Friday 19 June 2009

गाडीत भेटलेले गुरू!

घर बदलापूरात असल्यानं हैदराबादेतून मुंबईत आल्यानंतर लोकलचा प्रवास न टाळता येणारा. त्यामुळे रोज दोन-तीन तास गाडीतच जाणं ओघानं आलंच. गाडीतला सगळ्यात मोठा उद्योग म्हणजे वाचणं... आणि पुस्तक जवळ नसेल तर गाणी ऐकणं किंवा बरोबरच्या अनोळखी लोकांशी बोलणं. या बोलण्यातूनच मग अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. काही गोष्टी तर डोळ्यात अंजन घालणा-या ठरल्या. गेल्या ६-७ वर्षांमध्ये गाडीत भेटलेल्या काही गुरूंविषयी थोडंसं...
*********
श्री. पाटणकर... पहिलं नाव आठवत नाहिये. वय पन्नासच्या आसपास. त्यांना तोंडाचा कर्करोग झाला होता. त्यावर उपचार सुरू होते आणि त्याच साठी ते परळला टाटा हॉस्पिटलमध्ये जात होते. त्यांची सौभाग्यवती बरोबर होतीच. रेल्वेमध्ये नोकरी करत असताना पाटणकरांनी स्वतःचं घर, थोडी जमीन असं सगळं जमवलं होतं. काडीचंही व्यसन नसताना त्यांना कॅन्सर झाला होता आणि खालचा सगळा जबडा काढून टाकावा लागला होता. शरिरातली ती पोकळी झाकण्यासाठी ते तोंडाला रुमाल बांधत असत. त्यांना नवा कृत्रिम जबडा बसवावा लागणार होता. हा खर्च अफाट होता. पण न डगमगता पाटणकर उभे होते ते त्यांच्या पत्नीच्या धीरामुळे... सहज बोलता बोलता त्या म्हणाल्या, "की आजवर आयुष्यात सगळं मिळालंय. सगळी सुखं-चैन झाली. मग देव म्हणतो बॅलन्स करायला पाहिजे. म्हणूनच ह्यांना हा त्रास झाला. हे केवळ बॅलन्सिंग आहे. तावडीचा दांडा एकदा सरळ झाला की सगळं नीट होईल." त्या माऊलीचा आशावाद आठवला की अजूनही अंगावर काटा येतो....
*********
प्रामुख्यानं हार्बरनं प्रवास करताना गोवंडी किंवा तत्सम कुठल्यातरी झोपडपट्टीत राहणारी मुलं गाडीतून उगीच इकडे-तिकडे करताना दिसतात. खूप दिवस डोक्यात होतं या मुलांशी बोलायचं... एकदा (धीर करून) त्यातल्या एकाला धरलाच. सुरुवातीला तो काही बोलायला तयारच होईना. शेवटी त्याला खूपदा विचारल्यावर त-त, प-प करत हिंदीतून बोलायला लागला. तो बंगली होता. (बांग्लादेशीही असू शकेल, कोणास ठाऊक) ही पोरं काय करतात उगीच चेंबूर ते मानखूर्द प्रवास करून, ही शंका होतीच. त्याला तसं विचारलं तर त्यानं सांगितलेलं की "ऐसेही... घरपे बाप दारू पी कर मारता है... तो दिनभर क्या करनेका..." हे कारण ऐकल्यावर काहीसा निराशच झालो सुरूवातीला. ही मुलं चो-या-मा-या करत असतील, अशी शंका होती. पण तसलं काहीच नव्हतं. पण मग नीट विचार केल्यावर कळलं की अरेच्या... हे तर उद्याचे भाई किंवा दादा आहेत. यातलाच एखादा डॉनही होऊ शकेल. एकीकडे एसएससी-सीबीएसई वाद सुरू असताना या मुलांकडे कोणाचच लक्ष नाही. बालमजुरीच्या प्रश्नावर कृती न करता गळा काढणा-यांनी या मुलांकडेही बघावं... ते मजुरीही करत नाहीत. सुशिक्षित बेकारांचा प्रश्न सोडवताना या भावी अशिक्षित बेकारांचं आपण काय करणार आहोत, तेही ठरवावंच लागेल.
*********
एरवी उल्हासनगरला गाडीतली गर्दी कमी होते, हा नेहमीचा अनुभव. पण सकाळच्या वेळी खोपोली लोकलनं मुंबईहून बदलापूरकडे आलं तर उल्हासनगरला गाडी पुन्हा भरते. बरेच जण आपल्याला न कळणा-या भाषेत (अर्थातच सिंधीत) खूपसं बोलत असतात. त्यांच्याकडे मोठमोठ्या निळ्या पिशव्या असतात. एकतर ही ऑफिसची वेळ असल्यानं मुंबईकडे जाण्यासाठीच जास्त गर्दी असते. मग उल्हासनगरात पुन्हा इतके लोकं कसे येतात... एकदा कधीतरी समजलं की हे लोक उल्हासनगरात बनवलेला माल पिंपरीला नेतात. (पिंपरीमध्येही सिंधी लोकसंख्या खूप मोठी आहे.) मग तिथून हा माल पुण्याच्या बाजारात जातो. मग माल पोचवण्याच खर्च वाचावा आणि तो पुण्यात अधिक स्वस्तात मिळावा म्हणून उल्हासनगरचे हे "उद्योजक" स्वतः माल घेऊन खोपोली आणि तिथून बसनं पिंपरीला जातात. आपल्याला समोरच्या डेअरीत जायचं तरी चालत जायचा कंटाळा येतो कधी-कधी... उल्हासनगरच्या मालाला 'मेड इन यु.एस.ए.' असं म्हणून चिडवतोही आपण... पण आपल्याला त्यांची या मागची मेहनत, चिकाटी, अपार कष्ट करण्यीच तयारी आणि अर्थातच कल्पकता कधीच दिसत नाही.
*********
अशी अनेक उदाहरणं आहेत. काहींचे तपशील विस्मृतीत गेल्येत. काही घटनाच विसरायला झाल्या असतील. पण ही उदाहरणं ठळकपणे लक्षात राहिली, त्यामुळे ती लगेच आठवली, इतकंच.... पण गुरू हे केवळ मठातच भेटतात, असं नाही. ते कुठेही अगदी लोकलच्या गर्दीतही भेटू शकतात, हे मात्र यावरून सिद्ध होत नाही का?

3 comments:

Unknown said...

hi nandu

are tu lihilele chote lekh khupach touching ahet re
vachun ekdam swatachya athvani athavlyasarkhe zale mala
hya lekhanmule tari kadachit sushikshit bekar ani jyanni lahanpan sukhat ghalavle tyanchi doki thikanavar yetil
khas karun pahila lekh, tya maulila kharach salam ahe re

chan vatle vachun

शेखर जोशी said...

प्रवासात भेटलेल्या विविध लोकांचे हे अनुभव खूप भावणारे आहेत. नकळत आपल्याला खूप काही शिकवून जाणारे.
ब्लॉगवरील अन्य लेखही वाचले. लिखाणात सातत्य ठेव.
शेखर

Rucha !! said...

Faar chhan, me dekhil badlapur la rahate aani roj 2 3 taasachya pravasat vegveglya lokana jevha bhetato tevha kharach anek goshti samajtat aani shikayla miltat..pahilya lekhat je spirit dakhavlay te me swata majhya gharat experience kelay .. so very touching for me..
Tumcha blog Anant samant yanchya scrapbook madhe pahila n vachavasa vatla..
Thanks
Rucha