Tuesday 30 June 2009

एन.एस.जी.@मुंबई


२६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर एन.एस.जी.ची पथकं देशाच्या चारही दिशांना ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्यातलं पहिलं केंद्र अर्थातच देशाची आर्थिक राजधानी, मुंबईत आजपासून ऑफिशियली सुरू होतंय. मरोळमधल्या २३ एकरांच्या जागेत हे केंद्र ऊभं राहिलंय. खरंतर एन.एस.जी.नं दिडशे एकरांची मागणी केली होती... पण मुंबईत जागेची कोण अडचण???? त्यामुळे मग २३ एकरांवर समाधान मानून घेत आज चिदंबरम या केंद्राचं उद्घाटन करतायत.
सध्या एन.एस.जी.चा एकमेव तळ हरियाणामध्ये आहे. तिथून देशाच्या कुठल्याही कोप-यात पोहोचणं सोयीचं नाही, असा साक्षात्कार २६ नोव्हेंबरला झाला आणि मग देशाच्या चारही कोप-यांमध्ये एन.एस.जी.चे तळ असावेत, असा तोडगा निघाला. म्हणजे आता मुंबई, महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये एन.एस.जी.ची गरज भासल्यास मुंबईतले कमांडो त्वरित कारवाईला जाऊ शकतील म्हणे... १ जुलैला हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नई इथंही असेच तळ सुरू होणार आहेत. म्हणजे अतिरेकी हल्ले किंवा विमान अपहरण यापासून आपला आसेतूहिमाचल देश सुरक्षित झालाय, असं मानायला हरकत नाही, नाही का?
पण प्रश्न असा आहे, की हरियाणातल्या कुठल्यातरी जंगलाच्या कोप-यात जरी एन.एस.जी.चा एकमेव तळ असला, तरी या ब्लॅक कॅट कमांडोंना मुंबईत यायला किती तास लागावेत... चार-पाच-फार फार तर सहा... पण २६ जुलैच्या रात्री अतिरेकी हल्लाच असल्याची खात्री पटल्यावर एन.एस.जी.चे जवान नरिमन हाऊसवर उतरायला २८ची सकाळ उजाडली... म्हणजे हल्ला झाल्यानंतर हे जवान बाईक घेऊन निघाले असते, तरी आधी पोहोचले असते. पण मग उशीर का झाला? हे जवान आळशी आहेत म्हणून... की ते तळावर न थांबता आपापल्या घरी विश्रांती घेत होते म्हणून... की त्यांच्याकडच्या शस्त्रांना गंज चढला होता म्हणून... नक्की काय झालं होतं हे आता सगळ्यांनाच कळलंय. इंडियन एक्सप्रेसनं तर एक वृत्तमालिकाच चालवली याबाबत... एन.एस.जी. पोहोचायला उशीर झाला त्याला कारण होती आपल्या रक्तात भिनलेली बाबूगिरी...
कोणी कोणाला विचारायचं... राज्य सरकारनं की केंद्रानं... विनंती कोणी करायची... नेमके किती सैनिक लागणार... त्यांच्याकडे कोणती शस्त्र असतील तर सोयीचं... हे सगळं दळण दोन रात्री आणि एक दिवस सुरू होतं... त्यानंतर कमांडोंना बसच मिळाल्या नाहीत... हे सगळं कशामुळे, तर आपल्या रक्तात भिनलेली बाबूगिरी... मराठीत ब्युरोक्रसी...
मुंबई-चेन्नई-हैदराबाद-कोलकाता इथं एन.एस.जी.चे तळ उभारले जातायत, हे चांगलंच आहे. पण त्याच बरोबर किमान सुरक्षेच्या बाबतीत आपण बाबूगिरीचा त्याग करायला हवा, असं वाटतं. नाहीतर मुंबईत मरोळला तळ असला काय किंवा हरियाणातल्या कुठल्यातरी जंगलाच्या कोप-यात असला काय, फरक काय पडणार आहे त्यानं??

No comments: