच आणखी एक सैनिक धावत आत शिरला आणि त्यानं नवीच माहिती बादशहाला दिली... तो म्हणाला, 'आपण कमी केलेले सगळे सैनिक शेजारच्या राजाकडे गेल्येत... त्यानं तितक्याच पगारात सगळ्यांना घेतलं आणि आता हेच सैनिक आपल्यावर चाल करून येतायत...'
हे ऐकल्यावर तर बादशहा हादरलाच... त्यानं बिरबलाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं... बिरबलानं खांदे उडवले आणि म्हणाला, 'आता काय करायचं याचं उत्तर बेगमच्या भावानं दिलं पाहिजे...' हे ऐकल्यावर बेगमला घामच फुटला... ही परिस्थिती हाताळायला आपला भाऊ लायक नाही, किंबहुना बिरबलाइतका कोणीच लायक नाही, हे तिला पक्क ठाऊक होतं...
शेवटी बिरबल म्हणाला, 'मी यावर मार्ग काढायला तयार आहे... आपण ही परिस्थिती हाताळू शकतो... फक्त त्याचा तिजोरीवर थोडा ताण येईल... हे मान्य असेल तर अजूनही हल्ला वाचवणं शक्य आहे...'
बादशहा णि बेगमनं मागे-पुढे न पाहता बिरबलासाठी तिजोरी मोकळी करण्याची तयारी दाखवली... त्यावर बिरबल म्हणाला, 'आपल्यावर चालून येत असलेल्या आपल्याच सैनिकांना दुप्पट पगारावर परत घेतलं जात असल्याची घोषणा तातडीनं करा... म्हणजे सगळं नीट होईल...' बादशहाला ही आयडिया एका क्षणात आवडली... त्यानं तातडीनं खलिता घेतला आणि आदेश काढला... तो घेऊन निरोप घेऊन आलेले दोन्ही सैनिक निघून गेले.... राज्यावरचं संकट टळल्यामुळे बादशहा आणि बेगमनं सुटकेचा निश्वास टाकला....
**************
सैनिक निघून गेल्यावर बादशहाला बिरबल म्हणाला, 'खाविंद... माफ करा... पण मी तुमच्याशी खोटं बोललो... राज्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही... पण आपण कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली आपली शक्तीस्थळं कमकुवत करत गेलो, तर काय होऊ शकतं... याची छोटी झलक तुम्हाला दाखवली...' थोडा पॉज घेऊन बिरबल म्हणाला, 'हल्ला खोटा असला तरी तुम्ही दिलेले आदेश खरे आहेत... त्या सैनिकांना आपण दुप्पट नाही, तरी पुर्वीच्या पगारात पुन्हा घेतलंच पाहिजे...'
**************
बादशहाला बिरबलाचं म्हणणं पटलं आणि आपल्या या वजिराचा आणि त्याच्या चातुर्याचा अभिमान त्याच्या मनात दाटून आला... याच आनंदात त्यानं 'कॉस्ट कटिंग'ला फाटा देत दरबारात बिरबलाला शाही मेजवानी दिली...