Tuesday 18 August 2009

पुन्हा क्रिझवर भिंत...?

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहूल द्रवीड वन-डे टीममध्ये परतलाय... सगळ्या मिडीयानं त्याला डोक्यावर घेतलं कारण त्यानं कमबॅक केलंय म्हणून... अन्यथा त्याचा वाईट फॉर्म सुरू असताना त्याला शिव्यांची लाखोली याच मिडीयानं वाहिली ना? पण 'देखल्या देवा दंडवत' अशी आपली नितीच आहे, त्याला कोण काय करणार? राहूल परत आला, हे चांगलं झालं का वाईट, हे आत्ताच कसं सांगता येईल?
आयपीएलमध्ये द्रवीड चांगला खेळलाय, हे कबूल... त्याचा संघ थेट फायनलला पोहोचला, हे ही खरं... पण आयपीएलमध्ये खेळणं वेगळं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणं वेगळं... (मग त्या हिशेबानं शेन वॉर्नला पुन्हा कॅप्टन करायला पाहिजे ऑस्ट्रेलियानं) मुळात द्रवीडची ख्याती आहे, 'दि ग्रेट इंडियन वॉल...' अशी. वन-डे खेळताना त्याच्या या वॉलचा उपयोग नाही. तिथं विरेंद्र सेहवाग, युवराज सिंगच पाहिजेत. म्हणजे आधीच द्रवीड हळूबाई... त्यात पहिली विकेट लवकर गेली आणि तो वन-डाऊन आला तर बघायलाच नको... मग क्रीझवरची ती 'वॉल' इतकी भक्कम होते, की भारतीय संघही ती पार करू शकत नाही. टेस्ट मॅचमध्ये द्रवीडला पर्याय नाही... (मांजरेकर होता... तो लवकर गेला विचारा कॉमेंट्री करायला.) पण वन-डेमध्ये त्याला घेण्याऐवजी आयपीएलमधून पुढे आलेल्या एखाद्या नव्या खेळाडूला संधी दिली असती, तर त्याचा जास्त फायदा झाला असता. खरंतर २०११ चा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेऊन चॅम्पियन ट्रॉफी आणि श्रीलंका दौ-यासाठी टीम निवडायला हवी होती. तोपर्यंत द्रवीड संघात राहील की नाही, शंका आहे. विराट कोहली, स्वप्नील असनोडकर, रविंद्र जडेजा, सिद्धार्थ चिटणीस, विल्किन मोता, श्रीवस्त गोस्वामी, धवल कुलकर्णी, मनप्रितसिंग गोनी असे चांगला खेळ असलेले अनेक जण आहेत. त्यातले कोहली-असनोडकर यांची नावं सगळ्यात अग्रणी... पण त्यांना संधी द्यायची सोडून द्रवीडवर पुन्हा प्रयोग का केला जातोय, हे समजू शकत नाही...
असे प्रयोग कधीकधी यशस्वी होतातही... उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर सौरव गांगूलीचं देता येईल... पण २०११पर्यंत द्रवीड असण्याची शक्यता कमी असताना असनोडकर, कोहली, धवल कुलकर्णी यांना मॅचप्रॅक्टिस कधी देणार? की त्यांना डायरेक्ट वर्ल्डकपलाच उभं करायची श्रीकांतचा विचार आहे..? मग तेव्हा त्यांची कामगिरी खराब झाली तर त्याचा दोष नव्या खेळाडूंचा की श्रीकांतचा...? शिवाय द्रवीड फेल जायची शक्यता आहेच, अशा वेळी काय? मग त्याला काही विचार न करता परत कच-यात टाकतील, हे लोकच...
भारतीय निवड समितीचं हे धरसोड धोरण नवं नाही... याच प्रकारामुळे विनोद कांबळी, नरेंद्र हिरवाणी, खा. नवज्योतसिंग सिद्धु यांच्यासारख्या अनेकांमधल्या टॅलेंटचा बळी घेतलाय. कधीतरी हा प्रकार थांबावा, असं एक कट्टर क्रिकेटधर्मी या नात्यानं वाटणं चुकीचं आहे का?

1 comment:

Nima said...

राहूल द्रविड हा काही साधासुधा खेळाडू नाही. त्याचा बचाव भक्कम आहे आणि गरज पडल्यास तो जलदही खेळू शकतो. मुळात नव्या रक्ताला संधी द्यायच्या नावाखाली जुन्या रक्ताला, मग तो कितीही चांगला असला तरी डच्चू द्यायचं धोरण चुकीचंच आहे. दरवेळी विश्वचषकावर नजर ठेवायची तर मग मधल्या चार वर्षातल्या सामन्यांवर लक्षच द्यायचं नाही का? विश्वचषक दूर आहे. खेळलेले जास्तीत जास्त सामने जिंकणं महत्त्वाचं, मग, अगदी नवोदित खेळाडूंनाही उत्तम संघाकडून कामगिरी करताना हुरूप येतोच. ऑस्ट्रेलियाचा संघ हे त्याचं उत्तम उदाहरण. आता श्रीलंका दौरा आणि चॅंम्पियन्स ट्रॉफी पणाला लावून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्यासाठी द्रविडसारखे चांगले खेळाडू हवेतच. टेक्निक, फॉर्म आणि फिटनेस या महत्त्वाच्या परिमाणांवर तो शंभर टक्के खरा आहे. त्यामुळे उगीच २०११ कडे बोट दाखवून वयाचे दाखले देण्यात काही अर्थ नाही.